..सुरुवातीला सुरू झालेल्या त्याच गाडया कोकणकन्या, मांडवी आजही त्याच स्थितीत असल्याने डब्यांचा कलर गेलेला, पत्रे सडलेले, खिडक्या नादुरुस्त अशा स्थितीत आहेत. या गाडयांचा एक वेगळा लूक असावा.
कोकण रेल्वे ही कोकणासाठी आता एक जीवनवाहिनी म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्व. मधू दंडवते यांच्या स्वप्नातली ही कोकणची राणी प्रत्यक्षात आल्यानंतर मुंबई ते कोकण हा प्रवास सुखकर आणि वेळेची बचत करणारा ठरला. बारा ते पंधरा तासांचा हा प्रवास अगदी आठ ते नऊ तासांवर आला. अटलबिहारी वाजपेयी यांनी कोकण रेल्वे राष्ट्राला अर्पण केली तो सोहळा रत्नागिरीत झाला.
कोकण रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना ख-या अर्थाने कमी खर्चाचा आणि सुखदायी प्रवास लाभला. मात्र सिंगल मार्ग असल्याने गाडया एखाद्या स्टेशनजवळ थांबवून एक्स्प्रेस गाडयांचा मार्ग मोकळा केला जातो. त्यावेळी तो मार्ग ट्रायलबेसच्या माध्यमातून केला होता. मात्र तो यशस्वी झाला. कारण अत्यंत डोंगराळ आणि खडतर अशा मार्गातून ट्रॅक जोडणे, हे धोक्याचे होते.
सुरुवातीला दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. दुर्घटना घडल्या; मात्र त्यानंतर अनेक सुधारणा केल्या गेल्या. आज हाच मार्ग केरळपर्यंत जोडला गेला आणि गोवा व त्यापुढील राज्यांत प्रवाशांना जवळचा मार्ग उपलब्ध झाला. आज कोकण रेल्वेमार्गावर असंख्य गाडया धावतात, लाखो प्रवासी त्याचा लाभही घेतात. मात्र या कोकण रेल्वेच्या आरक्षणात कित्येक वेळा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तिकिटांना मर्यादा असाव्यात, वेटिंगचे प्रमाण ठरलेले असावे.
सामान्य माणसाला परवडणारी दिवा पॅसेंजर गाडी अजून एखादी असावी. कारण या दिवा गाडीत प्रवाशांची खचाखच गर्दी असते. कारण ती परवडणारी गाडी आहे. त्याचप्रमाणे गाडयांची स्वच्छतागृहे सुस्थितीत असावी आणि हे काम करण्यासाठी स्वतंत्र कामगार असावेत, अथवा एखाद्या एजन्सीकरवी ही व्यवस्था व्हावी.
सुरुवातीला सुरू झालेल्या त्याच गाडया कोकणकन्या, मांडवी आजही त्याच स्थितीत असल्याने डब्यांचा कलर गेलेला, पत्रे सडलेले, खिडक्या नादुरुस्त अशा स्थितीत आहेत. या गाडयांचा एक वेगळा लूक असावा. सुंदर पेंटिंग केलेल्या या गाडया असाव्यात. कारण संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, देशात कोकण रेल्वेमार्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपुलकी आणि प्रेम आहे. आजच्या या गाडयांची आसनव्यवस्था अतिशय निकृष्ट झाली आहे. स्वच्छता नसल्याने कुठूनही झुरळ अथवा कीटक आत शिरतात, यावर नियंत्रण असावे.
कोकण रेल्वे हा सर्वात लांबचा रेल्वेमार्ग म्हणून ओळखला जातो. अनेक बोगद्यांतून ही गाडी जाते. स्त्रिया, मुले यांनी भरलेली ही गाडी या मार्गावरून धावते तेव्हा पोलीस अधिकारी नियुक्त असला तरी अनेक वेळा कुठे दिसतच नाहीत. कधी दरोडा, लुटालूट झालीच तर सुरक्षिततेची कुठलीही उपाययोजना तातडीने होण्याची कुठलीही शक्यता नाही.
अनेक वेळा या ट्रेनमध्ये पिकनिकच्या निमित्ताने जाणारे तरुण दंगामस्ती किंवा काही वेळा दारू पिऊन धिंगाणा घालत असतात. अशा वेळी प्रवाशांना त्रास होतो यावर काहीही निर्बंध नाही. कोकणी माणूस खूप समंजस आणि परोपकारी आहे. मात्र या आणि अशा काही सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे.
कोकण रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती आहे. कोकणची शान आहे, याची प्रत्येक प्रवाशाने काळजी घेतली पाहिजे. अनेक घटना रेल्वेमार्गावर झाल्या, अनेकांचे जीव गेले अशा वेळी कोकणी माणसाने स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत केली. हा रेल्वेमार्ग अत्यंत जोखमीचा आहे. खडतर आहे. मात्र आता त्यावर आपण ब-याच प्रमाणात मात केली असून आज कोकणी माणसाला सुखकर प्रवास करण्याचा योग आला.
तिकीट मिळत नाही एवढी प्रचंड गर्दी या गाडयांत असते. पूर्वी लोक फक्त शनिवार, रविवार अथवा व्हेकेशनमध्ये गावी जात असत. मात्र आता कामानिमित्त किंवा एका दिवसाच्या सुट्टीसाठी देखील गावी जाऊन येतात.
कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून पर्यटकांची कोकणात येण्याची संख्याही वाढली. महाराष्ट्र-गोवा म्हणा किंवा इतर राज्यांतील पर्यटकही आपल्या कोकणात येतात. व्यवसाय वाढले, पर्यटन वाढले. हॉटेल व्यवसाय वाढला, किनारपट्टीतील भागात तर समुद्रकिना-यांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. मालवण, वेंगुर्ला, देवगडसारख्या टुरिस्ट पॉइंटला भेट देणारेही पर्यटक याच ट्रेनमधून प्रवास करतात.
अशी अपेक्षा आहे की, कोकण रेल्वेमार्ग क-हाड, कोल्हापूरला जोडला गेला तर प्रवाशांना सोयीचे होईल ही मिनी ट्रेन संकल्पना असली तरी डोंगरातून ही कोकणराणी धावेल, हे विशेष आकर्षण ठरेल. दुसरं म्हणजे अशी एखादी स्पेशल गाडी खास पर्यटकांसाठी असावी ज्यामध्ये रेस्टॉरंट, मनोरंजन असावे. वातानुकूलित यंत्रणा, इतर सुविधा असाव्यात. कोकणातल्या सर्व उत्पादित वस्तूंची ओळख इथे असावी. याचे शुल्क जास्त असले तरी बाहेरील पर्यटकांना ते परवडेल. तर अशा संकल्पनेतून या कोकण रेल्वेचा लूक बदलावा असे मनोमन वाटते. अशा गाडया या मार्गावरून जाव्यात. इतरांपेक्षा वेगळया रूपात ही गाडी दिसावी. विशेष आकर्षण ठरावे.
विशिष्ट रंग, त्यावर माडा-पोफळीची झाडे, माशांची चित्रं अशा एका वेगळया रूपात ही कोकणची राणी दिसावी असे वाटते आणि तमाम कोकणी बांधवांचेही हेच मत असेल यात शंका नाही. रेल्वे महामंडळाने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, रेल्वेमंत्री यांनी सकारात्मक विचार करून हा बदल नक्की घडवावा. आम्हाला तशी अपेक्षा आहे.