मानवी मनाची वेगवेगळी आवर्तने, मनाचे आभास आणि त्या आभासांची परिणती प्रत्यक्षात उतरणे इत्यादी वास्तव सदृश भावभावनांचे, नातेसंबंधांचे रहस्यमय दर्शन आपल्याला या कथांमधून घडते.
दर्शनला शुद्ध आनंद झाला होता; पण मला मात्र ते दृश्य पाहवत नव्हतं. त्या टिपूर चांदण्यात दर्शन हसत उभा आणि त्याच्या शरीरावर ते, पूर्णपणे विसंगत असे दोन स्त्रीचे पंजे.. तिचे ते दोन हात दर्शनच्या पंजांना शोधत होते. त्याची गिड्डी बोटं, राकट पंजे तिला हवे होते; पण ते आता तिथं नव्हतेच..
‘बारा-पस्तीस’ या रत्नाकर मतकरी यांच्या ‘हात’ या कथेतील वरील उतारा असून, वाचकांना या कथा कोणत्या पठडीतील असतील हे समजायला फारसे कष्ट पडणार नाहीत. रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.
नाटककार, कथाकार, पटकथा लेखन इ. विविध साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मराठी वाचकांच्या मनावर मोहिनी घातलेली आहे. त्यांची कथा ही बहुदा गुढतेच्या मार्गाने लिहिलेली असते. प्रस्तुत कथा संग्रहातील कथा या गूढतेच्या मार्गाने वाचकांसमोर आलेल्या आहेत.
तरी देखील या कथा वास्तवाशीच निगडित राहिलेल्या आहेत. प्रेम, असूया, द्वेष, मैत्री, व्यभिचार, सूड, फसवणूक, आनंद अशा विविध मानवी मनाच्या छटा या कथांमधील विविध पात्रांच्या माध्यमातून आपल्याला वाचावयास मिळतात.
मानवी मनाची वेगवेगळी आवर्तने, मनाचे आभास आणि त्या आभासांची परिणती प्रत्यक्षात उतरणे इत्यादी वास्तव सदृश भावभावनांचे, नातेसंबंधांचे रहस्यमय दर्शन आपल्याला या कथांमधून घडते. अर्थात काही कथांमधून मनाची आवर्तने कथांमधील पात्रांच्या माध्यमातून टिपण्याचा लेखकाने प्रयत्न केला असला तरी काही कथांमध्ये त्याचा वास्तवाशी संबंध लावणे कठीण जाते. कारण ते अतार्किक आहे असे जाणवते. परंतु त्यामुळेच तर अशा कथांना गूढपणाचे संबोधन लागलेले असावे व या गूढतेच्या वलयामुळेच या कथा, गूढताच वाचकांना खिळवून ठेवतात.
‘बारा-पस्तीस’ या कथासंग्रहामध्ये एकूण नऊ कथांचा समावेश आहे. यापैकी ट्रॅप, भ्रम व लांडगे या कथा संपूर्ण वास्तवतेकडून गूढतेच्या मार्गाने जाणा-या आहेत. परंतु ही गूढता वास्तवाशी निगडित आहे. ‘ट्रॅप’ या कथेमध्ये एक तरुण मुलगा एका श्रीमंत वृद्ध बाईच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याची प्रेयसीच त्याला ट्रॅप करते व तुरुंगात टाकते.
मानसिक आजार एका पिढीतून दुस-या पिढीत संक्रमित होत असतो. याचे ‘भ्रम’ या कथेद्वारे आपणास प्रत्यंतर येते. एका सुखासीन जीवनाचा दु:खदायी शेवट वाचकाच्या अंगावर नक्कीच शहारे आणून जाईल.
तर ‘लांडगे’ या कथेमध्ये अल्पवयीन मुलीवर राजकारणी व्यक्तीकडून झालेला अत्याचार व त्यातून तिच्या आईची या विरोधात लढण्याची जिद्द अंगावर शहारे आणणारी आहे.
इतर कथांमध्ये मात्र मानवाच्या अंतर्मनातील आभासी प्रतिमा कथापात्रांच्या आयुष्यातील घडामोडींचे दर्शन घडवतात. या आभासी प्रतिमांना लेखकाने कथाविस्तारासाठी वास्तवतेचे वलय दिले असून कथांमध्ये रहस्य व गूढता निर्माण केली आहे. कथा वाचत असताना या वरकरणी अतक्र्य वाटणा-या घटना जरी आभासी वाटत असल्या तरी या घटना वास्तवाशीच निगडित आहेत असा प्रत्यय वाचकाला येतो व कथेमधील उत्कंठा कायम राहते. वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवण्याचे काम रत्नाकर मतकरी यांच्यासारखा चतुरस्र् आणि अनुभवी लेखकच करू शकतो.
ख-या अर्थाने रत्नाकर मतकरी यांची कथा परिचित वास्तवाशी नाते सांगत अपरिचित, आभासी, गूढ आणि अद्भुत अशा दुनियेमध्ये मार्गक्रमण करते. तरीही या कथांचे वास्तवाशी असलेले नाते पूर्णत: तुटणार नाही, किंबहुना या कथांचा वास्तवाशी असलेला दुवा कायम राहावा यासाठी लेखक नेहमीच प्रयत्नशील असल्याचे कथाविस्ताराच्या माध्यमातून जाणवते.
संपूर्ण महाराष्ट्राने रत्नाकर मतकरी यांच्या कथांवर केलेले प्रेम हे त्याचेच प्रतीक आहे. कारण बारा-पस्तीस या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती २००३ मध्ये, दुसरी आवृत्ती २००९मध्ये तर तिसरी आवृत्ती २०१६ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. यावरूनच रत्नाकर मतकरी यांच्या कथांचे यश, मराठी साहित्यातील त्यांचे स्थान लक्षात येते. या कथासंग्रहाच्या अजूनही आवृत्त्या येत्या काळात आपणास पाहावयास मिळतील यात शंकाच नाही.
बारा-पस्तीस
लेखक : रत्नाकर मतकरी
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठे : १८२, मूल्य : १९५/-