आमचा पक्ष सुसंस्कृत आणि सभ्य लोकांचा आहे, असा टेंबा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेहमीच मिरवत असतात. पण हा सुसंस्कृतपणा आणि सभ्यता म्हणजे नेमके काय, हे या कार्यकर्त्यांनीच भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच आपल्या पक्षाच्या अध्यक्षांना शिकविण्याची वेळ आली आहे.
रविवारी राज्यातील सुमारे दोन हजार नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून देण्यासाठी निवडणुका झाल्या. नगरसेवकपदाच्या सुमारे चार हजार जागांसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीला मिनी विधानसभा निवडणुकांचे स्वरूप आल्याने राज्यभरातील जास्तीत जास्त नगरपालिका आपल्या ताब्यात याव्यात यासाठी यावेळी भारतीय जनता पार्टीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. राज्य सरकारची सत्ताही भाजपाच्या दिमतीला होती आणि या पक्षाचे अनेक मान्यवर नेते पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: मैदानात उतरले होते. कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार मोठय़ा संख्येने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. पण त्यासाठी प्रचार करताना आपल्याकडून सभ्यतेच्या भाषेला तडा जाणार नाही. याचीही काळजी संबंधित नेत्यांनी घ्यायला हवी. पण रावसाहेब दानवे नावाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष याला अपवाद ठरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे या रावसाहेब दानवेंची पत्रकार परिषद झाली. जाहीर सभेत जीभ थोडी सैल सोडली तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण रावसाहेब दानवे यांना मोजक्या पत्रकारांसमोर बोलतानाही जिभेला लगाम लावावा असे वाटले नाही, हे आश्चर्यजनक आहे. आपल्याकडे राज्य सरकारमधील कोणतेही अधिकृत शासकीय पद नाही. त्यामुळे जाहीर पत्रकार परिषदेत धमक्या देत फिरणे आपल्यासाठी शोभादायक नाही एवढे तरी किमान भान या दानवे महाशयांनी ठेवायला हवे होते. अर्थात याचा अर्थ शासकीय पद जवळ असणा-यांनी आपल्या विरोधकांना धमक्या देत फिरावे, असा मुळीच नाही. पण तब्बल पंधरा वर्षानंतर राज्याची सत्ता हातात मिळाल्याने आपण मनमानी पद्धतीने कुणाला काहीही बोलू शकतो, धमक्या देऊ शकतो, असे भाजपामधील लुंग्या-सुंग्या कार्यकर्त्यांपासून अगदी रावसाहेब दानवे यांच्यासारख्या प्रदेशाध्यक्षांपर्यंत सगळ्यांनाच वाटू लागले आहे. त्यामुळेच मतदानाच्या दिवशी शेखर चरेगावकर नावाच्या भाजपाच्या उन्मत्त कार्यकत्याने कऱ्हाड येथे आपली गाडी रोखणा-या महिला हवालदारास मतदान केंद्रातच शिव्यांची लाखोली वाहिली होती. मला मंत्रीपदाचा दर्जा आहे. मंत्रालयाच्या आवारातही माझी गाडी कोणी अडवू शकत नाही, मग तुला तो अधिकार कोणी दिला, अशी विचारणा करीत मोठय़ा गर्दीसमोर चरेगावकर यांनी त्या महिला हवालदारास निलंबित करण्याची धमकी दिली. जर एक सामान्य कार्यकर्ता उर्मटपणे इतके टोक गाठतो, तर मग त्यांचे बॉस असलेले रावसाहेब दानवे किती बोलू शकतात. याची सहजपणे कल्पनाही करता येणार नाही. तर देवगडच्या पत्रकार परिषदेत या दानवे यांची मराठवाडा एक्स्प्रेस सुसाट सुटली होती. राज्यात आमचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि या सरकारविरुद्ध कोणी बोलेल त्याला छगन भुजबळ यांच्या बाजूच्या खोलीत टाकून देऊ, अशी धमकी रावसाहेब दानवे यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेत दिली.
