विरोधकांच्या कठोर भूमिकेमुळे पंतप्रधान मोदी हे संसदेत बोलण्यास तयार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षाने सोमवारी दिली.
नवी दिल्ली- नोटाबंदीवरून संसदेचे कामकाज सलग आठव्या दिवशी ठप्प होते. या विषयावर पंतप्रधानांनी चर्चेत सहभागी होऊन आपली बाजू मांडावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. विरोधकांच्या कठोर भूमिकेमुळे पंतप्रधान मोदी हे संसदेत बोलण्यास तयार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षाने दिली.
नोटाबंदीवर राज्यसभेचे कामकाज सकाळी ११ ते २ या काळात तीन वेळा तहकूब झाले. तर लोकसभेचे कामकाज २.१० वाजेपर्यंत दोनवेळा तहकूब झाले.
लोकसभेत मल्लिकार्जुन खर्गे, सुदीप बंदोपाध्याय, मुलायम सिंग यादव यांनी स्थगत प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. या चर्चेत पंतप्रधानांनी सहभाग घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.
विरोधकांच्या मागणीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, नोटाबंदीच्या विषयावर पंतप्रधान जरूर चर्चा करतील. मात्र, ती चर्चा कोणत्या नियमाने व्हावी याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष घेतील.
नोटाबंदीबाबत सरकारच्या निर्णयावर कोणीही शंका घेऊ नये. सरकार या विषयावर चर्चा करण्यास कधीही तयार आहे. तसेच याबाबतच्या तक्रार ऐकून त्या सोडवण्यासाठी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.