शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेने महापालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना पावसाळा संपल्यावर रेनकोट दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे- शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेने महापालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना पावसाळा संपल्यावर रेनकोट दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरवर्षी लाखो रुपये खर्चून या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात रेनकोट पुरवण्यात येतात. मात्र यंदा रेनकोट वाटप होईपर्यंत पावसाळा संपल्याने आता याचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कौसा येथील शाळेत हा प्रकार सुरू असताना स्थानिक नगरसेवक हिरा पाटील यांनी यावर आक्षेप घेतल्याने हा प्रकार समोर आला आहे.
कौसा येथील महापालिका शाळा क्रमांक ३३, ७०, ७४, ९६, ९९, १००, १२३, १०८, १०६, ११७, १०९, १०४ यांसह १३ शाळांमध्ये गुरुवारी रेनकोट वाटण्यात येत होते. याबाबत माहिती मिळताच हिरा पाटील यांनी तिथे धाव घेत रेनकोटने भरलेला टेम्पो रोखला आणि जाब विचारला. या रेनकोटच्या खरेदीसाठी पालिकेने लाखो रुपये खर्च केले असून त्याचा पावसाळा संपल्यावर काय उपयोग? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळावर शिवसेनेची सत्ता असून ९वी पास प्रभा बोरीटकर या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे शिक्षण विभागात सगळा ‘आनंदी आनंद’ असल्याचे यंदा पाहायला मिळत आहे.