आज २ ऑक्टोबर! मानवी इतिहासात आमूलाग्र बदल करणारे सत्याच्या आग्रहाचे तत्त्वज्ञान निर्माण करणारा माणूस आज जन्माला आला. ‘गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्यचळवळ’, ‘गांधीजी आणि नेहरू,’ ‘गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य’ इत्यादी विषयांबद्दल विपुल साहित्य लिहिले गेले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आजही ते लिहिले जाईल. पण त्यांच्यातील शिष्य आणि गुरू मोठा विलोभनीय आहे.
पारंपरिक गुजराथी कुटुंबात वाढलेले गांधीजी मोहनदास करमचंद गांधी बॅरिस्टर झाले आणि वकिलीतील करिअर करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले. मात्र त्यांच्यातला बॅरिस्टर केवळ पैसे मिळवण्यासाठी काळा कोट घालून न्यायालयात उभा राहणारा व्यावसायिक नसल्यामुळे त्यांना लगेच तेथील वर्णवाद, भारतीयांवर होणारे अन्याय, गरिबी व त्यातून निर्माण झालेली सामाजिक विषमता खटकू लागली. पैसे कमवायला गेलेला हा माणूस पदरमोड करून सामाजिक कामे करू लागला. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी काळे आणि गोरे या भेदाविरुद्ध चळवळी उभ्या केल्या.
कोलकाता येथे १९०१ साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनासाठी ते भारतात आले तेव्हा त्यांची भेट गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी झाली. जवळजवळ १ महिना अधिवेशन यशस्वी करण्यासाठी झटणा-या कार्यकर्त्यांत गांधीजी अग्रेसर होते. त्या वेळच्या काँग्रेसमध्ये गोपाळकृष्ण गोखले हे अत्यंत म्हहत्त्वाचे नेते होते. त्यांना तडफदार मोहनदास गांधी यांच्यातील नेतृत्वगुण लक्षात आले.
बॅरिस्टर झालेल्या या बुद्धिमान तरुणात उभ्या भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे गोखल्यांनी ओळखले. त्यांनी गांधीजींना भारतात येण्याची विनंती केली. गांधीजींना गोखल्यांविषयी खूप आदर होता. परंतु आफ्रिकेत सुरू केलेले आंदोलन अर्धवट सोडून परतण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला.
गोखलेनंतर स्वत: आफ्रिकेत जाऊन तेथील नेत्यांना १९१२ मध्ये भेटले. परतताना त्यांना सोडायला गांधीजी झांजीबापर्यंत आले. गोखले यांनी पुन्हा भारतात येण्याची गळ घातली. काही काळाने गांधीजी आले. २७ फेब्रुवारी १९१४ ला लिहिलेल्या पत्रात गांधी त्यांच्या गुरूंना काय म्हणतात ते पाहण्यासारखे आहे. ‘मी येत्या एप्रिलमध्ये भारतात परतत आहे. मी स्वत:ला संपूर्णत: आपल्या हाती सोपविले आहे.
आपल्या चरणाशी बसून मला ज्ञान आणि अनुभव ग्रहण करण्याची इच्छा आहे. मला तुमच्यासोबत तुमचा सेवक म्हणून राहण्याची इच्छा आहे. माया, मनातील आत्यंतिक आदर आणि प्रेमामुळे एक आज्ञाधारक सेवक म्हणून आपण मला स्वीकारावे, अशी विनंती आहे.’ गुरूशी किती आदरपूर्ण आणि लाघवी संवाद!
पुढे एकदा मिठाचा सत्याग्रह सुरू करताना नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू साशंक होते. त्यांना वाटे, नुसते चिमुटभर मीठ, उचलल्याने कसे काय स्वातंत्र्य मिळणार? कुणालाही येईल अशीच ती शंका होती. मोतीलालजींनी ती प्रामाणिकपणे विचारली. त्यावर गांधीजी फक्त दोनच शब्द बोलले. ‘कर के देखो.’ आणि खरेच लाखो लोकांनी ‘करून पाहिल्यावर’ चमत्कार झाला. कवीने त्या चमत्काराचे फार सुंदर वर्णन केवळ दोन ओळीत केले आहे.
‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा ढळला पाय.’
जसा गोखलेंना लिहिलेल्या पत्रात गांधींमधील आज्ञाधारक, नम्र शिष्य आपल्याला दिसतो तसाच इथे एक आत्मविश्वासू गुरुचेही आपल्याला दर्शन होते. गांधीजी भारतात आले तेव्हा त्यांचे सर्वार्थाने गुरू ठरलेल्या गोखल्यांनी त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘तू अनेक वर्षे भारतापासून दूर राहिल्यामुळे देशबांधवांपासून तुटला आहेस म्हणून तू संपूर्ण देशाचा दौरा करून देश समजावून घे.’
