जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दलितांची फसवणूक करुन पाच एकर जमीन लाटल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.
मुंबई- गंभीर आरोपांमुळे भाजपाचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिपद गमावल्यानंतर आता पाठोपाठ भाजपाचे दुसरे नेते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाच एकर जमीन लाटल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे ही जमिन महार वतनाची आहे. त्यावेळी महार वतन जमिन विक्रीचा नवा कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे ती जमिन दलितांची फसवणूक करुन जबरदस्तीने हडप करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
गिरीश महाजन यांची ही जमीन खरेदी बेकायदा आहे. त्यामुळेच त्यांनी जमिनीची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये लपवून ठेवली. आता ही बाब पुढे आल्याने माहिती देण्याचे अनावधानाने राहून गेले, असा आव महाजन आणत आहेत. मग या जमिनीभोवती कंपाऊंड कसे, त्या जागेत बागा कशा, त्या जमिनीवर सरकारी खर्चाने रस्ता कसा झाला? असे अनेक प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केले आहेत.
महाजन यांची ही जमिन खरेदी करण्यात चूक नव्हती तर आता ही जमिन परत करणार असे महाजन का सांगत सुटले आहेत. दरोडा टाकायचा आणि नंतर मुद्देमाल परत करण्याचा हा प्रकार आहे. ही बाब गंभीर असल्याचेही मलिक म्हणाले.
गुन्हा हा गुन्हाच असतो. महाजन यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जळगाव येथील नेते दिगंबर केशव पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार महाजन यांची निवड निवडणूक आयोगाकडून रद्द होईल अशी अपेक्षा मलिक यांनी व्यक्त केली.
आनंद कुलकर्णीची लोकायुक्तांकडे तक्रार करणार
पीडब्लूडी विभागात बदल्यांचा शेकडो कोटींचा घोटाळा करणा-या आनंद कुलकर्णी यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी कुलकर्णीचा भ्रष्टाचार विधिमंडळात उघड केला होता.
त्यामुळेच आकसापोटी त्यांनी पाटील यांच्या विरूद्ध लॉटरी घोटाळ्याचा आरोप केला आहे. लॉटरी बाबत विधीमंडळातही प्रश्न आला होता. त्यावेळी सरकारने या प्रकरणाची चौकशी सीआयडी किंवा सीबीआयकडून करण्याची घोषणा केली होती.
भाजपाचे आमदार राम कदम यांनी गोल्डन गँग लॉटरीच्या आनंद आनम यांची मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची भेट घालून दिली होती. या भेटीत नक्की काय झाले असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. शिवाय या भेटीची छायाचित्रेही त्यांनी पत्रकारांसमोर सादर केली.
काँग्रेसचे आरोप
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर गावातील पाच एकर जमीन गिरीश महाजन यांनी २००२ मध्ये कारखान्यासाठी विकत घेतली होती. मात्र या जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात न केल्याने महाजनांनी निवडणूक शर्तीचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. या कारखान्यात शेतक-यांना नोकरी देऊ, असे आश्वासन ही जमीन खरेदी करताना गिरीश महाजन यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात मागील १६ वर्षात या पाच एकर जमिनीवर ना कारखाना उभा राहिला, ना शेतक-यांना रोजगार मिळाला, असेही काँग्रेसने म्हटले आहे.