संघाने व्यवस्थाच अशी करून ठेवली आहे की, ते कायद्याच्या कचाटयात येतच नाहीत. आपल्याला दिसतो तो संघ एक नाही. त्याची हजार तोंडे आहेत. प्रत्येकीची स्वतंत्र नोंदणी आहे. संघाच्या देशभर ६० हजार शाखा आहेत. प्रत्येक शाखेचे स्वतंत्र अकाऊंट आहे. प्रचंड गुप्तता.
काँग्रेसचे राहुल गांधी एका वेगळ्या खटल्यात अडकले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भिवंडीच्या जाहीर सभेत बोलताना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महात्मा गांधी यांची हत्या केली’ असा आरोप त्यांनी केला होता.
त्यामुळे संघाची बदनामी झाल्याचे सांगून संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडीच्या कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यावर राहुल गांधी हायकोर्टात गेले. तेथे विरोधात निकाल गेल्याने सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने तर, ‘खटल्याला सामोरे जा’ अशा शब्दांत मतप्रदर्शन केले. राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने खटला लढायचे ठरवले आहे. त्यामुळे तब्बल ६८ वर्षानंतर महात्मा गांधींची हत्या कुणी केली, हा शाश्वत प्रश्न नव्याने ऐरणीवर आला आहे.
३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये सायंकाळच्या प्रार्थना सभेत नथुराम विनायक गोडसे नावाच्या एका माथेफिरूने अगदी जवळून गांधीजींच्या छातीत पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलीस रेकॉर्ड सांगतो. विशेष न्यायालयात चाललेल्या खटल्यात एकूण ८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले. यापैकी गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे या दोघांना १५ नोव्हेंबर १९४९ रोजी म्हणजे दोन वर्षाच्या आत फासावर लटकवण्यात आले. ही हत्या, त्या वेळची परिस्थिती, त्यामागचे राजकारण या विषयी इतिहासकारांनी खूप सारे लिहून ठेवले आहे.
पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच ही हत्या केली, असे आजवर कुणाला सिद्ध करता आलेले नाही. सुप्रीम कोर्टाने आता तर, ‘गोडसेने हत्या केली आणि संघाने हत्या केली, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही संघटनेला दोषी ठरवू शकत नाही, सामूहिक निंदा करू शकत नाही’ असे बजावल्याने राहुल गांधी आणि काँग्रेसची अडचण होणार आहे. संघ आणि संघाची विचारधारा हे काँग्रेसचे प्रत्येक निवडणुकीतले हुकमी शस्त्र राहिले आहे.
संघाला धर्मनिरपेक्षता मान्य नाही, मुस्लिमांचा तो द्वेष करतो, हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा त्याचा अजेंडा आहे असे सांगून काँग्रेससकट सारे डावे पक्ष भाजपा आणि संघ परिवारावर हल्ले चढवत आले आहेत. संघाच्या याच विषारी विचारसरणीच्या प्रभावाने प्रवृत्त होऊन गोडसेने सेक्युलर गांधीजींना संपवले असावे. पण हे सिद्ध कसे करणार? या हत्येनंतर पंतप्रधान नेहरूंनी संघावर बंदी घातली होती. पण संघाला आरोपी बनवले नव्हते. एकूणच, राहुल गांधींचा खटला उभा राहील तेव्हा कायद्याचा कीस पडणार आहे.
एक सांगू का? ही लढाई कायद्याची होऊ शकत नाही. हा दोन विचारांचा संघर्ष आहे. संघाचा विचार विरुद्ध गांधीजींचा विचार. भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र. महात्म्याला संपवणारा हा नथुराम गोडसे होता तरी कोण? हे एक दुभंगलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्या आधी जन्मलेली तिन्ही मुलं आल्या आल्या मेली. त्यामुळे घरचे चिंतीत होते. तो जगावा म्हणून त्यांनी त्याचे नाक टोचले व नथ घातली. म्हणून त्याला पुढे नथुराम म्हणू लागले. मात्र त्याचे खरे नाव रामचंद्र होते.
रामाचा नथू झाला आणि पुढे रावण झाला. १९३७ सालापर्यंत नथुराम संघात होता. पुढे तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदू महासभेत गेला. संघवाले आज सावरकरांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत. पण सावरकरांच्या हयातीत हेडगेवार वा गोळवलकरांनी त्यांच्याशी कधी संबंध ठेवला नाही. संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद सावरकरांना मान्य नव्हता. त्यांचा हिंदू राष्ट्रवाद वेगळा होता.
‘भारतभूमीला जो आपली आई मानेल तो प्रत्येकच जण हिंदू आहे’ अशी सावरकरांची भूमिका होती. त्यामुळे या दोघांचे कधीही पटले नाही. संघ परिवाराचा गांधीद्वेश तर टोकाचा होता.