यानंतरची गुरुवर्य गोखल्यांची सूचना तर देशातील अनेक नेत्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांनी गांधीजींकडून एक वचन घेतले. ‘जोपर्यंत लोकांची सत्यस्थिती लक्षात घेत नाहीस तोपर्यंत भारतातल्या प्रश्नाबाबत एकही शब्द बोलणार नाहीस.’ हे ते वचन! तरुण गांधीजींनी गुरूला दिलेले वचन तंतोतंत पाळले.
हा फाटक्या कपडय़ात राहणारा, हिंदी बोलणारा, ईश्वरावर निस्सीम श्रद्धा असलेला साधा माणूस भारतीयांना भावला. इतका की ब्रिटिशांच्या अत्याचारामुळे चिडलेले लोक गांधीजींसाठी मात्र लाठय़ा खायला तयार झाले. हा बदल राजकीय नव्हता एका व्यापक अर्थाने तो आध्यात्मिक होता.
शत्रूशी लढताना, त्याच्याकडून न्यायाची अपेक्षा करताना हिंसेचा वापर न करणे हे तत्त्व यापूर्वी कोणत्याही राजकारण्याने कुणालाही शिकविले नव्हते, गांधीजींनी मात्र टोकाच्या साधनसूचितेचा पुरस्कार केला. त्यांची तेव्हाही टिंगल झाली, ती आजही होते. मानवाच्या इतिहासात एखाद्या तत्त्वासाठी, धर्मग्रंथातील विचारासाठी, राजकीय किंवा आर्थिक लाभासाठी लोक दुस-याचा जीव घ्यायला किंवा द्यायला नेहमीच तयार होत आले आहेत.
गांधीजींचे अनुयायी सत्य आणि न्याय या तत्त्वांसाठी शत्रूकडून कोणताही अत्याचार सहन करायला तयार झाले हेच गांधीजीचे वेगळेपण होते. याचा उगम सुमारे २००० वर्षापूर्वी येशूने सांगितलेल्या जगावेगळ्या शिकवणुकीत आहे. येशूच्या शिकवणुकीचा, बायबलचा आपल्यावर प्रभाव असल्याचे गांधीजींनी मान्य केले होते.
गांधीजींचे मोठेपण यात आहे की, एका उपखंडाचा इतिहास बदलणा-या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामानंतरही गांधीजी शिल्लक राहतात. ते स्वातंत्र्य चळवळीच्या फायलीत बंद होऊन इतिहासात जात नाहीत. भारतीय स्वातंत्र्यचळवळ मात्र एक नैतिक उत्थानाची चळवळ होती. अनैतिक सत्तेविरुद्ध लढताना नैतिक मार्ग वापरण्याचा गांधीजींचा आग्रह जगावेगळा होता. आज ६९ वर्षे जगभरचे नेते त्यांच्या विचारांनी प्रभावित होत आलेले आहेत.
नेल्सन मंडेलांनीसुद्धा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने आपण प्रभावित झाल्याचे मान्य केले होते. अलीकडेच बराक ओबामा यांनीही अशीच कबुली दिली होती. याचे कारण राजकारणासारखा विषय हा या जगाचा असल्याने त्यात जशास तसे वागणे, प्रसंगी युद्ध, हिंसा, कुटिलता वापरणे हे क्षम्य मानणा-या जगाला गांधीजींनी हृदयपरिवर्तनाचा, सत्याचा, प्रेमाचा आगळा मार्ग दाखविला. नुसता सांगितलाच नाही तर, ‘बोले तैसा चाले’ या सद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिकवणुकीप्रमाणे यशस्वीही करून दाखविला.
त्यांच्या मृत्युसमयी अल्बर्ट आईनस्टाईन यांनी काढलेले उद्गार प्रसिद्ध आहेत. आईनस्टाईन यांनी म्हटले होते, ‘हाडामासाचा मानवी देह धारण करून, असा कुणी जिवंत माणूस या भूतलावर वावरला होता हे खरे वाटणे येणा-या पिढय़ातील अनेकांना फार अवघड वाटणार आहे!’ जगभर प्रसिद्ध असलेला एक वैज्ञानिक असे एका साध्या माणसाविषयी म्हणतो, तेव्हा तो माणूस ‘साधा किती आणि महात्मा किती’ ते आपले आपणच ठरवायचे असते. त्या महात्म्याला त्रिवार वंदन.