भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिला डाव ८ बाद ५६६ धावांवर घोषित केला असून वेस्ट इंडिजसमोर फॉलोऑन वाचवण्याचे आव्हान आहे.
नॉर्थ साउंड, अँटिगा- कर्णधार विराट कोहलीच्या (२००) तडाखेबंद द्विशतकानंतर अष्टपैलू आर. अश्विन (११३) आणि अमित मिश्राच्या (५३) बहुमुल्य योगदानाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिला डाव ८ बाद ५६६ धावांवर घोषित केला. दुस-या दिवसअखेर यजमानांनी १ बाद ३१ धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर फॉलोऑन वाचवण्याचे आव्हान आहे.
दुस-या दिवशी तासाभराचा खेळ शिल्लक असताना भारताने पहिला डाव घोषित केला. क्रेग ब्राथवेट आणि राजेंद्र चंद्रिकाने सावध सुरुवात केली तरी मध्यमगती मोहम्मद शामीने भारताला पहिले यश मिळवून दिले. दिवसातील सेकंड लास्ट षटकात त्याने चंद्रिकाला यष्टिरक्षक वृद्धिमान साहाकडे झेल देण्यास भाग पाडले. चंद्रिकाने ४३ चेंडूंत २ चौकारांसह १६ धावा केल्या. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक मारा केला. यजमानांवर फॉलोऑन वाचवण्याचे आव्हान आहे.
पहिल्या कसोटीत भारताला ५६६ अशी मोठी धावसंख्या रचून देण्यात अष्टपैलू अश्विनचाही खारीचा वाटा आहे. त्याने २५३ चेंडूंत १२ चौकारांसह ११३ धावांची चमकदार खेळी केली. पाच वर्षांच्या कारकीर्दीतील अश्विनचे हे तिसरे शतक आहे. योगायोग म्हणजे तिन्ही शतके वेस्ट इंडिजविरुद्धची आहेत. २०११मध्ये मायदेशातील मुंबई कसोटीत त्याने १०३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी कोलकाता कसोटीत १२४ धावांची खेळी साकारली होती. कसोटीत तीन शतकांसह सहा अर्धशतकेही त्याच्या नावावर आहेत. अश्विनने स्पेशालिस्ट फलंदाजाला साजेशी कामगिरी केली. मात्र तोही एक चांगला बॅट्समन आहे, हे विसरू नका. देशांतर्गत क्रिकेटमध्यं ६७ सामन्यांत ५७.९३च्या सरासरीने २३७४ धावा अश्विनच्या नावावर आहेत. त्यात चार शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
अश्विनचे शतकही विक्रमी ठरले. वेस्ट इंडिजमधील वैयक्तिक पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा चौथा फलंदाज आहे. अश्विनपूर्वी पॉली उम्रीगर, ब्रिजेश पटेल आणि संजय मांजरेकरने अशी करामत साधली होती. योगायोग म्हणजे टेन क्रिकेट चॅनेलचा कॉमेंटेटर म्हणून संजय मांजरेकर सध्या वेस्ट इंडिजमध्येच आहे. अश्विनपाठोपाठ लेगस्पिनर अमित मिश्रानेही फलंदाजीचा आनंद लुटला. त्याने ६८ चेंडूंत ५३ धावा फटकावल्या. त्याने ६ चौकार लगावले. मिश्राचे १९ कसोटींमधील हे तिसरे अर्धशतक आहे.
कोहलीनंतर अश्विन आणि मिश्राच्या बहारदार फलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी तीन विकेट देवेंद्र बिशू आणि क्रेग ब्राथवेटने घेतल्या. ब्राथवेटने १४.५ षटकांत ६५ धावा दिल्या. मात्र लेगब्रेक बिशूला ४३ षटकात तब्बल १६३ धावा मोजाव्या लागल्या. पहिलीच कसोटी खेळणारा ऑफब्रेक रॉबिन चेसनेही ३४ षटकांत शंभरहून अधिक दिल्या.