एखाद्या व्यक्तीची खरी ओळख ही त्याच्या शैक्षणिक परिपक्वतेत असते. किंबहुना शिक्षणाशिवाय त्याची प्रगती होणे शक्य नसते. तसेच कुठल्याही समाजाचा विकास हा शिक्षण, आरोग्य व सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. माझी शाळा अशाच माझ्या समाजबांधवांनी स्थापन केली आहे.
१९४७ साली देशातील भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित िहदू (मराठी) बांधवांची सोय भारत सरकारने उल्हासनगर इथल्या लष्करी छावणीतील बॅरेकमध्ये केली. सिंधी बांधवांसोबत मराठी कुटुंबेदेखील इथे आली. अशाच आमच्या समाजबांधवांनी एका सिंध – महाराष्ट्रीय निर्वासित समाजाची स्थापना केली व कै. श्रीमती मीराबाई पाटकर या कराचीस्थित शहरातील एका शिक्षिकेने मराठी शाळेची स्थापना केली. त्यामुळे एक शिक्षकी शाळा याचा अनुभव मी घेतला आहे. १९६० च्या सुमारास मीराबाई पाटकर या एकटय़ाच १ली ते ४थी पर्यंत वर्ग चालवत होत्या, प्रत्येक वर्गात चार तुकडय़ा मिळून २५ ते ३० विद्यार्थी असतील.
याच पाटकरबाईंच्या शाळेत कडक शिस्तीत माझ्या शालेय जीवनाची सुरुवात झाली. बॅरेकमधील एका मोठय़ा हॉलमध्ये चार कोप-यात १ली ते ४थी अशा चार तुकडय़ा बसत. पाटकरबाई मध्येच खुर्ची मांडून बसत. शाळेत साधी पाणी पिण्याची देखील सोय नव्हती. शाळेच्या समोरच्या बॅरेकीतील मधल्या सुट्टीत आम्ही पाणी पिण्यास जात असू व एक तांब्या भरून पाटकर बाईंसाठी आणत असू. शाळेचे विशेष म्हणजे शाळेला नाव असे नव्हते. त्यामुळे काही मुले पाटकरबाईंची शाळा म्हणत, काहीजण समाजाची शाळा असा उल्लेख करीत. ४ थीत मात्र शाळा सोडताना दाखल्यावर तालुका स्कूल मराठी मुला-मुलींची शाळा असा उल्लेख वाचून मला शाळेचे नाव माहीत झाले. पुढे पाचवी ते सातवी जिल्हा परिषद शाळा क्र.१४ येथे शिक्षण झाले असताना सातवी उतीर्ण झालो.
त्याच वर्षी समाजातील मनोहर गावडे, रघुनाथ विश्राम राणे, शिवाजी पोईपकर, जाधव बंधू यांनी इयत्ता ५वी ते माध्यमिक विभागाचा इयत्ता ८वीच्या वर्गाची स्थापना केली. स्थापना कार्यक्रमात मी आठवीत याच शाळेत प्रवेश घेतला, त्याच दिवशी शाळेचे उल्हास विद्यालय असे नामकरण झाले. आजही या शाळेत ५० वर्षानंतर रेकॉर्डवर माझा रजिस्टर क्र.१ असा उल्लेख आहे. याच शाळेत मी आठवी ते अकरावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. ज्या शाळेत लहानपणी चार वर्ग मिळून एक शिक्षिका (पाटकरबाई) होत्या त्याच शाळेत इयत्ता ८वी पासून आठ तासिकांना आम्हाला आठ-आठ शिक्षक मिळू लागले ही बाब आयुष्यभर स्मरणात राहावी अशीच आहे. या आठवी ते अकरावीपर्यंतच्या प्रवासात मीनाक्षी पाणस, निलांबरी बापट (विध्वंस), सुरेखा शेखटकर, गोपाल सिंह पवार, सुरेश कोष्टी, काहीही मानधन न घेता चित्रकला शिकविणारे बाळकृष्ण चोडणकर, नाईक असे मोलाचे शिक्षण देणारे माझ्या गुरुवर्यामुळे मी घडलो.
एक आठवण म्हणजे, इयत्ता १लीत असणारे माझे अनेक बालमित्र, विठ्ठल गुईगडे, रामचंद्र तळावडेकर, प्रकाश कुडतरकर असे मित्र ८ वीत पुन्हा एकत्र आले व शिक्षण आणि मैत्रीची गोडी वाढली. पुढे १९७२ साली आमची ११वी मॅट्रिकची परीक्षा पहिल्या प्रयत्नांतच आम्ही उत्तीर्ण झालो. शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या शाळेसाठी काहीतरी करावे ही इच्छा होतीच. त्यातच मनोहर गावडे, गोिवद जाधव, जनार्दन जाधव, सुरेंद्र किनळेकर, शिवराम परब यांच्या आशीर्वादाने १९७८ साली मी सिंध महाराष्ट्रीय समाजाच्या कार्यकारिणीवर आलो आणि तेव्हापासून शाळा प्रवेशासाठी रितसर परवानगी घेऊन ११ रुपये, २५ रुपये, ५१ रुपये अशी देणगी कार्यकारी मंडळ गोळा करीत होतेच. १९८५ च्या सुमारास शाळेच्या इमारत निधी चिटणीस म्हणून माझी निवड झाली. १९८९-९० च्या सुमारास घनश्याम बानोडकर यांच्यासारखे चोख व्यवहार ठेवणारे खजिनदार संस्थेस लाभले. त्याच वर्षी कल्याण जनता सहकारी बँकेतर्फे ५ लाख रुपये कर्ज काढून शाळेच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू झाले. समाजाच्या सर्व सभासदांनी आणि शिक्षकवृंदांच्या सहकार्याने भव्य अशी वास्तू १९९० साली बांधून पूर्ण झाली. याचा सार्थ अभिमान उल्हास विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मला आहेच. विशेष बाब म्हणजे इमारतनिधी चिटणीस म्हणून बांधकाम ठेकेदाराला चेकवर माझी सही करताना मला आनंद होत असे.
आज माझ्या शाळेत बालवाडी ते १०वीपर्यंत जवळ जवळ साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्या शाळेत चार वर्गासाठी मीराबाई पाटकर एकटय़ाच शिक्षक होत्या त्याच शाळेत आज ५० पेक्षा अधिक शिक्षक वर्ग आहे. मराठी माध्यमातील एक अग्रगण्य शाळा असा नावलौकिक असलेले माझे उल्हास विद्यालय आहे. अधूनमधून भूतकाळातील ब-याच गोष्टी आठवतात आणि भविष्यात या विद्यालयाचे महाविद्यालय होऊन येथे ११वी, १२वी सुरू व्हावी, पुढे पदवी महाविद्यालयही सुरू व्हावेत हे स्वप्न उराशी बाळगूनच मी आणि माझे सहकारी धडपड करीत आहोत. बघूया पुढील यश कधी मिळते. उल्हास विद्यालयामुळे मी घडलो. सुसंस्कार आणि कडक शिस्तीत माझ्या आयुष्यात वळण देण्यात मनोहर गावडे आणि माझी शाळा यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही.
[EPSB]
देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारचे वाभाडे काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपची कोंडी करणारे वक्तव्य केले आहे.
[/EPSB]