उत्तरेकडील भागात अद्याप थंडी कायम असून; याचा फटका रेल्वे गाडय़ांना बसला आहे.
नवी दिल्ली- उत्तरेकडील भागात अद्याप थंडी कायम असून; याचा फटका रेल्वे गाडय़ांना बसला आहे. या भागात पडत असलेल्या दाट धुक्यामुळे अनेक ट्रेन उशिरा धावत असून; श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने या ठिकाणी जाणा-या विमानांची १२ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
दिल्ली गुरुवारी दुपारी आकाश निरभ्र दिसले तरी; सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे उत्तरेकडे जाणा-या ८५ ट्रेन उशिरा धावत होत्या. काही प्रमाणात याचा फटका विमान उड्डाणांनाही बसला. हवामान खात्यानेही शुक्रवारी दुपारपासून किंचित पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. काश्मीरमध्ये सलग तिस-या दिवशीही बर्फवृष्टी होत असून; ही स्थिती पुढील काही दिवस कायम असेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे.
सततच्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून होणारी विमानांची १२ उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ अधिका-यांकडून देण्यात आली. दरम्यान, गुलमर्ग येथे तीन फुटांपर्यंत बर्फ साचल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला आहे; मात्र अमरनाथ यात्रेकरूंसाठी येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पहलगाम येथे बेस कॅम्पची सोय करण्यात आली आहे.
या ठिकाणी ३.५ सेमी इतका बर्फ साचला असून; पारा १.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. दुसरीकडे पूर्व पट्टय़ातील बिहार व पश्चिम बंगालही रात्री पडणा-या थंडीने गारठला आहे. पटना, गया, भागलपूर आणि पुरिना या भागात पारा १ ते २ डिग्री सेल्सिअसने खाली आला. या भागात कमीत कमी तापमान ११.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले असून; यात आणखी कमी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.