इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले असून गौतम गंभीरला वगळण्यात आले आहे.
नवी दिल्ली- इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले. यजमानांच्या १६ सदस्यीय संघातून अनुभवी सलामीवीर गौतम गंभीरला वगळण्यात आले आहे.
विशाखापट्टनममधील दुसरी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेणा-या भारताच्या संघात केवळ दोनच बदल करण्यात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या कोलकाता कसोटीमध्ये पहिल्या डावात प्रतिस्पध्र्याचा निम्मा संघ गारद करणा-या भुवनेश्वरची पाठदुखी बळावली. त्यामुळे किमान सहा आठवडे तो खेळू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीसह पाच सामन्यांची वनडे मालिका तसेच इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांना तो मुकला. दुखापतीतून सावरल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत मुंबईविरुद्ध खेळून भुवनेश्वरने आपला फिटनेस सिद्ध केला. त्याने दोन्ही डाव मिळून ३६ षटके (१३ आणि २३) टाकली. भुवनेश्वरमुळे भारतीय संघातील मध्यमगती गोलंदाजांची संख्या चारवर गेली आहे. फिरकीपटूंचे वर्चस्व पाहता मध्यमगती गोलंदाजांना अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी चुरस द्यावी लागत आहे. मात्र भुवनेश्वरच्या रूपाने कर्णधार विराट कोहलीला मध्यमगती गोलंदाजीमध्ये आणखी एक पर्याय मिळाला आहे.
गौतम गंभीरचे कसोटी संघातील स्थान अल्पकाळाचे ठरले. पहिल्या कसोटीत खेळलेल्या अनुभवी सलामीवीराला पहिल्या डावात २९ धावा करता आल्या. दुस-या डावात खातेही खोलता आले नाही. खराब फलंदाजीमुळे दुस-या कसोटीत त्याला स्थान मिळू शकले नाही. त्याच वेळी रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याची मुभाही देण्यात आली. तब्बल दोन वर्षानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तिस-या आणि अंतिम कसोटीत (इंदूर) पुनरागमन करणा-या गंभीरने (२९ आणि ५० धावा) ब-यापैकी कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध नियोजित सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळाली. मात्र अपयशी ठरल्याने गंभीरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. गंभीरला बाहेर बसावे लागल्याने विद्यमान संघात लोकेश राहुल आणि मुरली विजय हे दोनच स्पेशालिस्ट सलामीवीर आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी २६ नोव्हेंबर २०१६पासून मोहालीमध्ये खेळली जाणार आहे.
डकेटच्या जागी बटलर
तिस-या कसोटीसाठी इंग्लंड संघात बेन डकेटच्या जागी यष्टिरक्षक, फलंदाज जोस बटलरचा समावेश केला जाणा आहे. नवोदित डकेटला पहिल्या दोन कसोटीमधील तीन डावांत १३, ५ आणि ० अशा १८ धावा करता आल्या. तब्बल वर्षभरानंतर बटलर संघात परतत आहे. मात्र तो स्पेशालिस्ट फलंदाजाच्या भूमिकेत दिसेल. बांगलादेश दौ-यातून वगळलेल्या गॅरी बलान्सचेही पुनरागमन निश्चित मानले जात आहे.
भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, मोहम्मद शामी, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंडय़ा.