यूजीसीनं जंकफूडवर घातलेल्या बंदीबाबत विद्यार्थ्यांमध्ये परस्परविरोधी मतं आढळतात. विद्यार्थ्यांच्या मते जंकफूडवर सरसकट बंदी नको. निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असायला हवं. महाविद्यालयाच्या मुक्त वातावरणात गप्पा मारत कॅन्टीनमध्ये बसण्यात आणि त्या गप्पांमध्ये मनसोक्त साथ देण्यात कॅन्टीनच्या काही वैशिष्टय़पूर्ण ‘टेस्ट’चा महत्त्वपूर्ण वाटा असतो.
गेल्या महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) एका पत्रकाद्वारे महाविद्यालयाच्या कॅन्टीनमधील जंक फूडवर बंदी घातली. ‘महाविद्यालयात जंकफूडवर बंदी घालण्यानं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उत्तम आरोग्याचे नवे निकष तयार होतील आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य सुधारेल. उत्तम आहारविहाराचे नियम विद्यार्थी शिकतील. त्यातून मुलांच्या स्थूलतेचं प्रमाण कमी होईल.
स्थूलतेशी जीवनशैलीच्या आजारांशी थेट संबंध असतो. जंकफूड खाणं आणि वजन वाढणं याचा संबंधही या आजारांशी असतो,’ असा उल्लेख यूजीसीनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भात यूजीसीनं उचललेलं हे एक सकारात्मक पाऊल आहे. मात्र या यादीत कोणते पदार्थ म्हणजे जंकफूड हे यूजीसीनं स्पष्ट केलेलं नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आहाराचा विचार होतो तेव्हा लक्षात येतं की सकाळी ७.३०च्या लेक्चरला उठून येताना नाश्त्याला सुट्टी देणं ही अनेक विद्यार्थ्यांची सवय आहे.
लेक्चर सुरू असताना कॅन्टीनमध्ये होत असलेल्या तयारीचा वास घमघमायला लागला की इकडे विद्यार्थी बेचैन होतात. अनेकदा भुकेमुळे लेक्चरमध्ये लक्ष लागत नाही. रिसेसमध्ये फक्त कॅन्टीनच नाही तर महाविद्यालयाच्या आजूबाजूला असलेल्या खाऊच्या गाडय़ांवर, फूड कॅार्नरवर अनेक विद्यार्थी ‘पडीक’ असतात. वडापावपासून, चायनीज भेळ, फ्रँकी, मिसळ पाव, पाणीपुरी वगरे पदार्थ नाश्ता म्हणून विद्यार्थी रोज ज्या सहजतेनं खातात ते बघून आश्चर्यचकित व्हायला होतं.
माझ्या बघण्यात असेही काही विद्यार्थी होते जे दर दिवसाआड चायनीज खायचे आणि पाण्याऐवजी दिवसभर कोल्ड्रिंग प्यायचे. त्याचे दुष्परिणाम जाणवल्यानंतर आज हे सगळे पदार्थ कायमस्वरूपी बंद करावे लागले. याशिवाय ऑस्ट्रिओपोरोसिस नावाचा आजार – ज्यात हाडं ठिसूळ होतात आणि साधारणपणे वयाच्या ५० नंतर हा आजार होतो. आजारी झालेले विद्यार्थीही मला माहिती आहेत. या आजाराचं मूळ कारण चुकीच्या आहारात असल्याचं वैद्यकीय निदानात स्पष्ट झालं आहे.
लेक्चर्स व्यतिरिक्त परीक्षा काळातही (मग पेपर सकाळी ८ वाजता असो किंवा ११ वाजता) डहाणू, पालघर भागातून येणा-या विद्यार्थ्यांना शटल किंवा ट्रेनच्या वेळापत्रकानुसार सकाळी लवकर घर सोडावं लागतं. त्यात परीक्षेचा अभ्यास रात्री जागून करण्याची सवय असते. त्यामुळे पहाटे अर्धवट झोपेत नाश्त्याला सुट्टी देऊन एक कप चहा पिऊन अनेक विद्यार्थी महाविद्यालयात येतात. याचा नको तो परिणाम म्हणजे पेपर लिहिताना चक्कर येणं, उलटय़ा होणं, अॅसिडीटी वाढणं, डोकं प्रचंड दुखणं आणि त्यामुळे परीक्षा बुडणं. हाच संदर्भ घेऊन मी अनेकदा बॅचलर ऑफ मास मीडियाच्या म्हणजे बीएमएमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असते.
स्वत: प्रसारमाध्यमात काम केलेलं असल्यानं शिफ्ट डय़ूटीज्, कामाच्या अनियमित वेळा, अनेक तास ऑफिसमध्ये एकाच जागी बसून करावं लागणारं काम, फिल्डवर असाल तर जेवणा-खाण्यापासून फ्रेश होण्यापर्यंत लहान लहान गोष्टींची होणारी आबाळ, सतत डेडलाइन्स पाळण्याच्या टेन्शनमुळे खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळता न येणं, यामुळे घरच्या अन्नापेक्षाही बाहेरचं खाणं खाण्याची वाढणारी प्रवृत्ती या सगळ्यांमुळे शरीरावर होणारे परिणाम खूप जवळून बघितले आहेत.