रावसाहेब दानवे यांना करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांच्याच पक्षाचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गाडीत ९१ लाख रुपयांची रोकड सापडली. या रकमेसंदर्भात अनियमितता झाली आहे. अशी कबुली स्वत: सुभाष देशमुख यांनी दिल्यानंतरही भाजपा नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाईचे कोणतेही पाऊल उचलल्याचे दिसत नाही. मधल्या काळात रावसाहेब दानवे यांनी मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यात वास्तव्य सुरू केले होते. दानवे सत्तारूढ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत शासकीय पद नाही. तरीही त्यांनी रेटून या बंगल्यावर कब्जा केला होता. दानवेंनी अनधिकृतपणे बंगला लाटला आहे, अशी चर्चा जेव्हा मीडियात सुरू झाली त्यावेळी बहुधा, त्यांनी बंगला रिकामा केला असावा. कारण त्यानंतर याबाबत फारशी चर्चा झाली नाही. किंबहुना तिला पूर्णविराम मिळाला. पण खासदार असलेल्या, काही काळ केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषविलेल्या रावसाहेब दानवे यांना सरकारी बंगल्यात आपले वास्तव्य चुकीचे आहे, असाही विचार करावा वाटला नाही हे आश्चर्यकारक आहे. मराठवाडा परिसरातच दानवे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही आहे. मराठवाडा परिसरातच दानवे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही आहे. राज्यभर प्रचार करत हिंडणा-या रावसाहेब दानवे यांनी मराठवाडय़ातच मुक्काम ठोकून भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला असता तर या पक्षाला थोडा फायदा तरी झाला असता, पण मराठवाडय़ातील अनेक नगरपालिकांत भारतीय जनता पार्टीचे पानिपत झाले आहे. स्वत: दानवे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगाही आमदार आहे. पण असे असूनही रावसाहेब दानवे यांना आपल्या गावातील नगरपालिकेची निवडणूक जिंकता आलेली नाही. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकात दखल घेण्यासारखे यश मिळवले आहे. हे मान्य करावेच लागेल. पण त्यात रावसाहेब दानवे यांनी प्रचार करून किती नगरपालिका पक्षाला जिंकून दिल्या याबद्दल पक्ष कार्यकर्त्यांच्या मनातही प्रश्नचिन्ह असेल. देवगड येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारविरुद्ध बोलणा-यांना तुरुंगात टाकू, अशी भाषा दानवे यांनी केली होती. पण त्यांच्या असल्या उद्धट पत्रकार परिषदेनंतरही देवगडच्या सूज्ञ मतदारांनी भाजपाला थारा दिला नाही. या नगरपालिकेतील सतरापैकी दहा जागा काँग्रेसने जिंकून दानवे यांना त्यांची जागा दाखवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय कसा बरोबर आहे, याचा अगदी पद्धतशीर प्रचार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या केडरमधून सुरू होता. मोदी यांचा निर्णय योग्य आणि देशहिताचा आहे, असे सव्र्हेही भारतीय जनता पार्टीकडून मॅनेज केले गेले, असे आरोप मध्यंतरीच्या काळात झाले आणि त्यात तथ्यही दिसत होते. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा खूप मोठा फटका शेतक-यांना ५०-१०० रुपयांवर मजुरी करणा-या शेतमजुरांना आणि ग्रामीण भागातील अन्य गरीब, जनतेला बसला. त्यामुळे नगरपालिका निवडणूक निकालांचा अभ्यास केला असता जाणवते, ग्रामीण जनतेचा आर्थिक व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँकेशी निगडित असतात, पण या बँकेच्या आर्थिक व्यवहारावरच बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे चिडलेल्या ग्रामीण मतदारांचा भाजपाला निश्चितपणे फटका बसल्याचे जाणवते.
२०१४ सालची लोकसभा निवडणूक गोपीनाथ मुंडे यांनी बीड मतदार संघातून जिंकली होती. त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनानंतर बीड लोकसभा मतदारसंघातील पोट निवडणूक त्यांच्या कन्येने जिंकली होती. त्यानंतर २०१४ सालीच झालेली त्या पसिरातील विधानसभा निवडणूक मुंडे यांची द्वितीय कन्या पंकजा मुंडे यांनी जिंकली. त्याहीनंतर अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आलेली वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही पंकजाताईनींच जिंकली. इतक्या लागोपाठच्या विजयानंतर मतदार आपल्याशिवाय जातात कुठे असा काहीसा गर्व त्यांच्या मनात निर्माण झाला असावा. या गर्वाचे घर खाली करून परळीच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना त्यांची जागा दाखविली. राज्य मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री म्हणजे बबनराव लोणीकर. या बबनरावांना आपल्या पत्नीलाही निवडून आणता आले नाही. दानवे, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांचे पाय जमिनीला टेकविण्याचे काम मतदारांनी केले आहे.
नारायण राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आपला पक्ष सहभागी होता. हा इतिहास दानवे यांना माहीत नाही. यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे राणेंच्या कार्यक्षेत्रात गेल्यानंतर तरी दानवे यांनी आपले शब्दलालित्य पाजळायला नको होते. पण त्यांना कोण सांगणार? पक्षाला चांगले यश मिळाले असले तरी अनेक ठिकाणी पराभवही झाला आहे. त्याबद्दल दानवे यांनी शांतपणे आत्मचिंतन करायला हवे, त्यासाठी भुजबळांच्या बाजूची खोली नक्कीच चांगली असेल.