उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानची पूर्ण कोंडी करण्यासाठी भारताने विविध बाजूंनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली- उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानची पूर्ण कोंडी करण्यासाठी भारताने विविध बाजूंनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवरेट नेशन’ या दर्जाचा पुनर्विचार सुरू केला आहे.
जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत ‘गॅट’ कराराअंतर्गत भारताने १९९६ मध्ये ‘मोस्ट फेवरेट नेशन’चा दर्जा दिला होता. व्यापारासाठी चांगला भागीदार देश म्हणून भारताने ही कृती केली होती. मात्र, उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात फास आवळण्यास सुरुवात केली आहे.
या अंतर्गत पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवरेट नेशन’च्या दर्जाचा पुनर्विचार भारताने सुरू केला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एक बैठक आयोजित केली होती.
सिंधूअस्त्राने पाक घायाळ
इस्लामाबाद- भारताने सिंधू पाणी वाटप कराराचा फेरविचार सुरू केल्यानंतर पाकिस्तान घायाळ झाला आहे. भारताने हा करार रद्द केल्यास आम्ही त्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू, असे स्पष्टीकरण पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी केले. हा करार रद्द झाल्यास पाकिस्तानला व त्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.