बदलणारी जीवनशैली आणि आरोग्य हा आज अनेक घरांमध्ये कळीचा मुद्दा बनला आहे. म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांनाही यासंदर्भात जागरूक करावं, आतापासूनच त्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करायला शारीरिकदृष्टय़ाही फीट कसं राहावं, याचं थोडं फार मार्गदर्शन मी माझ्या लेक्चर्समध्ये नेहमी देत असते.
यासंदर्भात जेव्हा विद्यार्थ्यांशी चर्चा होते त्यावेळी त्यांचा प्रश्न असतो की, हे सगळं आम्ही खायचंच नाही का? मिळणा-या पॉकेटमनीमध्ये हे असं स्वस्त आणि पोटभरीचे पदार्थ सहज खाता येतात. यावर माझा प्रश्न असतो की पण ते पौष्टिक किती असतात? जिभेला चांगले वाटणारे सगळेच पदार्थ शरीरासाठी चांगले असतीलच असं नाही. ‘मग काय आता शाळेसारखा पोळी-भाजीचा डबा आणायचा का?’ असा तिरकस प्रश्न हमखास विद्यार्थ्यांकडून येतो. यावर मी एक गोष्ट नेहमीच स्पष्टपणे सांगते की, कोणी काय खायचं आणि काय खायचं नाही याबाबत मी सक्ती करूच शकत नाही.
पण काही पर्याय सुचवू शकते. जसं की सकाळी कपभर चहा प्यायला वेळ असतो त्यामध्ये चहासोबतच एक पोळी (चपाती) खायची, ती आईला रात्रीच करून ठेवायला सांगायची. स्वत:जवळ चिक्की, चणेदाणे, उकडलेलं अंड, जर शक्य असेल तर फळं (तीसुद्धा त्या त्या मोसमात मिळणारी), सुकामेवा, काकडी, गाजर, टोमॅटोचे काप ठेवा. धावतपळत ट्रेन, बस पकडल्यानंतर सावकाशपणे यापैकी ज्या गोष्टी तुमच्या बॅगेत असतील त्याचा आस्वाद घ्या. कॅन्टीनमध्ये जायचंच नाही अशी सक्ती मी करूच शकत नाही पण तिथे जाण्याअगोदर जर घरून आणलेले वरीलपैकी काही पदार्थ खाल्लेत तर तीनऐवजी दोनच वडापाव खाल असंही मी स्पष्ट करते.
हे असे पर्याय सुचविल्यानंतर विद्यार्थ्यांना अशाप्रकारे मार्गदर्शन करायला कोणीतरी लागतं हा माझा अनुभव आहे; कारण आतापर्यंत हे खाऊ नका, ते खाऊ नका असं अनेक जण सांगतात, पण त्याऐवजी काय खायचं हे मात्र कोणीही सांगत नाही. आमच्या या अशा चर्चा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी जाणीवपूर्वक आहारविषयक पुस्तकं वाचतात, त्यावर आपसात चर्चा करतात.
शक्य तितके आहारात बदल करण्याचे प्रयत्न करतात. सोडाबेस कोल्डिड्रक्सपेक्षा स्मूदीज् घेतात. हे अर्थात विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर कळतं. पण विद्यार्थीही आवर्जून येऊन, भेटून हे सांगतात. फक्त बीएमएमचेच विद्यार्थी नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, स्पर्धामध्ये भाग घेतलेले विद्यार्थीही हल्ली आपल्यासोबत घरून आणलेला पोळी-भाजीचा डबा खाताना दिसतात. यामागे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखणं हाच उद्देश असतो.
म्हणूनच यूजीसीनं जंक फूडवर घातलेल्या बंदीबाबत विद्यार्थ्यांमध्ये परस्परविरोधी मतं आढळली. विद्यार्थ्यांच्या मते जंक फूडवर सरसकट बंदी नको. निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असायला हवं. महाविद्यालयाच्या मुक्त वातावरणात गप्पा मारत कॅन्टीनमध्ये बसण्यात आणि त्या गप्पांमध्ये मनसोक्त साथ देण्यात कॅन्टीनच्या काही वैशिष्टय़पूर्ण ‘टेस्ट’चा महत्त्वपूर्ण वाटा असतो.
काही विद्यार्थ्यांनी ‘आता कॅन्टीनमध्ये पोळी-भाजी, पिठलं-भाकरी असे पदार्थ मिळणार आहेत का?’ असाही प्रश्न विचारून मला बुचकळ्यात टाकलं होतं. अनेक विद्यार्थ्यांच्या मते कॅन्टीनमधून जंकफूड हद्दपार केलं तरी महाविद्यालयाच्या आजूबाजूला जी सुसज्ज जंक फूड हॉटेल्स असतात तिथे जाऊन विद्यार्थी नक्कीच हे पदार्थ खातील. म्हणूनच तरुणांच्या आरोग्याचे प्रश्न अशा बंदीनं खरंच सुटतील का? हा विद्यार्थ्यांचाच प्रश्न विचार करण्याजोगा आहे हे नक्की!