ऑलिंपिकमध्ये भारताला पदकं मिळत नाहीत म्हणून मोठय़ा हिरिरीने मित्रपरिवारात आपल्याकडे खेळाडू तयार व्हायला कसं पोषक वातावरण नाही यावर मतप्रदíशत करणारे हेच पालक आपल्या पाल्याची खेळाकडे असणारी ओढ समजून न घेता, त्याला प्रोत्साहन न देता फक्त अभ्यासक्रमच महत्त्वाचा मानतात.
कोणतंही बीज कुठेही रूजत नाही. त्यासाठी पोषक वातावरण, उत्तम माती, खत, योग्य पाणी यांची गरज असते तसंच विद्यार्थ्यांचंही असतं. योग्य विचार, मार्गदर्शन त्यांना मिळालं तर हे विद्यार्थी बिजासारखंच रूजून स्वत:ची ओळख बनवू शकतात.
बॅचलर ऑफ मास मीडिया अर्थात बीएमएमच्या विद्यार्थ्यांना शिकवताना अनेकदा माझ्या शिक्षकांनी शिकवताना वापरलेल्या अनेक पद्धती मला आज उपयोगी पडतात. यातलीच एक पद्धत म्हणजे स्वत:तले पाच गुण आणि पाच अवगुण कोणते याची माहिती विद्यार्थ्यांनी लिहिणं. प्रथम वर्ष मराठी बीएमएमच्या विद्यार्थ्यांना संभाषणात्मक कौशल्य हा विषय शिकवताना मी दरवर्षी त्यांच्याकडून त्यांच्यातले गुण, अवगुण कोणते ते समजून घेते.
गेली जितकी र्वष मी हा उपक्रम राबवत आहे तेवढी सगळी वष्रे एक-दोन अपवाद वगळता बहुतेक विद्यार्थी आपल्यातले अवगुण पटकन सांगतात, पण गुण सांगण्यासाठी त्यांना विचार करावा लागतो. वरवर बघता हा उपक्रम अगदी सोपा आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा गुण, अवगुण लिहिण्याची वेळ येते तेव्हा ते किती कठीण आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं.
खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यांत काही ना काही गुण असतातच. पण अनेकांना ते माहीतच नसतात; कारण असे गुण त्यांच्या लक्षात येण्याची संधीच त्यांना कधी मिळालेली नसते. लहानपणापासूनच प्रत्येक जण हा अज्ञानी, अननुभवी, चंचल असतो, चांगलं, वाईट याची जाणीव नसते, त्याला सतत मार्गदर्शन करण्याची गरज असते, असाच बहुसंख्य पालकांचा आणि शिक्षकांचा समज असतो. यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतं शिक्षण घ्यायचं, कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं याचे निर्णय अनेकदा पालकच घेताना दिसतात. याचा अनुभव एक शिक्षक म्हणून आम्हाला सतत येत असतो.
पाल्यानं इतर कोणत्याही उपक्रमात भाग घेण्याऐवजी फक्त आणि फक्तअभ्यासच करावा, यासाठीही पालकांकडून अनेकदा नको इतकं दडपण आणलं जातं. आमच्याकडे असणारी एक विद्याíथनी शाळेत असताना सतत पहिल्या, दुस-या क्रमांकाने उत्तीर्ण होत असे. मात्र महाविद्यालयातल्या वातावरणाशी जुळवून घेत असताना, क्रमिक पुस्तकं, गाईड, कोचिंग क्लासेस यांच्या मदतीशिवाय कराव्या लागणा-या अभ्यासामुळे हा क्रमांक किंचित घसरला.
पहिल्या तिनात आपली मुलगी नाही याचा तिच्या पालकांना इतका राग आला, की एक संपूर्ण रात्र त्या मुलीला घराबाहेर उभं राहण्याची शिक्षा त्यांनी दिली. ही विद्याíथनी खूप छान डान्स करायची. पण डान्सपेक्षाही तिचा अभ्यास आणि तिचा उत्तीर्ण होण्याचा क्रमांकच तिच्या पालकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला होता.
एक शिक्षक म्हणून माझा अनुभव आहे, की प्रत्येक विद्यार्थी हा नेहमीच आत्मपरीक्षण करत असतो. त्याला आपल्या भावना, स्वप्नं, क्षमता, उणिवा यांची पूर्ण जाणीव असते. तो सतत स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करत असतो. स्वत:च्या विचार प्रक्रियेचं परीक्षण करत असतो. त्याला स्वत:ची उत्तम ओळख असते, मात्र हे उघडपणानं सांगण्याची वेळ अनेकदा त्यांना मिळतच नाही. त्यामुळे आपल्यात हे गुण आहेत, याची स्पष्ट जाणीव त्यांना होत नाही.
