वाहतूक कोंडीवर मात करण्यांसाठी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शुक्रवारी आयुक्त ई.रविंद्रन यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
कल्याण- कल्याण व डोंबिवली शहरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. त्यांची क्षमता सहन करण्यापलीकडे झाली असल्याने, वाहतूक कोंडीवर मात करण्यांसाठी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शुक्रवारी आयुक्त ई.रविंद्रन यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस उपायुक्त डॉ.संजय शिंदे, सहा. मोटार वाहतूक निरीक्षक मासुमदार, सहा. पोलीस आयुक्त तसेच डोंबिवलीतील सर्व पक्षीय गटनेते उपस्थित होते.
महापौरांनी डोंबिवली शहरातील वाहतूक समस्येवर उपाय योजना करण्याकरता उपस्थितांना संक्षीप्त स्वरूपात सूचना मांडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यावर मंदार हळबे, गटनेता मनसे यांनी पश्चिमेकडून येणा-या गाडय़ांना टंडन रोडकडे ‘नो एंट्री’ असावी तसेच इतर सूचना केल्या.
रस्त्यांचे फॅनिंग करणे आवश्यक आहे. केळकर रोडवर २ रिक्षा स्टँड आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी रिक्षा स्टँडचे स्थलांतर करावे. शिवाय रस्त्यावरी बेकायदा होर्डिग्ज काढून टाकावीत. रस्त्याला अडथळा ठरणारे ट्रान्सफार्मर काढून टाकावेत, आदी सूचना करण्यात आल्या.
तसेच शहरात विना परवानगी चालणा-या सुमारे ५० रिक्षा असून त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीला सभागृह नेते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या सूचना ऐकल्यावर पोलीस उपायुक्तांनी वाहतूक पोलिसांना रिक्षांचे संचलन योग्य पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले. तर बेकायदा रिक्षा स्टँडवर तसेच विनापरमीट रिक्षांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आयुक्त ई.रवींद्रन यांनी डोंबिवली विभागाच्या सहा पोलिस आयुक्तांना येत्या तीन दिवसांत डोंबिवलीतील वाहतुकीचा आराखडा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. या आराखडयानुसार महापालिका, वाहतूक विभाग, पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने बेकायदा घटकांवर कारवाई करण्यात येणार आहे.