उत्तर प्रदेशातील जनतेला भुलथापा देऊन गेली २७ वर्ष विकासापासून दूर ठेवणा-या राज्यकर्त्यांविरोधात काँग्रेसने कंबर कसली आहे.
नवी दिल्ली- गेली २७ वर्ष उत्तर प्रदेशातील जनतेला भुलथापा देऊन विकासापासून दूर ठेवणा-या राज्यकर्त्यांविरोधात काँग्रेसने कंबर कसली आहे. ‘२७ साल, यूपी बेहाल’असा नारा देताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.
मिशन उत्तर प्रदेशसाठी तीन दिवसीय बसयात्रेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून धडाक्यात सुरुवात झाली.
उत्तर प्रदेशात मागील २७ वर्ष राज्य करणा-या विविध सरकारच्या चांगल्या- वाईट कामाचा पाढा वाचण्यासाठी हा बस यात्रेमागील उद्देश असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. सुमारे ६०० किमीपर्यंत ही बसयात्रा काढण्यात येणार आहे. या बसयात्रेत काँग्रेसचे आघाडीचे नेते गुलाम नबी आझाद, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार शीला दिक्षित, उत्तर प्रदेशातील पक्षाचे प्रमुख राज बब्बर हे यांचा बसयात्रेत प्रमुख सहभाग राहणार आहे. ही बस कानपूरमार्गे विविध भागांचा दौरा करणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यांत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहेत. या यात्रेचा मुक्काम मोरादाबाद येथे असणार आहे. शहाजानपूर, रामपूर, बरेली, हरदोई, कन्नौजमार्गे या बसयात्रेचा समारोप कानपूर येथे होईल. धर्म आणि जातीच्या नावावर उत्तर प्रदेशातील जनतेत फूट पाडणे हा काँग्रेसचा उद्देश नाही, असेही गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. या यात्रेतून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यामार्फत एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. मागील २७ वर्षात भाजपा, बसपा आणि सपाने सत्तेचा गैरवापर करून उत्तर प्रदेशातील जनतेत जात आणि धर्माच्या नावाखाली फूट पाडली. काँग्रेसचा उद्देश हा सर्वधर्मीय व सर्वजातीय लोकांना एकत्रित आणून चांगले सरकार देण्याचा राहील, असेही आझाद यांनी सांगितले.
राहुल गांधी २९ जुलैला लखनऊमध्ये
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बस यात्रेचा भाग म्हणून लखनऊ येथे २९ जुलै रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे पदाधिकारी संजय सिंग यांनी दिली.