‘डिस्क्लेसिया’सारख्या विषयावर आलेला ‘तारे जमीं पर’सारखा चित्रपट, त्यातून निर्माण झालेलं विद्यार्थ्यांचं भावविश्व, त्याच्या भविष्याबाबत पालकांमध्ये निर्माण झालेली भीती, त्यावर मात करण्यासाठी शिक्षकानं पुढाकार घेऊन केलेले प्रयत्न, यात त्याला मिळालेलं यश हे सारं बघून मला आमच्याच एका विद्यार्थ्यांची आठवण झाली.
डिस्क्लेसिया असलेला हा विद्यार्थी लिहिण्या-वाचण्यात नेहमीच चुका करत असे. त्यामुळे परीक्षेत पेपर लिहिताना आणि तो पेपर तपासताना आम्ही नेहमीच त्याला झुकतं माप देत असे. मात्र या विद्यार्थ्यांला जाहिराती बघणं, त्यावर विचार करणं, नव्या जाहिरातींसाठी ‘थीम’ सुचवणं यात खूपच रस होता.
इतकंच नाही तर, त्यानं जाहिरातींच्या सुचवलेल्या या कल्पना इतक्या वेगळ्या, नावीन्यपूर्ण असत की हा विद्यार्थी इतका विचार कसा काय करू शकतो? याचं आश्चर्य आम्हाला वाटायचं. त्याचे पालक, आम्ही शिक्षक त्याच्या या गुणाला नेहमीच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असायचो.
मला विशेष कौतुक वाटायचं ते त्याच्या पालकांचं. आपला मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे, हे लक्षात आल्यानंतर त्याचा बाऊ न करता त्यांनी आपल्या मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात जायला, शिक्षण घ्यायला पूर्ण प्रोत्साहन दिलं. त्या विद्यार्थ्यांलाही आपल्यात काय कमी आहे, यापेक्षा काय चांगलं आहे याची असणारी जाणीव सुखावणारी होती.
विद्यार्थ्यांमध्ये असणारे गुण शोधायला शिक्षकानं प्रयत्न करायला हवेत, असं मला वाटतं. याची सुरुवात अतिशय सोप्या सोप्या प्रश्नांनी करता येऊ शकते. तुला काय आवडतं, काय नावडतं? भविष्यात कोण व्हायचं आहे? छंद कोणता? कोणत्या व्यक्ती आवडतात? त्याच का आवडतात? एकटं असताना तुम्ही कोणते विचार करता? त्यातले कोणते विचार योग्य वाटतात? कोणते अयोग्य? का? यासारख्या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करता येतं.
अशा अनेक प्रश्नांच्या मदतीनं माझ्यातल्या शिक्षकाला कसं शिकवायचं याचाही अंदाज येतो. आपण फारसे बोलके नाही पण आपल्या हातून कागदावर उतरणारे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात, आपण चांगली बातमी किंवा चांगली ‘जाहिरात कॉपी’ लिहू शकतो ही जाणीव विद्यार्थ्यांना याच गुण-अवगुणांच्या छोटय़ाशा चाचणीतून व्हायला लागते.
खरं तर शालेय जीवनात आपल्या पाल्याची चौफेर प्रगती व्हावी म्हणून विविध क्लासेसना घालणारे पालक वेळ आली तर मात्र फक्तआणि फक्त परीक्षा, त्यातील गुणांनाच महत्त्व देताना दिसतात. ऑलिंपिकमध्ये भारताला पदकं मिळत नाहीत म्हणून मोठय़ा हिरिरीनं मित्रपरिवारात आपल्याकडे खेळाडू तयार व्हायला कसं पोषक वातावरण नाही यावर मतप्रदर्शित करणारे हेच पालक आपल्या पाल्याची खेळाकडे असणारी ओढ समजून न घेता, त्याला प्रोत्साहन न देता फक्तअभ्यासक्रमच महत्त्वाचा मानतात.
याशिवाय बी. एम. एम.च्या अनेक विद्याíथनींना भेडसावणारा एक मोठा प्रश्न म्हणजे इंटर्नशिपचा. घरी आई-वडील दोघंही कमवणारे असताना तुला नोकरीची गरजच काय असं म्हणून अनेक विद्यार्थिनी योग्य संधी असूनही त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं शिक्षण घ्यायला प्रोत्साहन देणारे हेच पालक आता मात्र का ठामपणे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत असा संभ्रम अनेकदा या मुलींच्या मनात निर्माण होतो. यातूनच विसंवादाला सुरुवात होते. म्हणूनच योग्य संवादाचा समन्वय पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असेल तर सकारात्मक बदल नक्कीच पाहायला मिळतील.