राहुल गांधी जोरात आहेत. ‘मोदींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याजवळ असल्याचे’ राहुल गांधी सांगत आहेत. ‘ज्या दिवशी मी बोलेन त्या दिवशी भूकंप होईल’ असेही त्यांनी सांगितले आहे. संसदेत मला बोलू?दिले जात नाही, असे राहुल गांधी म्हणतात. नरेंद्र मोदी तेच सांगतात, ‘मला लोकसभेत बोलू दिले जात नाही म्हणून मी जनसभेत बोलतो.’ मोदींचे हे निवेदन राजकीय निवेदन आहे. ते पटणारे नाही. संसदेत मोदींच्या बाजूला २८३ चे बहुमत आहे. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले काँग्रेसचे ४० लोक मोदींना बोलण्याला विरोध कसा करणार आणि किती करणार? लोकसभा अध्यक्षा भाजपाच्या आहेत.
अध्यक्षांच्या नियंत्रणावर लोकसभा चालते. मोदींना बोलायला कोणीही अडवलेले नाही. त्यांना स्वत:लाच बोलायचे नव्हते. आतून कोणतेतरी दडपण त्यांच्या मनावर आहे. खरे म्हणजे संसदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांचे उत्तर अपेक्षित होते. एवढा मोठा आर्थिक निर्णय जाहीर झाल्यावर लोकसभेला त्याचे काही घेणे-देणे नाही, असे होऊ शकत नाही आणि पंतप्रधानांना लोकसभेत निवेदन केल्याशिवाय हा निर्णय रेटून नेता येतो हे स्पष्ट झाल्यामुळे लोकसभेचे महत्त्व संपून गेलेले आहे.
पंतप्रधान सर्वेसर्वा झालेले आहेत. मोदी जे सांगतात, ‘मला बोलू दिले जात नाही’ ही धादांत खोटी गोष्ट आहे. त्यांनाच निवेदन करण्यात पक्षांतर्गत अडचणी होत्या. त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते पंतप्रधान पदावर मोदींना कुठून बसवले इतक्या हतबलतेने आता घुसमटत आहेत. अडवाणींचा चेहरा आणि आठ दिवसांत त्यांनी व्यक्त केलेले त्यांचे मत याची साक्ष देत आहे की, पक्षांतर्गत सर्वकाही अलबेल नाही. भाजपाचेच नेते आतून घाबरलेले आहेत म्हणून बोलत नाहीत.
भाजपामध्येच मोदींविरोधात स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. मोदींना लोकसभेत बोलायचे नव्हते. घेतलेला निर्णय रेटून न्यायचा होता. त्यामुळे कांगावा करून ‘मला बोलू?दिले जात नाही, मला बोलू दिले जात नाही’ असे मोदी जनसभेत सांगू लागले आहेत. त्यांना बोलायचे असते तर त्यांनी कधीच बोलून टाकले असते. हातवारे करून ते बोलले असते. पंतप्रधान संसदेला अजिबात महत्त्व देऊ इच्छित नाहीत.
संसद कस्पटासमान आहे, असे त्यांना वाटते आहे. तीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाबाबत आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयालाही कोणतीच भीक घालायला तयार नाही आणि पर्वाही करायला तयार नाही. त्यामुळे लोकशाहीतला मोठा पेच या देशात निर्माण झाला आहे. पंतप्रधानांनी परस्पर निर्णय जाहीर करणे आणि संसदेला कसलीही माहिती न देणे, ही हुकूमशाहीची पावले आहेत.
नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर संसदेच्या इतिवृत्तात सरकारतर्फे कोणतेही अधिकृत निवेदन नोंदले गेलेले नाही. त्यामुळे या देशात नोटाबंदी झाली. जुन्या नोटा रद्द झाल्या, हे संसदेला माहिती नाही. मोदींनी सांगितले होते की, ‘इमानदारोंको घबरानेकी जरूरत नही.’ पण सगळय़ात घाबरला आहे तो इमानदार माणूस आणि हाल झाले आहेत ते इमानदार, प्रामाणिक माणसांचे. सांगण्यात आले होते की, एका आठवडय़ात २४ हजार रुपये बँकांतून काढता येतील.
सव्वा महिना झाला, कोणत्याही बँकेतून २४ हजार रुपये मिळत नाहीत. ३-४ हजार रुपयांच्या वर पैसे दिले जात नाहीत. आपलेच पैसे सामान्य माणसाला मिळू?शकत नाहीत. ही एक महाभयंकर परिस्थिती गेला सव्वा महिना आहे. सुरुवातीला मोदी सांगत होते, ‘संयम बाळगा. सबकुछ ठीक हो जाएगा..’ पण सर्वकाही बिघडत चालले आहे आणि परिस्थिती दर दिवशी सुधारण्याऐवजी हाताबाहेर चालली आहे.
