वर्षातील अनेक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौ-यावर असतात. इतर देशात राजनैतिक संबंध प्रस्थापित करत सामरिक सिद्धतेवरही या दौ-यात चर्चा होते. एकुणात भारतासाठी जे काही आवश्यक आहे, ते करण्याचा प्रयत्न मोदी करीत आहेत, असे तरी वरकरणी दिसत आहे. या परदेश दौ-याची फळं येत्या काही वर्षात देशाला चाखायला मिळतील, असा युक्तिवाद भाजपाचे कार्यकर्ते करीत असतात. तर दुसरीकडे, काही का असेना जर अशा दौ-यातून चांगले काही देशासाठी मिळणार असेल तर वाईट ते काय? असा विचार करणारा एक समूह भारतात आहे. त्यांना भारताने महासत्ता व्हावे असे वाटते. या महासत्तेतून देशात सगळेच काही आबादीआबाद व्हावे, अशीही त्यांची इच्छा आहे. इच्छा बाळगण्यात वाईट काहीच नाही. तो मानवी स्वभाव आहे. असो.
मोदींबाबत सकारात्मक विचार करणा-यांसाठी खुद्द मोदी यांनीच एक चांगली बातमी दिली आहे. ही बातमी तशी साधी वाटेल पण त्यातून खरोखर काहीतरी घडले तर राज्यात पूर्वीसारखीच हिरवाई पाहावयास मिळेल. ही बातमी आहे, वारक-यांना प्रसाद म्हणून रोपटे भेट देण्याची मोदी यांनी केलेली सूचना याची. कृषी दिन आणि वनमहोत्सवाचे औचित्य साधून राज्यात १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मोदी यांना देण्यास गेले होते. तेव्हा मोदी यांनी अशा पद्धतीची सूचना करतानाच मुंबईतील लोकलच्या दुतर्फा मोकळ्या जागेवर महिला बचतगटांना रोपवाटिकेची कामे देण्यात यावीत, अशीही सूचना केली. या दोन्हीही सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. जागतिक स्तरावर पर्यावरण दक्षतेसाठी काय काय उपाययोजना करता येतील, याबाबत विचारविनिमय सुरू असताना पंतप्रधानांनी केलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त राज्य-देश आणि हल्ली विदेशातीलही वारकरी पंढरीच्या विठुरायाचे भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी हजारो दिंडय़ांच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने चंद्रभागेच्या तीरी एकवटतात. त्याच्या मनात सावळ्या विठूला भेटण्याची ओढ असते. किंबहुना वारी केल्यानंतर त्यांना एक वेगळाच आत्मिक आनंदही मिळतो. हजारो वर्षापासून ही वारीची परंपरा सुरू आहे. या वारीत वैष्णवांचा मेळा भरतो. त्यांना प्रसादही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमांतून देण्यात येतो. प्रसादात मिळणारा कोणताही पदार्थ त्यांच्यासाठी मोलाचा असतो. त्यात विठूच्या सहवासातील हा प्रसाद त्यांना वेगळी ऊर्जाही देणारा ठरतो. असाच वारक-यांना प्रसाद म्हणून रोपटे भेट द्या, ही कल्पना अभिनव आहे. ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी यंदा भाजपावाले मोठय़ा संख्येने आषाढी वारीत सहभागीही होतील. लक्षावधी रोपटय़ांचे वाटपही विठूच्या साक्षीने करण्यात येईल. पण एवढय़ावरच या सूचनेची उपयुक्तता संपत नाही. या रोपटय़ातून महावृक्ष घडवण्याची प्रत्येकाची तयारी पाहिजे. आपल्याकडे राजकीय व्यक्ती, समाजकारणात वावरणा-या व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त हल्ली रोपटे भेट देण्याची टूम निघाली आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर भेट दिलेल्या रोपटय़ाने मान टाकलेली असते. असा प्रकार पंतप्रधानांनी दिलेल्या या सूचनेचा होऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणा-यांना यात सहभागी करून घेत, वारीत भविष्यात मिळणा-या रोपटय़ाचे महावृक्षात रूपांतर होईपर्यंत देखभाल करण्याची जबाबदारी सोपवावी लागेल. ठरवले तर हे काम कठीण नाही. मराठवाडय़ातील परंडा तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून पावसाचा एक ठिपूसही पडला नव्हता. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या थेंबाचे मोल या परिसरातील ग्रामस्थांना कळले व ते जलसंधारणाच्या कामाला लागले. त्यांनी या परिसरातील नद्यांचा गाळ काढला, पात्र रुंद केले. गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसात या नद्यांमध्ये मुबलक पाणी जमा झाले. त्यांनी प्रयत्न केल्याने येत्या हंगामात त्यांना त्याची फळे चाखता येणार आहेत.
वृक्षारोपणाच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल. राज्य सरकारने यंदा कृषीदिन व वनमहोत्सवाच्या निमित्ताने २ कोटी झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक गावखेडय़ात वृक्षारोपण होईल, फोटोही खेचले जातील, वृत्तपत्रांत, वाहिन्यांत बातम्याही येतील. पण सालाबादप्रमाणेचा अनुभव असा सांगतो की, हे सरकारी वृक्षारोपण फक्त लाक्षणिक असते. ते दिवस मावळला तर मागील पानावरून पुढे अशाच स्वरूपाचे असते! मागच्या सरकारला लाखोल्या वाहून शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. त्यांना आता पंतप्रधानांची सूचना मूर्तरूपात उतरवून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. त्यात ते यशस्वी झाल्यास पूर्वीच्या सरकारला शिव्या घालण्यास ते पात्र आहेत, असा संदेश त्यातून जाईल.