स्त्रीभ्रूण हत्या आम्ही आमच्या समाजातून, विचारातून जोपर्यंत हद्दपार करत नाही, स्त्रीला सन्मान देत नाही, मुलींची जोपासना करीत नाही, स्त्रीच्या सुरक्षेसाठी खवळून उठत नाही, तोपर्यंत ही चळवळ चालूच राहील. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा सर्व गोष्टींचा विचार केल्यास अनेक प्रश्न सुटतील. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उद्धारी, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ घरातील एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब सुसंस्कारित होते. खरोखरच आहे म्हणा.
स्त्री ही प्रेम, ममता, माया यांची जिवंत मूर्ती आहे. आपली आई, बहीण, मावशी, मामी, काकी, आजी या पण स्त्रियाच आहेत ना! त्यांच्या उबेत अपार माया आहे. त्या सर्वाची काळजी घेतात, सर्वाना माया लावतात. आई ही फक्त आईच असते. सर्वाची काळजी घेणारी, प्रेमाने घास भरवणारी, वेळप्रसंगी मार्गदर्शन करणारी! म्हणूनच म्हणतात, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.’
अशा स्त्रीचा जन्म होण्यापूर्वीच तिची गर्भातच हत्या केली जाते. हे कृत्य अशोभनीय आहे. राजस्थान, हरियाणासारख्या राज्यात मुलीचा जन्म झाला तर तिला दुधाच्या पिंपात बुडवून तिचे आयुष्य संपविले जाते. मग का नाही स्त्रियांची संख्या कमी होणार?
आपल्या मुली बाहेर मुक्त फिरू शकत नाहीत. त्यांच्यावर नको ती बंधने लादली जातात. त्यांच्या वागण्या-बोलण्यावर प्रतिबंध घातला जातो.
अनेक ऐतिहासिक स्त्रिया जशी झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे, वीर जिजामाता, सावित्रीबाई फुले या पण स्त्रियाच होत्या ना? त्यांनी अलौकिक कीर्ती मिळवली व त्या आजही अजरामर आहेत. मग का? कशासाठी? स्त्रीभ्रूण हत्येसारख्या कृत्यात पापाचे धनी होतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीसारख्या स्त्रीने भारतावर राज्य केले. प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती पद यशस्वीरित्या लीलया पेलले.
किरण बेदी या पोलीस संरक्षणकर्त्यां बनल्या, कल्पना चावला व सुनिता विल्यम यांनी अंतराळात यशस्वी पाऊल ठेवले, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व आशा भोसले यांनी स्वरांची दुनिया गाजवली व त्या अजूनही सर्वाच्या मनावर राज्य करत आहेत. आज सर्व क्षेत्र स्त्रियांनी चांगलेच दणाणून सोडले आहे.
खेळाच्या क्षेत्रातही पी. व्ही. सिंधू व साक्षी मलिक यांनी मैदान गाजवून सर्व जगाला दाखवून दिले, की हम भी कूच कम नही. आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
मृणालताई गोरे, सिंधुताई सपकाळ यांनी सामाजिक सुधारणा, न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी सदैव कार्य केले. सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. पृथ्वीपासून अवकाशापर्यंत त्यांनी कष्ट व जिद्दीने पल्ला गाठला आहे. त्यातही त्यांना मागे ओढणारे समाजकंटक कमी नव्हते!
आज कितीतरी बालिका ‘नकोशी’ म्हणून जगत आहेत. कित्येकांचा तर या जगात येण्याचा अधिकारही हिरावून घेतला जातो. मानव रानटी अवस्थेत वावरताना टोळींच्या सदस्यांवर त्यांची ताकद अवलंबून असे, म्हणूनच ते दुस-या टोळीला हरवून त्यांच्या स्त्रियांना बंदी बनवून आणत असत.
कालांतराने मानवाने भटकंती सोडून तो स्थिर झाला; पण स्त्रियांच्या शारीरिक क्षमता, शरीर मर्यादा इत्यादींमुळे त्यांना अंगमेहनतीची कामे पुरुषांप्रमाणे शक्य नसत. म्हणून स्त्रियांना घरकामे आणि बालसंगोपन यांमध्ये जखडून पडावे लागले. अशातही त्यांना पळवून नेण्याची शक्यता असायची, मग त्या इतरांच्या नजरेत पडू नये म्हणून घुंगट, बुरखा, पडदा, डोक्यावरून पदर वगैरे रूढी पडल्या.
त्यानंतर मुलगी मोठी झाल्यानंतर तिची आई-वडिलांना काळजी वाटायची. काही समाजकंटक त्या बापावर उपकार केल्यागत ‘वरदक्षिणा’ उकळीत असत. दुर्दैवाने जर मुलीच्या पतीचे निधन झाले, तर मग त्या मुलीच्या ससेहोलपटीला काही निर्बंध उरत नसे.
पती निधनानंतर अनेक दूषणे स्त्रीला दिली जात असत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार असे. ही अवहेलना सहन करून दररोज जाळण्यापेक्षा एकदाच त्या मुली मृत पतीसह अग्निप्रवेश करायच्या. पुढे ही रूढीच बनली, या सर्व गोष्टी मुलींच्या आई-वडिलांना उघडय़ा डोळय़ांनी पाहाव्या लागत.