आज देशाला नेतृत्व नाही. मोदी हा देश भलतीकडेच घेऊन चालले आहेत. घेतलेला निर्णय अंगाशी येतोय. जनता शिव्या घालते आहे, हे सर्व लक्षात आल्यानंतर आता ‘कॅशलेस’ ओरडा सुरू केला. लक्ष उडवण्याकरिता हा धंदा आहे. मोदी या जागेवर असेपर्यंत इथून पुढे या देशात बँकेमध्ये खातेदारांचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांना काढता येणार नाहीत. सांगण्यात येत आहे की, दोन-चार महिने ही परिस्थिती राहील. हे धादांत खोटे आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सक्त सूचना आहेत की, बचत खात्यातील रकमा काढून दिल्या जायच्या नाहीत. २४ हजार रुपये काढण्याचे फर्मान निघाले होते. कुणालाही २४ हजार रुपये काढू दिले जात नाहीत. यासाठी मोदींची युक्ती अशी आहे की, बँकांना चलनपुरवठा करायचाच नाही. आतापर्यंत जे झाले त्याहीपेक्षा एक भयानक आर्थिक अराजक या देशात पुढच्या काही दिवसांत येईल. बँकांचा फायदा एवढे एकमेव उद्दिष्ट या सरकारपुढे आहे. आता जो काही काळा पैसा म्हणून धाडी पडल्या, तो सर्व बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या संमतीने झालेला घोटाळा आहे. हा महाघोटाळा मोदींच्या पाठिंब्याने उघड उघड झाला. पण कोणताही राजकीय पक्ष आज या सर्व भूमिकेचा पर्दाफाश करायला तयार नाहीत.
आता तर राजकीय पक्षांना त्यांचा निधी बँकेत जमा करायला परवानगी मिळाली, याचा सगळय़ात मोठा फायदा भाजपाच करून घेईल. शिवाय पक्षाच्या निधीमध्ये अनेकांचे व्यक्तिगत निधीची बेरीज करून पक्षाच्या नावावर सगळा निधी जमा होईल. या संबंधीचे निवेदनही लोकसभेत झालेले नाही.
देशात काय चालले आहे ते कोणालाही समजत नाही. त्याविरुद्ध बोलणार कोण? राहुल गांधी म्हणतात, मला बोलू दिले जात नाही. राहुलजी, कोणी काहीही म्हणाले तरी या देशात पुन्हा काँग्रेस आणि काँग्रेसच क्रमांक एकवर आल्याशिवाय राहाणार नाही. काँग्रेसला कोणीही संपवू शकणार नाही.
काँग्रेसवालेच एकमेकांना संपवतील. आता तुमची कसोटी आहे. सोनियाजींची प्रकृती ठीक राहात नाही. तरी त्या आंदोलनात आघाडीवर आहेत. सध्या तरुणांचे आशास्थान तुम्ही आहात. सरकार आणि मोदींच्या विरुद्ध तुमच्याजवळ जी माहिती आहे ती तुम्हाला आता सांगावीच लागेल. ‘मला बोलू दिले जात नाही’ हे एक-दोन वेळा बोलणे ठीक आहे, पण सातत्याने तुम्ही तेच सांगत राहाल तर मोदींचे निवेदन जसे राजकीय आहे तसे तुमचे निवेदन राजकीय होईल. ही अतिशय कसोटीची वेळ आहे. तुम्ही बोला. स्पष्ट बोला. परिणामाची पर्वा न करता बोला.
भाजपावाले जेवढा शूरपणा दाखवतात, तेवढेच ते भेकड आहेत. कारण ते ढोंगी आहेत, खोटे बोलणारे आहेत. हेच मोदी परदेशातील काळा पैसा आणणार होते. आणू शकले नाहीत. हेच मोदी गरीब माणसांच्या खात्यावर १५ लाख रुपये चढवणार होते. अशी भंपक भाषणे करणारा पंतप्रधान देशाला मिळाला आहे आणि लोकांनीच तो डोक्यावर बसवून घेतला. अशा या वेळेला गांधी, नेहरू घराण्याचा वारसदार म्हणून राहुलजी तुम्हाला बोललेच पाहिजे.
