आगामी रिओ ऑलिंपिकसाठी स्टार स्पोर्ट्स सज्ज झाले आहे. स्टार स्पोर्ट्सतर्फे आठ चॅनेल्सवर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
मुंबई- आगामी रिओ ऑलिंपिकसाठी स्टार स्पोर्ट्स सज्ज झाले आहे. स्टार स्पोर्ट्सतर्फे आठ चॅनेल्सवर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. ऑलिंपिकचे अधिकृत प्रसारणकर्ते (ब्रॉडकास्टर) असलेल्या स्टार स्पोर्ट्सतर्फे प्रथमच असा अनोखा प्रयोग केला जात आहे. स्टार स्पोर्ट्सतर्फे बुधवारी तशी घोषणा करण्यात आली.
‘‘गेल्या तीन वर्षात स्टार स्पोर्ट्सने सर्वच खेळांना प्राधान्य दिले आहे. क्रिकेटसह प्रो-कबड्डी आणि इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) त्यात समावेश आहे. दर चार वर्षानी होणा-या ऑलिंपिकची उत्सुकता जगातील सर्वच क्रीडाप्रेमींना असते. यावेळचे ऑलिंपिक अधिक संस्मरणीय करण्यादृष्टीने स्टार स्पोर्ट्सने कंबर कसली आहे.
आमच्या आठ चॅनेल्सवर दिवसभर ऑलिंपिक स्पर्धा पाहता येणार आहे. सर्वच स्पर्धाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. मात्र भारताच्या क्रीडापटूंना अधिक प्राधान्य दिले जाईल,’’ असे स्टार स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नितीन कुकरेजा यांनी सांगितले.
स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेल्सप्रमाणे हॉट स्टारवरही ऑलिंपिकचा आनंद लुटता येणार आहे. चॅनेल्सवर इंग्लिशसह हिंदी भाषेमध्ये सामन्यांचे समालोचन ऐकता येणार आहे. यावेळी स्टार स्पोर्ट्सतर्फे त्यांच्या प्रसारणादरम्यानच्या स्पोर्ट्स पॅनेलची घोषणा करण्यात आली. त्यात ऑस्ट्रेलियाचा ऑलिंपिकपदक विजेता जलतरणपटू इयन थॉर्पेसह माजी महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन, माजी सवरेत्कृष्ट नेमबाज अंजली भागवत, माजी हॉकीपटू विरेन रस्किन्हा तसेच माजी जलतरणपटू रेहन पोंचाचा समावेश आहे.
भारताला नेमकी किती पदके मिळवता येतील, हे सांगणे कठीण आहे. मात्र मागील दोन ऑलिंपिकमधील कामगिरी तसेच मोठे पथक पाहता भारताची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय होईल, असा विश्वास सर्व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. अपेक्षांचे दडपण घेऊ नका, मात्र जबाबदारीने खेळा अपेक्षांचे दडपण घेऊ नका. मात्र जबाबदारीने खेळा, असा सल्ला भारताची माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती नेमबाज अंजली भागवतने दिला.
‘‘ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रीडापटूचे असते. देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असणारच. मात्र अपेक्षांचे दडपण घेऊ नका. दडपण झुगारून सवरेत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करा. यश नक्कीच मिळेल,’’ असे अंजलीने सांगितले.
रिओमध्ये वेगाने वाहणारे वारे सवरेत्कृष्ट कामगिरीत अडथळा ठरू शकतात, असे अंजलीने यावेळी सांगितले. ‘‘बीजिंग ऑलिंपिकसाठीचा ‘कोटा’ मी रिओ वर्ल्डकपमध्ये मिळवला. त्या शूटिंग रेंजमध्ये काहीही फरक नाही.
रिओमधील शूटिंग रेंजवर वेगाने वारे वाहतात. त्याचा सामना करताना कामगिरी उंचावणे, मोठे आव्हान असते. वेगाने वाहणा-या वा-यांचा फटका भारताच्या नेमबाजांना बसू शकतो. कारण आपल्याला तशा वातावरणात खेळण्याची सवय नसते,’’ असे अंजली म्हणाली.