मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुन्या वर्सोवा पुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील बहुतांशी वाहने ठाणे शहरातून प्रवास करत आहेत.
ठाणे- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुन्या वर्सोवा पुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील बहुतांशी वाहने ठाणे शहरातून प्रवास करत आहेत. मात्र यामुळे घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग यावर मागील ४ ते ५ दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. त्यात खारेगाव टोलनाक्यावर मात्र टोलवसुली सुरूच असून सरकारचा पिवळ्या पट्टीचा नियमही पाळला जात नसल्याची बाब ‘प्रहार’ने शुक्रवारी समोर आणली होती.
यानंतर शनिवारी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहतूक कोंडीवर उपयोजना करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करत संबंधित यंत्रणांना वाहतूक नियमन करण्याचे आदेश दिले. शिवाय ‘प्रहार’च्या वृत्ताची दखल घेत आयआरबी टोलनाक्याची वसुली वाहतूक कोंडीच्या काळात थांबवण्याचे आदेश दिले. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
या बैठकीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वाच्या उपायांवर चर्चा झाली. यात जेएनपीटीतून गुजरातकडे जाणारी वाहने ठाणे-भिवंडी मार्गे जाण्याऐवजी चाकण-नाशिक-धुळे-सूरत या मार्गे वळवणे, वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करणे, भिवंडी बायपासवरील पाईपलाईन लगतचा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी वापरणे, जेएनपीटी व तलासरीच्या आसपास अवजड वाहनांसाठी पाìकग तळ उभारणे, भिवंडी पट्टय़ात असलेल्या गोदामांनी साप्ताहिक सुट्टय़ांचे दिवस वेगवेगळे ठरवणे याबाबतचे आदेश देण्यात आले. शिवाय यंत्रणांना याबाबत अहवाल सदर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले.
अवजड वाहनांसाठी पाìकगची सुविधा देणार!
वाहतूक कोंडीत न अडकण्यासाठी अनेक अवजड वाहने ठाणे शहरात येऊन रस्त्याच्या कडेला रात्रीपर्यंत उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून जेएनपीटी आणि गुजरात दिशेने परस्पर दिशेला जाणा-या वाहनांसाठी जेएनपीटी आणि तलासरी येथील एमएसआरडीसी बॉर्डर चेकपोस्ट येथे पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे. ही वाहने पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून सूचना मिळेपर्यंत पुढे सोडण्यात येणार नसून त्यामुळे अवजड वाहनांमुळे वाढणारी कोंडी टळणार आहे.
यामुळे होतेय वाहतूक कोंडी!
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले असून या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक ठाणे शहरातून माजिवडा, माणकोली नाका, चिंचोटीमार्गे वळवण्यात आली आहे.
यातील अनेक वाहने मुंबई-नाशिक महामार्गावरूनही जाऊ लागल्याने घोडबंदर रोड आणि मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हलकी वाहने, रुग्णवाहिका, अत्यावशक सेवांची वाहतूक करणारी वाहने यांना मोठा फटका बसत आहे.ं