नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरी- नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. चिपळूण, लांजा, राजापूर पाठोपाठ रत्नागिरी येथील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २१ सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर, रत्नागिरीमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. लांजा, राजापूर, चिपळूणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पदे व काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी रत्नागिरीतील पदाधिका-यांनी पक्षत्याग करून नारायण राणे यांच्या मागे भक्कमपणे उभे रहाण्याचा निर्णय घोषित केला. यासाठी शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली.
यावेळी रत्नागिरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. गेली १२ वष्रे काँग्रेसने नारायण राणे यांच्यावर सतत अन्यायच केला आहे. या कोकणामध्ये काँग्रेसने पुन्हा उमेदीने उभे रहावे यासाठी राणे यांनी केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांनी कपटी कारस्थाने करून खीळ घालण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यामध्ये पक्ष भक्कमपणे उभा राहण्याची आवश्यकता असतानाही अध्यक्षपदासह अनेक पदे रिक्तच ठेवली. माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले.
सामान्य कार्यकर्त्यांला उभारी देण्याचाही प्रयत्न केला. जिल्हाध्यक्षपदासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्याला प्रदेश पातळीवरून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या कपटी राजकारणाला जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारीही कंटाळले होते. नारायण राणे यांनी घेतलेल्या निर्णयाचा संपूर्ण मान राखत आणि त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत या पदाधिका-यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवून दिल्याचे यावेळी पदाधिका-यांनी सांगितले. त्यामध्ये काँग्रेसचे माजी तालुका उपाध्यक्ष भाई भोळे, माजी शहराध्यक्ष नित्यानंद दळवी, अशोक वाडेकर, तालुका उपाध्यक्ष महादेव आखाडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेहताब साखरकर, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष संकेत चवंडे, आनंद बारे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी शिवाजी कारेकर, अमित देसाई, शोएब खान, राहुल भाटकर, अभिलाष कारेकर, नंदकिशोर चव्हाण, श्वेतांग वायंगणकर, मुस्तकीम चंदावले, रफिक मुकादम, बाळा देसाई, पिंटय़ा देसाई, सोनू रसाळ, विनायक साळुंखे, संदीप पावसकर यांचा समावेश आहे.
[EPSB]
[/EPSB]