सरकारच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाने टोमॅटो उत्पादक शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
मुंबई- सरकारच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी जणू सुलतानीचा सामना करत आहेत. देशात याविरोधात तीव्र आंदोलने सुरू असताना नाशिक परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकरीही या तुघलकी निर्णयाने पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
मुंबई, गुजरात, नवी दिल्लीसह देशाच्या विविध भागाला टोमॅटो पुरविणा-या नाशिकच्या मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव कोसळले. जुन्या नोटा घ्या नाही, तर आम्हाला तुमचे टोमॅटो नको, असा व्यापा-यांनी सूर काढला. त्यातही २० किलो टोमॅटोचे क्रेट फक्त ६० रुपयांना द्या अशी अडवणूक व्यापा-यांनी केल्यामुळे जुन्या नोटा घेण्यापेक्षा शेतक-यांनी रस्त्यावर टोमॅटोचे क्रेट फेकून दिले.
नाशिक कांद्याप्रमाणेच टोमॅटोची बाजारपेठ मानली जाते. गिरणारे येथे टोमॅटोचा मोठा बाजार भरतो. आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनही येथे व्यापारी येतात. मध्यंतरी टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने शेतक-यांनी मोठय़ा प्रमाणात लागवड केली आहे. अजूनही भाव चांगला मिळत होता. मात्र आता नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुधारित चलनच बाजारात उपलब्ध नसल्याने टोमॅटोची मागणी पार घटली आहे.
बुधवारी सकाळी सुमारे दीड लाख क्रेट टोमॅटो बाजारात आले होते. मात्र व्यापा-यांकडे नव्या नोटा नाहीत. सुट्टी रोकड नाही. त्यांनीही हात आखडता घेतला होता. टोमॅटो हे नाशिवंत पीक आहे. चार महिने कष्ट करून पिकविलेले टोमॅटो मोठय़ा आशेने बाजारात आणले आणि इथे मागणी नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले दिसत होते.
सकाळी बाजार सुरू झाला, परंतु व्यापा-यांकडे पैसे नसल्याने लिलावच सुरू झाला नाही. जेव्हा लिलाव सुरु झाले तेव्हा वीस किलोच्या क्रेटला ७० रुपये तर लहान आकाराचे टोमॅटो कोणीच खरेदी करेना. त्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यात अनेकांनी टोमॅटो रस्त्यावर व परिसरात फेकून निघून गेले. रुपया किलोचा भाव मिळत होता. मात्र त्याचा वाहतूकीचा खर्चही वसूल होण्याची स्थिती नव्हती. केंद्र शासनाची नोटबंदी टोमॅटो उत्पादकांसाठी मात्र पोटबंदी ठरली आहे. शेतमजुरांचे पैसे, उधार घेतलेल्या खताचे, फवारणीसाठी आणलेल्या किटकनाशकांचे पैसे कसे फेडायचे असा प्रश्न आता टोमॅटो उत्पादक शेतक-यांसमोर निर्माण झाला आहे.