आपल्या शेतात लागलेली आग समजावी आणि ती तत्काळ आटोक्यात यावी यासाठी संगमेश्वर येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. नाईक यांनी एक उपकरण तयार केले आहे.
रत्नागिरी- शेती, बागायतींमधील वणवे, आग ही मोठी समस्या बनत चालली आहे. शेतात अचानक लागलेला वणवा विझवणे कठीण होते. आता मात्र, शेतक-यांना त्यापासून मुक्ती मिळणार आहे. आपल्या शेतात लागलेली आग समजावी आणि ती तत्काळ आटोक्यात यावी यासाठी आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.लक्ष्मण नाईक यांनी एक उपकरण तयार केले आहे.
शेतात आग लागली तर मोठ्याने धोक्याची घंटा वाजेलच, शिवाय शेतक-याच्या मोबाइलवर मेसेज जाईल.त्याचबरोबर ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची यंत्रणा सुरू होणार आहे. हे यंत्र शेतक-यांना वरदान ठरणार आहे.
सध्या वणव्यांचे प्रमाण खूप आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काहीवेळा या आगीत पूर्ण शेती नष्ट होत आहे. यामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. बहुसंख्य शेतीही घरापासून दूर असल्याने रात्री किंवा दिवसाही आग लागलेली शेतक-याला समजत नाही. यामुळे आग लागलेली असताना शेतकरी काहीच करू शकत नाही. मात्र यावर आता राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक लक्ष्मण नाईक यांनी अफलातून उपाय शोधला आहे. यासाठी त्यांनी एका उपकरणाची निर्मिती केली आहे. याची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली आहे.
या उपकरणाद्वारे शेतात आग लागली, तर प्रथम अलार्म वाजतो. त्याचबरोबर शेतक-याच्या मोबाइलवर मेसेजही जातो. शेतात ठिबक सिंचनासारखी यंत्रणा त्वरित सुरू होते. यातून आग आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे शेतक-याला हे उपकरण वरदान ठरणार आहे. हे उपकरण बहुद्देशीय असून याचा शेतक-यांना अनेक गोष्टीसाठी फायदा होणार आहे. शेतात जमिनीचा ओलावा संपला तर त्वरित ठिबक सिंचन यंत्रणा सुरू होणार आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा मनुष्यविरहित चालू शकते.
तंत्रज्ञानाच्या युगात शेतक-यांना या उपकरणाचा लाभ व्हावा व त्यांचे जीवनमान उंचावावे, हा उद्देश उपकरणाच्या निर्मितीमागे आहे. अशाच आणखी काही प्रकल्पांवर काम सुरू आहे. लवकरच ते सर्वांसमोर येतील, असे प्रा. लक्ष्मण नाईक यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची दरवर्षी निवड करण्यात येते. यावर्षी प्रा. नाईक यांच्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणाही करण्यात आली आहे.