आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र जनतेची सेवा करणा-या पोलिसांवर होणा-या हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
मुंबई- आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र जनतेची सेवा करणा-या पोलिसांवर होणा-या हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कायद्याचा कुणालाही धाकच न राहिल्याने पोलिसांवर सातत्याने हल्ले होत आहेत. मात्र, तरीही राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करत यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही.
त्यामुळे, आता पोलिसांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणारी त्यांची संघटना तयार व्हायला हवी. जेणेकरून पोलिसांचे प्रश्न सत्ताधा-यांपर्यंत पोहोचवता येतील. यासाठी कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी राज्यभरात पोलिसांसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
वरळी पोलीस कॅम्प, नायगाव-दादर पोलीस वसाहत या मुख्य ठिकाणांसह पुणे, सोलापूर अरविंद धाम पोलीस वसाहत, ठाणे , पिंपरी-चिंचवड, सांताक्रूझ, वांद्रे, लोणावळा, चेंबूर, नवी मुंबई, खालापूर, मालाड, बोरिवली पोलीस वसाहत, कांदिवली-दहिसर, मीरा-भाईंदर, काशीमीरा पोलीस स्टेशन, नागपूर, नालासोपारा पोलीस स्टेशन, पेण, उल्हासनगर, पालघर, वाडा व कोल्हापूर आदी ठिकाणी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरू राहिल्यास स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांवर हल्ले चढवणा-या हल्लेखोरांविरोधात कायदा हातात घेतील, अशा इशाराही आ. नितेश राणे यांनी सरकारला दिला आहे. या मोहिमेला पोलिसांसह अन्य नागरिकांनीही मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला. दरम्यान, येते तीन दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.