पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नोटाबंदीच्या मुद्यावर लोकसभा विसर्जित करून निवडणुका घ्याव्यात, असे आवाहन बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी केले.
नवी दिल्ली- नोटाबंदीबाबत नरेंद्र मोदी अॅपच्या सर्वेक्षणातील आकडे खोटे आहेत. पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नोटाबंदीच्या मुद्यावर लोकसभा विसर्जित करून निवडणुका घ्याव्यात, असे आवाहन बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी केले.
नरेंद्र मोदी अॅपने घेतलेल्या सर्वेक्षणात देशातील ९३ टक्के जनतेचा नोटाबंदीला पाठिंबा असल्याचे पीएमओने जाहीर केले. या चाचणीत पाच लाख जणांनी भाग घेतला. यातील ९३ टक्के जणांनी नोटाबंदीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीचा निर्णय लोकसभा व राज्यसभेत गाजत आहे. संसदेत पंतप्रधानांनी आपले मत मांडावे, यासाठी विरोधक आग्रही आहेत. राज्यसभेत नोटाबंदीच्या चर्चेत बोलताना ते म्हणाले की, तुम्ही स्वत:ला प्रामाणिक व्यक्ती समजत असल्यास आणि तुम्हाला तुम्हाला जनतेचे योग्य मत हवे असल्यास तुम्ही लोकसभा विसर्जित करून नव्याने निवडणुका घोषित कराव्यात, असे आव्हान त्यांनी दिले.
सरकारने नोटाबंदीचा निर्णय कोणताही विचार न करता घेतला आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही पूर्वतयारी केली नाही. त्यामुळे देशातील ९५ टक्के जनतेला त्रास भोगावा लागत आहे.
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नोटाबंदीच्या विरोधात मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन देशातील गंभीर परिस्थितीची जाणीव त्यांना करून दिली. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, नोटाबंदीमुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती आपण राष्ट्रपतींना दिली आहे. या निर्णयाचा मोठा फटका कामगार व शेतमजुरांना बसत आहे. दुकानदार, व्यापारी, पगारदार यांना पैसे मिळत नाही. जुन्या नोटा पेट्रोलपंप, विमानतळावर चालतात, मग रुग्णालयात का नाही असा सवाल त्यांनी केला.
मोदी सभागृहापासून दूर पळतात : आनंद शर्मा
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत येत नसल्याबद्दल विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. पंतप्रधानांनी नोटाबंदीबाबत निवेदन देण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. कॉँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले की, २६७ अन्वये दिलेल्या नोटिसीला पंतप्रधानांनी सन्मान राखावा व जनतेला उत्तर द्यावे. मात्र, पंतप्रधान मोदी हे सभागृहापासून पळ काढत आहेत, असा आरोप त्यांनी केला.