मोदींचे जे भांडे तुम्हाला फोडायचे आहे ते फोडा. ‘भ्रष्टाचारमुक्त भारता’च्या घोषणा त्यांना कितीही करू द्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत करोडो नव्हे तर अब्जावधी रुपये ओतून ती निवडणूक जिंकली गेली. अंबानी-अदानी अशी एक फौज पोती घेऊन त्यांच्या मागे होती हे काही लपून राहिलेले नाही. तेव्हा ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ हे भाजपाचे ढोंग आहे. इथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत. गुन्हेगार बसलेले आहेत, गुन्हे दाखल झालेले बसलेले आहेत. त्यांना पाठी घालणारे मुख्यमंत्री मिजाशीत बोलत आहेत.
क्लीनचिटचा कारखाना काढला आहे, तर ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ हे भाजपाचे सर्वात मोठे ढोंग आहे. या ढोंगाचा बुरखा फाडायचा असेल तर राहुल गांधी तुम्हाला बोलावेच लागेल. तुमच्याजवळ जी काही माहिती आहे ती बोला. संसदेत बोलू दिले नाही, आता तुम्ही जनतेत बोला, कोण अडवतं ते बघू या. भाजपाच्या भ्रष्टाचाराचे भांडे तुम्हाला आता फोडावे लागेल. मोदी धुतल्या तांदळासारखे नाहीत, हे जगाला माहिती आहे. लाखो रुपयांचा कोट घालणारा ‘फकीर’ असल्याचे सांगतो, तेव्हा लोकं हसतात. मला काय घर-दार-संसार आहे का? असे प्रश्न मोदी विचारतात आणि भावनात्मकदृष्टय़ा आपण देशाच्या सेवेसाठी जन्माला आलो आहोत, असेही भासवतात.
चॅनेलवाले त्यांच्या आरत्या ओवाळायला तयारच आहेत. या विरोधात राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसच बोलू शकते आणि काँग्रेसचे प्रमुख म्हणून तुम्ही बोलू शकता आणि तुमच्याजवळ जर या सगळय़ाबद्दलचे पुरावे आहेत तर भूकंप झाला तरी चालेल. काही व्हायचे ते होऊ द्या.. पण ‘दूध का दूध ’ आणि ‘पानी का पानी’ होऊन जाऊ द्या. मनमोहन सिंग यांच्या राजवटीत स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला तो काँग्रेसच्याच खासदारांनी उघड केला.
मोदी म्हणतात, ‘मनमोहन सिंगांनी दहा वर्षे केले काय?’ स्पेक्ट्रम घोटाळय़ाची सुरुवात वाजपेयींच्या मंत्रिमंडळात प्रमोद महाजन कम्युनिकेशन खात्याचे मंत्री असताना त्यांनी या घोटाळय़ाची सुरुवात झाली आणि महाजन यांनी जे काही जमा केले त्यातून मंगलप्रभाती अनेक बिल्डर उभे राहिले. त्या घोटाळय़ात काँग्रेस पक्षाचा नसलेला मंत्री गुन्हेगार ठरला. त्याला तुरुंगाची हवा काँग्रेसने दाखवली. तो राजा असेल किंवा कनीमोळी असेल. त्यांना काँग्रेसने तुरुंगात घातले.
रेल्वेमंत्री पवन बन्सल यांच्या भाच्याने मामाच्या नावावर काही व्यवहार केला तर बन्सल यांना रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सुरेश कलमाडींवर आरोप आला, त्यांना तुरुंगात घातले. तिकीट दिले नाही. काँग्रेसच्या ज्या ज्या मुख्यमंत्र्यांवर ठपके ठेवले गेले त्या प्रत्येकाला मंत्रीपद सोडायला भाग पाडले. बॅ. अंतुले, निलंगेकर, अशोक चव्हाण यांना काँग्रेसने शिक्षा दिली. हे भाजपावाले सगळय़ात भ्रष्ट असताना त्यांच्या भ्रष्टाचाराची सुरुवात त्यांच्या अध्यक्षापासून झाली होती.
आठवतोय ना बंगारू लक्ष्मण. याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता खडसे जसे गेले तसे पूर्वी शिवणकर गेलेत. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या काकूंना भ्रष्टाचारामुळे राजीनामा द्यावा लागला होता. स्वत:च्या तोंडाला खरकटे लागले असताना केवळ सोशल मीडियाने काँग्रेसला झोडपायचे ठरवले म्हणून वातावरण तयार करून त्याचा फायदा भाजपानेच घेतला. या सगळय़ाचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.
