रायगड जिल्हा परिषदेवर आपली सत्ता राखण्यात शेकापने यश मिळवले आहे. सर्वाचे अंदाज खोटे ठरवत शेकापने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या. त्याखालोखाल शिवसेनेचे १८ उमेदवार विजयी झाले. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे मात्र नुकसान झाले आहे. २०१२ मध्ये सर्वाधिक २० जागा जिंकणा-या राष्ट्रवादीला यावेळी केवळ १२ जागा जिंकता आल्या आहेत. भाजपाने ३ तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्या आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ व १५ पंचायत समित्यांच्या ११९ जागांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदार झाले. गुरुवारी मतमोजणी झाली. स्थानिक पातळीवर झालेल्या वेगवेगळ्या आघाडीमुळे काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत. निवडणूक प्रचारातील वातावरण पाहता शिवसेना मोठागट म्हणून उदयास येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मात्र शेकपने सर्वाधिक २४ जागा जिंकून सर्वाचे अंदाज फोल ठरवले. २०१२ साली झालेल्या निवडणुकीत शेकापने १९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांनी ५ जागा जास्त जिंकल्या आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सार्वाधिक २० जागा जिंकून मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
राष्ट्रवादीला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसचे देखील नुकसान झाले आहे. २०१२ मध्ये काँग्रेसने ७ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना केवळ तीनच जागा जिंकता आल्या आहेत. भाजपाला २ जागांचा फायदा झाला आहे. त्यांचा केवळ १ सदस्य होता. यावेळी भाजपाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. मागील वेळीस शिवसेना तिस-या स्थानावर होती. १७ जागा जिंकून शिवसेना दुस-या स्थानावर आहे. काँग्रेसने ३ जागा जिंकल्या.
शेकापने अलिबाग, पेण, पनवेल या आपल्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली. शेकापने पनवेलमध्ये ८ पैकी ६ जागा जिंकल्या, पेणमध्ये सर्वच्या सर्व ५ जागा जिंकून सर्वानाच धक्का दिला. अलिबागमध्ये ७ पैकी ५ जागा शेकापने जिंकल्या. शिवसेनेने दक्षिण रागडात आघाडी घेतली; परंतु उत्तर रायगडात त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.
राष्ट्रवादीला माणगाव, श्रीवर्धन, रोहा, सुधागड या तालुक्यांमध्ये नुकसान सहन करावे लागले आहे. संजय जांभळे, भाई शिंदे, गीता पालरेचा, राजेंद्र ठाकूर, वैकुंठ पाटील, चित्रा पाटील या दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला. चित्रा पाटील अलिबाग तालुक्यातील कुर्डूस व थळ अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. त्यापैकी थळ मतदारसंघात त्यांना शिवसेनेच्या मानसी दळवी यांनी पराभूत केले.