चांगल्या पावसाने डाळींचे उत्पादन वाढून दर उतरल्यास रिझर्व्ह बँक येत्या ९ ऑगस्टला होणा-या आपल्या बैठकीत व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- चांगल्या पावसाने डाळींचे उत्पादन वाढून दर उतरल्यास रिझर्व्ह बँक येत्या ९ ऑगस्टला होणा-या आपल्या बैठकीत व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्याची शक्यता आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच (बोफा-एमएल)ने हा अंदाज व्यक्त केला आहे.
उन्हाळी रब्बी हंगामातील डाळींचे उत्पादन कमी झाल्याने सध्या डाळींच्या महागाईचा दर २७ टक्के इतका आहे. चांगल्या पावसामुळे खरीप हंगामासाठी डाळींच्या लागवडीत गेल्या वर्षीपेक्षा ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे डाळींचा भाव २० टक्क्यानी खाली येण्याची शक्यता असून ग्राहक किमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ५.१ टक्का इतका खाली येईल, असे बोफाने म्हटले आहे.
ब्रोकरेज कंपनीच्या संशोधन टिप्पणीनुसार, रिझर्व्ह बँक तीन कारणांसाठी व्याजदर कपात करू शकते. प्रथम कृषी महागाईचा भडकलेला दर पावसामुळे उतरेल. जूनमध्ये सीपीआयवरील आधारित महागाईचा दर खाली आला आहे आणि उच्च व्याजदरांमुळे मेमध्ये औद्योगिक वाढीला खीळ बसली.
अहवालात म्हटले आहे की, चांगला पाऊस झाला तर डाळींचे दर उतरतील आणि सीपीआय महागाईचा दर मार्च २०१७ पर्यंत ५ टक्क्यांच्या आसपास राहील. रिझर्व्ह बँकेने महागाईचादर ५ टक्क्यांच्या आसपास राहील, असे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या पाऊस सामान्यपेक्षा १०२ टक्के अतिरिक्त पडतो आहे.
घाऊक किमत निर्देशांकावरील महागाईचा दर मात्र २२ महिन्यांतील उच्चांकी ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. जूनमध्ये झालेल्या मध्यवर्ती बँकेच्या बैठकीत गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याजदर जैसे थे ठेवले होते. वाढत्या महागाईचा दबाव हे कारण दिले होते. मात्र चांगल्या पावसाने महागाई कमी झाली तर व्याजदर कपातीचा विचार करू, असे आश्वासन दिले होते.