राहुलजी, तुमच्याजवळ पुरावे आहेत, तर तुम्ही बोला.. सगळा देश तुमच्या मागे येईल. भाजपाच्या ढोंगीपणाचे बुरखे टरटरा फाडण्याची गरज आहे. आज देशात अराजक आहेच. दिसायला ते अहिंसक आहे. पण मनामनामध्ये असलेला संताप, राहुलजी, तुमच्या नेतृत्वाखाली व्यक्त व्हायला हवा. असे प्रसंग क्वचित येतात, ज्या दिवशी आपल्या सत्त्वाची कसोटी असते. तुमच्यापुढे एक मोठे आव्हान उभे आहे. सव्वाशे कोटीचा भारत आज रांगेत आहे. स्वत:च्या पैशासाठी रांगेत आहे. माणसं मरत आहेत. देशातील सगळे प्रश्न बाजूला पडलेले आहेत.
शेतक-यांच्या पिकांना भाव नाही. चांगला पाऊस होऊनही शेतक-यांचे मरण याच सरकारने त्याच्यावर लादले. बाजार कोसळलेत.. अर्थव्यवस्था निकालात निघाली आहे.. दुस-या अर्थाने देशच निकालात निघाला आहे.. अर्थमंत्री बाहुली आहे.. रिझर्व्ह बँक बटीक आहे. देशाला कोणी वाली नाही.. सामान्य माणसाला कोणी वाली नाही. एक भयानक अराजकाची परिस्थिती देशात अवतरलेली आहे. यावेळी कोणीतरी बोलणे आवश्यक होते आणि आहे आणि तुमच्यासारख्या काँग्रेस पक्षाच्या जवळपास सर्वोच्च पदावर असलेल्या, संसदेत खासदार असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने, उपाध्यक्षाने घाव घालण्याची गरज आहे.
राहुलजी, तुम्ही बोला, स्पष्ट बोला.. तुमच्या मागे देश येईल आणि आज देश सावरण्याची जबाबदारी शेवटी काँग्रेसची आहे. ५० वर्षात काँग्रेसने काय केले? अशी तीनपाट भाषा भाजपावाले जेव्हा करतात, तेव्हा या देशाशी त्यांचे काही घेणं-देणं राहात नाही. ५० वर्षात काय घडले आणि जगात सातव्या क्रमांकावर भारत कसा गेला.. मोदी अधिकारावर आल्यावर जेवढी उद्घाटने करत बसले आणि ‘हरी झेंडी’ दाखवत बसले ती सगळी कामे काँग्रेस राजवटीने केली होती. ५० वर्षात देश स्वयंपूर्ण केला.
आजची सगळी वैज्ञानिक संगणकीय आघाडी, ज्याचा वापर करून तुम्ही आज ‘कॅशलेस’च्या गोष्टी करता.. ते सगळे तंत्रज्ञान राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना आणले आहे. काँग्रेसने आणले आहे. ज्या काश्मिरात मोदींनी रेल्वे सुरू?करताना ‘हरी झेंडी’ दाखवली ती रेल्वे काँग्रेसच्या राजवटीतच तिथे पोहोचली. उद्घाटन करायच्या वेळी मोदींना संधी मिळाली. अडीच वर्षात मोदींनी भाषणाखेरीज केले काय? तेवढे सांगावे.. दिलेल्या आश्वासनांपैकी एक तरी आश्वासन पाळले का? महागाई कमी झाली का? नोटांचे संकट कोणी आणले?
राहुलजी, देशातील हा सर्वसामान्य माणसांच्या मनातील संताप तुमच्या मुखावाटे आता व्यक्त व्हायला हवा. मेहरबानी करा आणि देशभर फिरायला बाहेर पडा. १९७७ साली इंदिराजी पराभूत झाल्या आणि जेव्हा त्या पवनारला आल्या तेव्हा त्यांच्या मागे सगळा देश उभा असल्याचे चित्र त्यांना दिसून आले. अडीच वर्षात हे चित्र बदलले. मोदींनाही अडीच वर्षे झाली आहेत. त्यांची कलई निघून गेलेली आहे. लाट तर कधीच ओसरली आहे. ती ओसरली नसती तर दिल्ली, बिहार, बंगाल, तामिळनाडू, केरळ इथे भाजपाची कल्हई का निघाली असती आणि महाराष्ट्रातही मोदी लाटेनंतर विधानसभेत भाजपाला बहुमत कुठे मिळाले आहे? लाट कधीच गेलेली आहे.