मुळमुळीत राजकारण करणे आम्हाला पसंत नाही आणि आम्ही ते कधीच केले नाही. तुम्हा राणेंच्या कार्यकर्त्यांसारखे जिवंत धगधगते कार्यकर्ते कुठेच भेटणार नाहीत.
कुडाळ- मुळमुळीत राजकारण करणे आम्हाला पसंत नाही आणि आम्ही ते कधीच केले नाही. तुम्हा राणेंच्या कार्यकर्त्यांसारखे जिवंत धगधगते कार्यकर्ते कुठेच भेटणार नाहीत. आपण एक नंबर आहात आणि एक नंबरच राहणार. निळे, पिवळे, काळे, वाकडेतिकडे आता कोणच राहणार नाहीत, असे सांगताना खा. राऊत, ‘सिंधुदुर्ग राजा’ला आम्ही भाजपात जावे म्हणून गाऱ्हाणे करता, सिंधुदुर्ग राजा आम्ही ठेवतो, तो तुमचे कसे काय ऐकेल? २०१९च्या निवडणुकीत राऊतांचा नवस फेडणारच नाहीतर दाढी नाय काढणार, अशी शपथ माजी खासदार निलेश राणे यांनी घेताच हशा आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
माजी खासदार युवा नेते निलेश राणे यांनी आपल्या दिलखुलास भाषणाने सभागृहात हशा आणि टाळ्या पिकवल्या. ते म्हणाले, महाराष्ट्रात राणेसाहेब प्रत्येकाला हवेहवेसे का वाटतायत? याचा विचार पोट छातीपर्यंत आलेल्या अशोक चव्हाणांनी करावा. रत्नागिरीत ६५ टक्के कुणबी समाज, २२ टक्के मराठा आहे. तेथे आजही जिल्हाध्यक्ष देत नाहीत. कुणबी समाजाचा उमेदवार द्या, अशी आमची मागणी आहे. पण यांना काम करणारी लोकच नको आहेत. हुसेन दलवाई खासदार निधी देण्यासाठी १५ टक्के कमिशन घेतात. पैसे खाण्यासाठी खासदार निधी असतो काय? या दलवाईंचे चिपळूणमध्ये कोण ऐकतही नाही. परवा सावंतवाडीत मी असतो तर टेबलच उचलून नेले असते, असे सांगताच सभागृहात हशा पिकला. तो भाई जगताप की कोण आहे, त्याचे नाव अशेाक जगताप. त्याला पूर्वी ‘झिपऱ्या अशोक’ म्हणायचे, असे सांगून सभागृहात खसखस पिकवली. का नाही निवडणुका लढवत हे? त्यांना राज्यसभा दिली. हुसेन दलवाईंचा या जिल्ह्यात काय संबंध? रत्नागिरीत त्यांना कोण विचारत नाही. २५ माणसांसाठी १०० पोलिसांच्या बंदोबस्तात रत्नागिरीत बैठक झाली. आमच्या लोकांना अडविण्यात आले. त्यांच्या बायकोला कळले असते तर बायको म्हणाली असती ‘मारा त्याला’ असे माजी खा. निलेश राणे म्हणताच पुन्हा सभागृहात खसखस पिकली.
विकास सावंत यांचा समाचार घेताना निलेश राणे म्हणाले, मी या माणसाला पहिल्यांदाच पाहिले तेव्हा ‘शाकाल’च असल्यासारखे वाटले. त्याच्या डोक्यावर लहानपणापासूनच केस नाहीत काय? आणि अशा विकास सावंत यांना पालकमंत्री शुभेच्छा देतात. अरे, तुमच्या शुभेच्छांनी त्याच्या डोक्यावर केस येणार काय? असे विचारून पुन्हा सभागृहात खसखस पिकवली. रोज अनेकांचे फोन येतात. ‘कुठे चाललात’ म्हणून विचारतात. मी म्हणतो ‘घरी चाललो!’. ‘आज नवीन काय’ म्हणून विचारतात, तेव्हा त्यांना सांगतो मी आता सुरेश प्रभू झालो आहे त्यांच्यासारखा रोज जुनेच कुडते घालतो, असे सांगून त्यांनी सभागृहात खसखस पिकवली.
कॉँग्रेसमध्ये आलो तेव्हाचा तो उत्साह आज पुन्हा दिसतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही जिल्हाध्यक्ष द्या म्हणून मागतोय तर तेथे ते देऊ शकत नाहीत. आणि सिंधुदुर्गात मात्र चांगल्या पद्धतीने काम चालले आहे. तिथली कार्यकारिणी बरखास्त करून दुसरा जिल्हाध्यक्ष दिला जातोय, हा प्रकार म्हणजे अशोक चव्हाणांना राणेसाहेब नको आहेत याचे प्रतीक आहे. यश मिळविणारी माणसे आणि कार्यकर्ते अशेाक चव्हाणांना नको आहेत. त्यांचा आमच्यावर आकस आहे. मात्र, आपले कार्यकर्ते सुद्धा चव्हाणांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. जसे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी सांगितले. सोनिया गांधी यांचा फोन किंवा पत्र येत नाही. तोपर्यंत कॉँगेस कार्यकारिणी बरखास्त होणार नाही, एवढा विश्वास असलेले सिंधुदुर्गातील कार्यकर्ते पाहिल्यानंतर ते अशोक चव्हाणांच्या कित्येक पटीने पुढे आहेत, असे माजी खा.निलेश राणे म्हणाले.
[EPSB]
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची प्रतिज्ञा
[/EPSB]