मुजोर रिक्षा चालकांनी एसटी चालकाला केलेल्या मारहाणीनंतर इतके दिवस झोपेचे सोंग घेतलेल्या कल्याण आरटीओ आणि वाहतूक विभागाला जाग आली असून त्यांनी अखेर या रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे.
कल्याण- मुजोर रिक्षा चालकांनी एसटी चालकाला केलेल्या मारहाणीनंतर इतके दिवस झोपेचे सोंग घेतलेल्या कल्याण आरटीओ आणि वाहतूक विभागाला जाग आली असून त्यांनी अखेर या रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत रिक्षाची कागदपत्रे आणि परवाना नसल्याने १३८ रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून १०३ रिक्षा जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली आहे.
अलिबागहून कल्याणला येणारी बस कल्याण आगारात शिरत असताना पुढे रिक्षा उभी होती. ती पुढे नेण्याची विनंती बसचालक सुरेश भोसले यांनी रिक्षाचालकाला केली आणि त्यावरून वाद होऊन सलीम पठाण या रिक्षाचालकाने बसचालक भोसले यांना मारहाण केली, तसेच महिला वाहकालाही धक्काबुक्की केली.
याप्रकरणी या रिक्षाचालकाला अटक झाल्यानंतर वाहतूक विभागाला जाग आली आणि त्यांनी कल्याणमधील काही मुख्य रस्त्यांवर धडज्ञक कारवाई केली. या कारवाईत रिक्षेची कागदपत्रे परवाने नसलेल्या १३८ रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून १०३ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
यात प्रामुख्याने कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडीच्या रिक्षांचा समावेश होता. उशिराने का होईना, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना जाग आली असून त्यांची ही कारवाई किती दिवस चालते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.