कालांतराने राजाराममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद केली, महात्मा फुले, शाहू महाराज, टिळक, आगरकर, आंबेडकर, महात्मा गांधी, सावरकर अशा अनेक समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून समाजात सुधारणा घडून आणली.
मुलीच्या आयुष्यात असे हृदयद्रावक प्रसंग घडताना पाहून त्या कुटुंबातील लोकांना मरणप्राय यातना सहन कराव्या लागतात. शतकानुशतके याच सामाजिक परिस्थितीने समाजाला जखडून ठेवले आहे.
आजही मुली सुरक्षित आहेत का? कोणत्याही गोष्टींचा हक्क त्यांना आहे का? ५० % आरक्षण केवळ कागदावरच आहे. एकटय़ा स्त्रीकडे समाज कोणत्या नजरेने पाहतो? स्त्री अधिकारी असलेल्या ठिकाणी तिच्या हाताखाली काम करणारी पुरुष मंडळी कशी वागतात? आणि कनिष्ठ सहकारी स्त्री असेल तर पुरुष अधिकारी तिच्याशी कसे वागतात? महिला पोलिसांना किती समस्यांना तोंड द्यावे लागत आहे? हे प्रश्न आजही अस्वस्थ करतात.
आर्थिक, सामाजिक, जातीय, कौटुंबिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानसिक अशा अनेक आघाडय़ांवर स्त्रियांची कुचंबना करून त्यांची लैंगिक पिळवणूक करणे आदी प्रकार घडतच असतात.
स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी यांसारख्या समाजविघटक गोष्टींना स्त्रीच आळा घालू शकते, ही पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियांनीच बनवली आहे, याचा विसर पडता कामा नये. बलात्कार, विनयभंग यांसारख्या विकृतीला स्त्री बळी पडत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा, अस्मितेचा प्रश्न उद्भवू लागला आहे. याचा सखोल विचार करून यातून मार्ग एक स्त्रीच चांगल्या पद्धतीने काढू शकते. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीद प्रत्येकीने अंगी बाळगले पाहिजे. तेव्हाच आपण ख-या अर्थाने सावित्रीच्या लेकी शोभू!
स्त्रीभ्रूण हत्या हा विचार करणारा कोणी एक नाही, ‘मुलगी नको’ या विचाराने ग्रस्त आणि त्रस्त झालेला पिता, गर्भनिदान करून घेणारी माता, गर्भनिदान करून देऊन प्रत्यक्ष स्त्रीभ्रूण हत्या करणारा डॉक्टर, तसेच हे प्रकार रोखण्यासाठी नेमलेली कार्यतत्पर आणि कार्यकुशल शासकीय यंत्रणा अशा प्रकारात सापडलेल्यांना सहीसलामत सोडविणारे राजकीय पाठीराखे आणि हे सर्व उघडय़ा डोळ्यांनी पाहणारे सारी लोकं आहेत.
स्त्रीभ्रूण हत्या आम्ही आमच्या समाजातून, विचारातून जोपर्यंत हद्दपार करत नाही, स्त्रीला सन्मान देत नाहीत, मुलींची जोपासना करीत नाही, स्त्रीच्या सुरक्षेसाठी खवळून उठत नाही, तोपर्यंत ही चळवळ चालूच राहील. समाज प्रबोधन, महिला सबलीकरण, महिलांची सुरक्षितता, महिलांवरील अत्याचार अथवा अन्याय यासाठी जरब बसेल अशा शिक्षेची तरतूद आणि अंमलबजावणी करणारी नि:पक्षपाती सक्षम यंत्रणा राबविली पाहिजे.
विशेषकरून स्वत: स्त्रीने प्रसूतीपूर्व गर्भलिंग चाचणीस ठाम नकार देण्यास शिकले पाहिजे. मुलीच्या लग्नाचा अवाढव्य खर्च, हुंडा मागण्याची मानसिकता आणि इतर शैक्षणिक खर्च याची तजवीज सरकारने रोख स्वरूपात करावी. मुलगी जन्माला आल्यावर तिच्या नावाने भरघोस रक्कम ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून ही रक्कम तिच्या उच्चशिक्षणासाठी आणि विवाहासाठी वापरली जाऊ शकेल.
मुलींच्या संगोपनासाठी पालकांना काही रक्कम मुलगी १५ वर्षाची होईपर्यंत दरमहा द्यावी. पदवीपर्यंतचे शिक्षण व व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत मिळावे अशा प्रकारच्या योजना शासनातर्फे राबविता येतील आणि मग प्रत्येक जण म्हणेल ‘बेटी म्हणजे धनाची पेटी व घराची लक्ष्मी, नित्य येई तेथे आनंदी भेटी! आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा सर्व गोष्टींचा विचार केल्यास अनेक प्रश्न सुटतील आणि ख-या अर्थाने महिला दिनाची नवी पहाट होईल!