मुंबई-नाशिक महामार्गावर मागील २ दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे वाहनचालकांना मोठया मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
ठाणे- मुंबई-नाशिक महामार्गावर मागील २ दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे वाहनचालकांना मोठया मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या कोंडीतही खारेगाव टोलनाक्यावर मात्र एकही गाडी टोल न घेता सोडली जात नसून त्यामुळे पिवळ्या पट्टीच्या नियमाला पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे.
ही कोंडी सोडवण्यास वाहतूक पोलिसांनाही अपयश येत असून गुरुवारी याच कोंडीत अडकलेल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनाही सुमारे दीड कि.मी.ची पायपीट करावी लागली.
मागील दोन दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिककडे जाणा-या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे लागणा-या वाहनांच्या रांगा ठाण्यापर्यंत येऊन पोहोचत असल्याने ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेलाही त्याचा फटका बसत आहे.
गुरुवारी झालेल्या अशाच वाहतूक कोंडीत खारेगाव टोलनाक्यापासून ते ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनच्याही पुढेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे ठाण्यातील रस्ते आणि तर उड्डाणपुलावरून येणा-या पूर्व द्रुतगती महामार्गावरही वाहनांची कोंडी झाली. या कोंडीत कुपोषित भागाच्या दौ-यासाठी कसा-याला निघालेले आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा ताफाही अडकून पडला.
त्यामुळे त्यांनी थेट पायी चालत खारेगाव टोलनाका गाठला. वाहनांच्या इतक्या लांब रंग लागूनही टोलनाक्यावर मात्र टोलवसुली सुरूच असल्याचे त्यांना आढळल्याने त्यांनी त्वरित वाहने टोल न घेता सोडण्याच्या सूचना दिल्या.
विशेष म्हणजे याच टोलनाक्याच्या कर्मचा-यांनी आधी पिवळ्या पट्टीचा नियम आम्हाला लागूच होत नसल्याचे सांगितल्याने स्वत: सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पिवळ्या पट्टीचा नियम पाळण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही आयआरबी कंपनी येथून वाहतूक कोंडीत टोलवसुली करत असल्याने एकनाथ शिंदे यांना ती जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्या
रविवारी मुख्यमंत्र्यांच्या दौ-यासाठी वाहतूक थांबवलेली असताना साकेत भागात एका मुलीचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतरही गुरुवारी वाहतुकीत रुग्णवाहिका अडकल्याचे पाहायला मिळाले. कुठूनही बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी विरुद्ध दिशेच्या माíगकेवरून तिला मार्ग दिला. ही कोंडी सोडवण्यात मात्र वाहतूक पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.