गांधीजींच्या खुनापूर्वी आणि नंतरच्या काळात संघ परिवाराने प्रचंड विषाक्त वातावरण उभे केले. त्यातूनच गोडसेचे भूत उभे झाले. भले हे कायद्याने सिद्ध करता येत नसेल. पण कटू वास्तव आहे. ‘हिंदू राष्ट्र’ नावाचे वृत्तपत्र गोडसे चालवायचा. त्याचे टार्गेट गांधीजी होते. गांधीद्वेशाचे राजकारण संघाने अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने राबवले. गांधींविरोधाचे जे गरळ या परिवाराने इतकी वर्षे टाकले ते अक्षम्य आहे.
संघवाले किती बेरकी आहेत पाहा. सत्तेत येताच नरेंद्र मोदी राजघाटावर माथा टेकायला गेले. आफ्रिकेत गांधीजींना ज्या रेल्वेगाडीतून उतरवण्यात आले होते, त्या रेल्वेत बसून आले. महात्म्यांना ‘वापरण्याची’ या परिवाराची जुनी सवय आहे. त्यामुळे तुम्ही पाहा. संघाची बदनामी झाली म्हणून कंठशोष करायला सरसंघचालक मोहन भागवत यांना कोर्टात जावेसे वाटले नाही. त्यांनी आपल्या स्वयंसेवकाला पुढे केले. दुस-याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकारीची ही मानसिकता आहे.
कायद्याच्या कोर्टात कदाचित संघवाले जिंकतीलही. पण जनतेच्या कोर्टाचे काय? स्वातंत्र्यलढयात कोटय़वधी भारतीय घरदार सोडून उतरले होते. व्यक्ती म्हणून ते उतरले नव्हते. गांधी विचाराने प्रेरित होऊन ते रस्त्यावर आले होते. तो विचारसरणीचा संघर्ष होता. ज्या विषाक्त विचारांच्या वातावरणाच्या निर्मितीमुळे राष्ट्रपित्याला जीव गमवावा लागला, त्या वातावरणाचा धोका अजून संपलेला नाही. संघाच्या हजेरीपटावर भलेही गोडसे नसेल. पण त्याचा ‘ब्रेनवाश’ कुणी केला?
जगभरातले तरुण भरकटत जाऊन ‘इसिस’मध्ये भरती होत आहेत. निष्पाप माणसे मारत आहेत. ते तरुण काही करीत नसतात. यांना भडकावणारी विचारसरणी सारा गेम खेळत असते. संघ परिवारही काय वेगळे खेळतो आहे? संघानेही देशांतर्गत एक युद्ध छेडले आहे. भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र. संघाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हिंदू राष्ट्र हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे.
‘मंदिर वही बनायेंगे’ हा त्या अजेंडयाचा एक भाग आहे. भारतीय घटनेने सर्वधर्मसमभाव सांगितला आहे. मुसलमानांना सोबत घ्यायचे असेल तर राम मंदिराची भाषा शोभत नाही. संघ परिवाराला एका विशिष्ट धर्माचे राज्य आणायचे आहे. पण हे कधीही शक्य झालेले नाही. मुसलमानांनी भारतावर राज्य केले. तेव्हाही राजा आणि प्रजा असेच सूत्र राहिले. एखादा धर्म कसे राज्य करू शकतो?
‘ताकाला जायचे, पण भांडे लपवायचे’ असे संघाचे कल्चर आहे. संघवाले पारदर्शकतेच्या गप्पा मारतात. कुठे आहे पारदर्शकता? दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘गुरुदक्षिणेच्या स्वरूपात कोटय़वधी रुपये संघाला मिळतात. काय हिशोब आहे? कुठे खर्च होतो? देशाला सांगितले पाहिजे. सांगत नाहीत.
संघाने व्यवस्थाच अशी करून ठेवली आहे की, ते कायद्याच्या कचाटयात येतच नाहीत. आपल्याला दिसतो तो संघ एक नाही. त्याची हजार तोंडे आहेत. प्रत्येकीची स्वतंत्र नोंदणी आहे. संघाच्या देशभर ६० हजार शाखा आहेत. प्रत्येक शाखेचे स्वतंत्र अकाऊंट आहे. प्रचंड गुप्तता. स्वत:चे काही सांगणार नाही आणि बाहेर पारदर्शकतेची भाषणे ठोकत नरेंद्र मोदी फिरणार. ही लबाडी आताशा लोकांच्या लक्षात येऊ लागली आहे. हे लोक राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत, याचा अंदाज जनतेला येत चालला आहे. गोडसेने एकदाच गांधीजींना मारले. ही मंडळी दररोज गांधीजींना ठार मारत आहे.
गांधीजींनी सांगितलेल्या विचारांचे रोज मुडदे पडत आहेत. गांधीजींनी सर्वाना सोबत घेऊन चालायला सांगितले, गरिबांचा विचार केला. हे लोकांना आपसात भिडवत आहेत. रोहित वेमुलाची आत्महत्या किती लोकांना आठवते? गुजरातमध्ये तथाकथित गो-रक्षकांनी चार दलितांना जनावरासारखे सोलून काढले. त्याचा संताप म्हणून ३० दलितांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मोदी या विषयी चकार शब्द बोलायला तयार नाहीत. देशाला कुठे नेऊन ठेवले या परिवाराने?