संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचाव?’ हे त्यांच्या ‘ग्रामगीते’च्या चाळिसाव्या अध्यायात सांगितलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ‘ग्रंथाध्ययन.’
ऋषीमुनींनी लोकांच्या उद्धाराचा मार्ग दाखविणारे ग्रंथ लिहिले. पण ते संस्कृत भाषेत असल्यानं सामान्य माणसांच्या भाषेत-लोकभाषेत-हे ज्ञान सांगणं आवश्यक होतं. ते कार्य संतकवींनी केलं. अशाप्रकारे मराठी भाषेत कवी परंपरा निर्माण झाली. त्यांना सा-या समाजाला चांगलं वळण आवश्यक होतं.
स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनीही आपल्या ग्रंथातून ज्ञानाचं प्रतिपादन करून समाजावर सुसंस्कार केले, पण या सर्व ग्रंथातून नेमकं घ्यायचं काय? हजारो ग्रंथ वाचले खरे, पण त्यांतून जे मिळवायचं तेच मिळालं नाही, तर त्याचा काही उपयोग आहे काय? त्याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात,
भाविक जनांसि लावावया वळण।
आकळावया सकळ ज्ञान।
संत-महंत उपकार ऋण।
केले असे आम्हांवरी।।
संस्कृतांतूनि काढूनी सार।
सुलभ केले प्राकृत ग्रंथ-भांडार।
जनसाधारणासीही कळावे सविस्तर।
उद्धार – मार्ग म्हणोनिया।।
पुरातन संस्कृत ऋषि-बोली।
त्यातूनि बहुविध भाषा जन्मली।
तैसीच मराठीही वाढविली। संत कविराजे।।
संत ज्ञानदेव, मुकुंदराज। चक्रधर, नाथादी हंसराज।
यांनीच सुलभ केले सहज। ज्ञान प्राकृत ग्रंथातरी।।
समर्थ रामदासादि झाले। मुक्तेश्वर – मोरोपंतादि भले।
गीत, अभंग, गाथे लिहिले। महाराष्ट्र-ग्रंथकर्त्यांनी।।
महाराष्ट्री संत – कवी परंपरा।
तैसाचि चरित्र – ग्रंथाचा पसारा।
वळणी लावावया समाज सारा ।
ग्रंथ लिहिले बहुतांनी।।
स्वामी विवेकानंदादि संती ।
जुन्या – नव्यांची वाराया भ्रांति।
ज्ञानदीप उजळले आपुल्या ग्रंथी। नाना भाषांमधुनी।।
पण हे ग्रंथ वाचायचे कशासाठी नि त्याचं पारायण तरी कशासाठी करायचं, हे लक्षात घ्यायला हवं. संत-महंतांनी नि महापुरुषांनी वर्षानुवर्ष सखोल अध्ययन व चिंतन करून जे ज्ञान मिळवलं, ते त्यांनी आपल्या ग्रंथात प्रतिपादिलं आहे. या ज्ञानाचा लाभ आपण घ्यायला नको का? पण त्यासाठी केवळ भाराभर ग्रंथ वाचून उपयोग नाही. या गं्रथांपैकी आपण कोणते वाचायचे, याची योग्य निवड करायला हवी, तारतम्य बाळगायला हवं, ही या संदर्भातली एक आवश्यक बाब आहे. नाहीतर आपण काहीही वाचत राहू व आपल्याला अपेक्षित माहिती व ज्ञान मिळणार नाही. यासाठी ग्रंथाची निवड ही महत्त्वाची गोष्ट आहे.
त्या सर्वातूनि शोधून घ्यावे।
जे तात्त्विक बोध-ग्रंथ स्वभावे।
कर्मठतेच्या भरा न भरावे।
अथवा शुष्क पांडित्याच्या।।
आपली पात्रता ओळखोन ।
समाजाचि पातळी लक्षून।
आदर्शाचे सुलभ होय ज्ञान ।
ऐसेचि ग्रंथ वाचावे ।।
ग्रंथ वाचताही तारतम्य ठेवावे ।
कोणत्या ग्रंथातून काय घ्यावे?
काय सोडावे? काय आचरावे?
उन्नतीसाठी आपुल्या?
बोलके ज्ञान सांगण्यासाठी ।
ग्रंथ वाचले उठाउठी।
तेणे आत्मघात होतो शेवटी।
शांती तिळभर लाभेना।।
सखोल अध्यात्माचे ग्रंथ।
त्यासाठी बुद्धीही पाहिजे समर्थ।
आणि उमगला पाहिजे कर्तव्यपथ। अर्जुनापरी ।।
एरव्ही हजारो ग्रंथ वाचले।
त्यांतील मर्मचि नाही कळले।
तरि ते वाचणे वाउगेचि गेले। वेडयापरि।।
केवळ तार्किक आणि पांडित्यपूर्ण ग्रंथाचा सामान्य माणसांना काय उपयोग? जे ग्रंथ आपल्या कल्याणासाठी नि उन्नतीसाठी काही सांगत असतील, ते अवश्य वाचावेत. त्यात आपण काय करावं नि काय करू नये, याचं मार्गदर्शन आपल्याला निश्चित मिळेल.
जे ग्रंथ कर्मठपणावर भर देत असतील ते वाचू नयेत. कारण कर्मठपणा हा निकोप जीवनाला बाधक ठरतो. ज्या ग्रंथात चांगले चांगले आदर्श सांगितले असतील ते वाचल्यास आपल्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे आपल्या जीवनाची जडणघडणही चांगली होईल. आपण केवळ पढीक पांडित्य सांगणारे ग्रंथ वाचले, तर आपणच आपला घात करून घेऊ.
सामान्य माणसानं चांगलं जीवन कसं जगावं, याचं प्रतिपादन ज्या ग्रंथात केलं आहे, ते वाचावेत. फार विद्वज्जड, तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारे ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त असले, तरी सामान्य माणसांसाठी त्यांचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्या प्रकारचं जीवन जगतो, त्यासाठी उपयुक्त असे ग्रंथच वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो, त्याचं मर्म आपल्याला कळायला हवं. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मन:शांतीही मिळते. योग्य वाचन केल्यानं असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठीच नसतं, तर सध्याचं जीवन जगण्यासाठीही आवश्यक असतं.