महिला क्रिकेट म्हटलं की एक नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे सुरेखा भांडारे. ७४-७५ साली महिलांनी क्रिकेटमध्ये यावं असं अजिबात वातावरण नव्हतं. त्या काळी त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं. लहानपणापासूनची क्रिकेटची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती.
महिला क्रिकेट म्हटलं की एक नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे सुरेखा भांडारे. ७४-७५ साली महिलांनी क्रिकेटमध्ये यावं असं अजिबात वातावरण नव्हतं. त्या काळी त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं. लहानपणापासूनची क्रिकेटची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. सुरुवातीला टेनिस बॉलने सराव करून हळूहळू स्वत:ने क्रिकेट कोचिंग क्लासेस सुरू केले. या कोचिंगमधून त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक महिला क्रिकेटपटूंना घडवलं आहे. त्यांना स्वत:ला छत्रपती पुरस्कार आणि माधवराव सिंधीया यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा या पहिल्या महिला क्रिकेट खेळाडूशी केलेली ही बातचीत.
तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात ?
लहानपणापासूनच क्रिकेट या खेळाची आवड होती, पण महिला क्रिकेट कुठेच नव्हते. भावाच्या मित्रांसोबत मी एकटीच मुलगी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचे. माझ्या लग्नानंतर म्हणजे १९७४ साली नवयुग क्रीडा मंडळाने क्रिकेट चालू केले आणि त्याच वेळी मी मुंबईसाठी सिलेक्टर झाली ती आजपर्यंत.
आधीपासून या क्षेत्रात यायचं असं ठरवलं होत का ?
असं काही ठरवलं नव्हतं. पण मी सीनिअर प्लेयर म्हणून नेट सांभाळायची. थोडय़ाच दिवसात मी ठरवलं की, भारतासाठी खेळले नाही तरी प्लेयर नक्कीच तयार करू शकते. म्हणून क्रिकेट कोचिंगकडे वळले. या कोचिंग क्लासेसमधून मी आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले. त्यातील दोघी छत्रपती पुरस्कार विजेत्या आहेत. दीपा कुलकर्णी व सुलक्षणा नाईक. सुनेत्रा परांजपे, सीमा पुजारे, संगीता कामत तिघी वल्र्ड कपदेखील खेळल्या आहेत. पूनम राऊत ही भारतासाठी खेळली. जवळजवळ ७० ते ७५ मुली मुंबईसाठी खेळल्या व अजूनही मी तेच काम करत आहे.
घरातल्यांचा पाठिंबा होता का ?
आतापर्यंत माझ्या माहेरून मला नेहमीच पाठिंबा दिला गेला, पण लग्नानंतर माझे पती संजीव भांडारे यांनी मला खूप पाठिंबा दिला. तसंच माझ्या सासरच्या मंडळींकडूनसुद्धा चांगलाच पाठिंबा होता. इतकंच नाही तर, माझे सासरे माटुंग्याला मॅचदेखील पाहायला यायचे. म्हणूनच मी एवढं करू शकले. तसेच सर्वांची इच्छा होती भारताचे प्रतीनिधित्व करावे.
या क्षेत्रात तुम्हाला गुरू कोणते लाभले?
माझे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, रमाकांत देसाई, जयंत नेने, विजय पितळे तर प्रशिक्षक म्हणून प्रोत्साहन देणारे सत्यापूर्ती, मंत्री सर, हडकर, रामचंदन यांनी दिले. मी आज जिथे आहे त्याचे सर्व श्रेय या सर्व गुरू, कुटुंब आणि माझा भाऊ मंगेश भालेकर यांना देते.
या क्षेत्रात येताना समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता?
१९७४ साली हातात बॅट घेऊन रस्त्यावरून चालत असताना लोक टिंगल करायचे, ‘गावस्कर चालले आहेत, बघा’, असं म्हणायचे. पण याच्या पलीकडे कधी अपशब्द ऐकवले नाहीत. मी क्रिकेटची पॅ्रक्टिस घर, संसार सांभाळून करत होते. त्यामुळे फक्त स्वत:ला त्रास व्हायचा, पण ते करायलाच हवे होते, कारण क्रिकेटची आवड होती. क्रिकेट कोचिंग १९८३ खेळत असल्यापासून करत होते. १९८३ ते २०१३पर्यंत मुंबई विद्यापीठाची कोच होती.
या क्षेत्रात वावरताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
पूर्वी आर्थिक चणचण खूप असायची. शिवाय क्रिकेटचा सराव करायचा कुठे, हा मोठा प्रश्न होता. कारण सरावासाठी मैदानंही उपलब्ध नव्हती. तेव्हा हे सगळं कठीण वाटत होतं. पण आता शरद पवारसाहेबांनी महिला क्रिकेटपटूंना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. खेळाडू, सिलेक्टर, मॅच रेफ्री, अंपायर इत्यादींना मानधन देण्यात येते.
मैदानंही उपलब्ध झाली आहेत. कित्येक राष्ट्रीय स्पर्धा स्वखर्चाने खेळल्या. कारण तेव्हा आताइतकं या खेळाचं महत्त्व नव्हतंच. तुलनेने आताच्या महिलांना खूप सवलती मिळतात. मानधन आहे, सरावासाठी मैदानं उपलब्ध आहेत. तेव्हा माझा भाऊ मंगेश भालेकर यांनी हिंमत देऊन व मैदान देऊन अडचणी दूर केल्यात व आजपयर्ंत करतही आहे.
आतापर्यंत तुम्हाला कोणकोणते पुरस्कार मिळाले.
पहिली महिला क्रिकेट खेळाडू म्हणून सन १९८८-१९८९चा छत्रपती पुरस्कार मिळाला, बेस्ट कोच-मुंबई डिस्ट्रिक अॅवॉर्ड पुरस्कार, डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अॅकॅडमीचा ‘लाईफ अचिव्हमेंट पुरस्कार’ आणि भागोबा जाधव फाऊंडेशनचा ‘माधवराव सिंधीया’ पुरस्कार मिळाले आहेत.
महिला दिनानिमित्त महिलांना काय सांगाल?
माझ्या आई-वडिलांनी मला एक मोलाचा सल्ला दिला, तो म्हणजे आपल्याला जरी एखादी गोष्ट मिळाली नाही तरीही त्यावर रडत न बसता ही गोष्ट आपल्याला नाही तर दुस-यांना कशी मिळेल यासाठी झटलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. त्यांच्या ध्येयपूर्तीला आपला हातभार लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर जायची खूप इच्छा होती, पण ते झालं नाही, म्हणून मी रडत बसले नाही. त्यातूनच मी कोचिंग क्लासेस काढायचा निर्णय घेतला आणि अधिकाधिक आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला खेळाडूंची कशी निवड होईल याकडे लक्ष देते.
महिलांना कित्येक पातळीवर तडजोड करावी लागते. त्यातून काही महिला खचतात. तर काही त्यातून मार्ग काढतात. एखादी गोष्ट नाही मिळाली नाही तर त्यात न अडकता त्यातून बाहेर कसं पडता येईल किंवा आपल्या अनुभवाचा इतरांना कसा फायदा होईल याकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे.