जम्मू-काश्मीरचा प्रश्न सुटायचा असेल, तर अपवादात्मक स्थितीत का होईना फुटीरतावादी गटांशी चर्चा करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली- जम्मी-काश्मीरचा प्रश्न सुटायचा असेल, तर अपवादात्मक स्थितीत का होईना फुटीरतावादी गटांशी चर्चा करणे आवश्यक आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही अशी चर्चा केली होती.
मात्र, सध्या कुणीही फुटीरतावाद्यांशी चर्चा करायचा विषय काढला तरी त्याला देशद्रोही ठरवले जाते. हाच न्याय लावायचा झाला तर मग वाजपेयी यांनाही देशद्रोही म्हणायचे का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांकडून करण्यात आलेला हिंसाचार, त्यामुळे निवडणुकीत झालेले अत्यल्प मतदान आणि पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल त्यांनी भाष्य केले.
सिन्हा यांनी म्हटले आहे की, काश्मिरात आतापर्यंत हिंसाचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही आपला जीव धोक्यात घालून मतदान करायचे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर फुटीरवाद्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. तसेच त्यांच्याशी चर्चा करणा-या प्रत्येकावर देशद्रोहीपणाचा शिक्का मारण्याची सवय सोडून द्यावी.
काश्मीर खोयात शांतता प्रस्थापित करायची असेल तर फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. भाजप आणि पीडीपीने आश्वासन दिल्याप्रमाणे काश्मीरमधील सर्व घटकांना चर्चेत सामावून घेतले पाहिजे, असेही सिन्हा यांनी सांगितले.
वाजपेयी पंतप्रधान असताना काश्मिरी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सरकारने येथील अनेक घटकांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. काश्मीर समस्या युद्धाने नव्हे, तर चचेर्तूनच सुटेल, असा विश्वास वाजपेयी यांना वाटत होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात काश्मिरी जनतेच्या आशा उंचावल्या होत्या. मोदी सरकार सत्तेवर आल्याने वाजपेयींच्या पावलावर पाऊल टाकले जाईल आणि ही घुसमट संपेल अशी काश्मिरी जनतेची अपेक्षा होती.
पण वाजपेयींच्या मागार्ने काश्मीर प्रश्न सोडविण्याची संधी पंतप्रधान मोदी यांनी गमावली आहे, असे परखड मत रिसर्च एंड एनालिसिस विंग अर्थात रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख व वाजपेयी सरकारमधील काश्मीरविषयक सल्लागार ए एस दुलाट यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या ७० वर्षांपासून सुधारु शकलेले नाहीत. विश्वासाच्या अभावामुळे हे सगळे घडत आहे. जोपर्यंत पाकिस्तान प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या पवित्र्यात आहे तोपर्यंत कोणत्याही चर्चेला अर्थ नाही. हे जरी खरे असले तरी कुठून तरी एका चानागाली सुरुवात होणे आवश्यक आहे, असे वाटते.
– यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री