रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला असून इथल्या नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत.
रत्नागिरी- कोकणात मान्सूनपूर्व पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. कोकणाच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला असून इथल्या नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत.
पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर झाडे कोसळल्याने तीन तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. लांजा तालुक्यातील कुवे येथे महामार्गावर एका ट्रकवर झाड कोसळ्याने वाहतूक खोळंबली आहे. कोकणातून मुंबईच्या दिशेने येणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत.
केरळमध्ये दाखल झालेला मान्सून अद्याप महाराष्ट्रात पोहोचला नसला तरी कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात विशेषकरुन किनारपट्टी भागात पावसाचा जोर जास्त आहे. पावसाच्या सरींमुळे मागच्या तीन-चार महिन्यांपासून उकाडयाने हैराण झालेल्या इथल्या जनतेला दिलासा मिळाला असून, वातावरणातही सुखद गारवा निर्माण झाला आहे.
मान्सून अंदमानच्या समुद्रात १४ मे रोजी दाखल झाल्यानंतर एक जून आधीच मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मान्सून अंदमानच्या समुद्रात २० मे पर्यंत पोहोचतो पण यंदा काहीदिवस आधी मान्सूनचे आगमन झाले.
यंदाच्या वर्षी पुरेसा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराजा सुखावला आहे.