गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बिबटय़ांचा मृत्यू होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर मानवी वस्तीकडे येऊन बिबटय़ाच्या हल्ल्याच्या घटनादेखील लक्ष वेधून घेणा-या ठरत आहेत.
बिबटय़ाचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढू लागले आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे हे मानवी वस्तीकडे येत असल्याचे कारण असले तरी, अलीकडच्या काळात बिबटय़ाचे नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ लागल्याने बिबटय़ांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवल्याचे चित्र आहे. बिबटय़ांचे मानवी वस्तीकडे येणे हे धोकादायक असले तरी, त्यांचा नैसर्गिक अधिवास कसा टिकून राहील यादृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे गावामध्येच काही दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्या महिलेवर बिबटय़ाने पाठीमागून हल्ला केल्याच्या घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यामध्ये संबंधित महिलेने बिबटय़ाचा हल्ला परतवून लावला असला तरी, बिबटय़ांचे मानवी वस्तीकडे येण्याचा प्रकार सा-यांसाठी चिंतेचा ठरणार आहे.भक्ष्याच्या शोधासाठी तसेच भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटे मानवी वस्तीकडे वळताना दिसून येत असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्याचबरोबर गेल्या काही काळांमध्ये बिबटय़ाचे बछडे आढळून येण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. यातूनच बिबटे हे मानवी वस्तीच्या जवळपास येऊन आपला अधिवास निर्माण करत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षात सर्वत्र सिमेंट क्राँक्रीटचे जाळे वाढू लागले आहे. शहरापासून जवळपासच्या गावापर्यंत सिमेंटचे जंगल उभे राहत असतानाच पूर्वीच्या काळातील जंगले नष्ट होताना दिसत आहेत. परिणामी बिबटय़ांसारख्या प्राण्यांचे नैसर्गिक अधिवासही धोक्यात येण्याचे हे कारण समजले जात आहे. त्यामुळे बिबटय़ांचे नैसर्गिक अधिवास कमी होण्यास अनेकविध कारणे आहेत. त्यातील वाढते सिमेंटचे जाळे, भक्ष्याचा शोध घेताना अथवा त्याचा पाठलाग करत मानवी वस्तीकडे येण्याची ही कारणे ठळकपणे मांडली जात आहेत.
काही दिवसांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द गावामध्ये बिबटय़ाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचबरोबर राजापूर तालुक्यातही बिबटय़ाच्या मृत्यूची घटना घडली होती. या घटनेपाठोपाठ कुर्धे गावातच बिबटय़ा विहिरीत पडल्याचा प्रकार पुढे आला. काही दिवसांतील बिबटय़ाच्या या घटना लक्षवेधी ठरल्या आहेत. कुर्धे येथील विहीर जंगल परिसरात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या विहिरीतून बिबटय़ाला बाहेर काढताना वनविभागाची खूपच दमछाक झाली. सरतेशेवटी विहिरीत शिडी सोडून ठेवण्यात आली. दुस-या दिवशी या शिडीच्या आधारे बिबटय़ा बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले.
मानवी वस्तीकडे बिबटय़ांचे येण्याचे प्रकार लक्षात घेता, वनविभागाकडूनही त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. वनतोडीचे प्रकार थांबवण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलली जात आहेत. जेणेकरून बिबटय़ांचे नैसर्गिक अधिवास टिकून राहावेत, असा प्रयत्न केला जात आहे. मात्र, भक्ष्याचा शोध घेताना किंवा त्याचा पाठलाग करताना बिबटय़ा एकतर फासकीत किंवा विहिरीत पडल्याच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास येत आहेत. याशिवाय रस्ता ओलांडता वाहनाची धडक बसणे आणि त्यातून बिबटय़ाचा मृत्यू ओढावत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बिबटय़ांच्या संख्येतही अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झाली असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. बिबटय़ांची संख्या वाढताना त्याचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रकार सा-यांच्या चिंतेचा विषय ठरू लागली आहे. अनेकांना बिबटय़ांचा वावर सर्रासपणे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाकडूनही बिबटय़ाचा नैसर्गिक अधिवास टिकून ठेवण्याचे प्रयत्न होत असले तरी, हे अधिवास नष्ट होणार नाहीत, याची काळजी सर्वानीच घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा बिबटय़ांचे मानवी वस्तीकडील मोर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक आहे.