आशिया चषक हॉकी स्पर्धेला बुधवारपासून (११ ऑक्टोबर) बांगलादेशमध्ये सुरुवात होत आहे. भारत आणि जपान यांच्यातील लढतीने स्पर्धेला प्रारंभ होत असून स्पर्धेद्वारे माजी विजेता भारत जागतिक क्रमवारीतील (रँकिंग) अव्वल स्थान राखण्याचा प्रयत्न करेल.
ढाका- आशिया चषक हॉकी स्पर्धेला बुधवारपासून (११ ऑक्टोबर) बांगलादेशमध्ये सुरुवात होत आहे. भारत आणि जपान यांच्यातील लढतीने स्पर्धेला प्रारंभ होत असून स्पर्धेद्वारे माजी विजेता भारत जागतिक क्रमवारीतील (रँकिंग) अव्वल स्थान राखण्याचा प्रयत्न करेल. आशिया चषकाच्या इतिहासात सर्वाधिक चार वेळा दक्षिण कोरियाने बाजी मारली आहे. मागील दोन खेपेस तेच अजिंक्य राहिलेत. दक्षिण कोरियानंतर ट्रॉफी उंचावण्याचा मान पाकिस्तान (तीन वेळा) आणि भारताने (दोन वेळा) मिळवला आहे. भारत गतउपविजेता आहे. भारताने (११०० गुण) आशियाई हॉकीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
दुस-या आणि तिस-या स्थानी असलेल्या अनुक्रमे पाकिस्तान आणि दक्षिण कोरियाचे समान १०२५ गुण असले तरी भारत आणि त्यांच्यात तब्बल ७५ गुणांचा फरक आहे. जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या रँकिंगवर आहे. गेल्या काही वर्षातील उंचावलेली कामगिरी पाहता भारताचा समावेश ‘अ’ गटात आहे. त्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह जपान आणि यजमान बांगलादेश आहे. ‘ब’ गटात गतविजेता दक्षिण कोरियासह मलेशिया, चीन आणि ओमान हे देश आहेत. माजी विजेता भारतासमोर पाकिस्तानचेच मोठे आव्हान असेल. भारताची गाठ जपानशी यंदा सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत पडली होती. त्यात भारताने ४-३ असा विजय मिळवला आहे. मात्र जपानला कमी लेखून चालणार नाही.
त्याच स्पर्धेत त्यांनी जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला हरवले होते. प्रतिस्पध्र्याला गृहित धरणार नसल्याचे भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगने म्हटले आहे.
‘‘प्रत्येक स्पर्धेत सलामीची लढत महत्त्वाची असते. त्यामुळे दमदार सुरुवातीसाठी आम्ही उत्सुक आहोत. चांगला खेळ करतानाच अव्वल रँकिंग राखण्याला आणि पुन्हा आशिया चषक जिंकण्याला आमचे प्राधान्य असेल. जपान एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे त्यांना सहज घेणार नाही. मात्र सातत्य पाहता भारताला अव्वल स्थान राखण्यासह पुन्हा ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे,’’ असे मनप्रीतने सांगितले. मायदेशात होणा-या एफआयएच हॉकी जागतिक लीग फायनलपूर्वीची शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने भारताला त्यांची बलस्थाने तपासून पाहता येतील. युवा हॉकीपटूंना अधिक संधी मिळण्याहेतूने भारताने गोलकीपर आकाश चिकटे आणि सूरज करकेराला कायम ठेवले आहे. युरोप दौ-यात विश्रांती दिलेल्या बचावपटू हरमनप्रीत सिंग आणि सुरेंदर कुमारला पुन्हा संधी दिली आहे. माजी कर्णधार सरदार सिंग, आकाशदीप सिंग, सतबीर सिंग आणि एस. व्ही. सुनीलमुळे संघात नव्या-जुन्यांचा सुरेख मेळ साधला गेला आहे. भारताचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक जोएर्ड मॅरिन यांचा प्रशिक्षक म्हणून पहिलाच दौरा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी कशी होते, याचीही उत्सुकता आहे. पाकिस्तानसमोर यजमानाचे आव्हान ‘अ’ गटातील दुस-या लढतीत माजी विजेता पाकिस्तान यजमान बांगलादेशशी झुंजेल. या लढतीत पाकिस्तानला विजयाची संधी आहे.
टीव्हीएस टायर्सचे आर्थिक पाठबळ
हीरो आशिया चषक २०१७ स्पर्धेला टीव्हीएस टायर्सचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. या स्पर्धेचे ते ‘को-प्रेझेंटिंग स्पॉन्सर’ असतील. ‘‘हॉकी हा भारताचा राष्ट्रीय तसेच जगातील अव्वल खेळ आहे. आशिया चषकाच्या माध्यमातून आशिया चषकाशी संलग्न होण्याची मोठी संधी आम्हाला मिळाली,’’ असे टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेडचे संचालक पी. विजयराघवन यांनी म्हटले आहे. यापूर्वी, आयपीएल, हॉकी इंडिया लीग, आशियाई चँपियन्स ट्रॉफी, इंडियन सुपर लीग आदी प्रमुख स्पर्धाना टीव्हीएस टायर्सचे प्रायोजकत्व लाभले आहे.
[EPSB]
[/EPSB]