तंत्रज्ञान कितीही विकसित झालं व शिक्षण मिळवण्याची साधनं कितीही वाढली तरी शिक्षक या घटकाचं शिक्षण व्यवस्थेतलं स्थान कधीही कमी होणार नाही. कारण, एका सजीव शिक्षकाची जागा कधीही संगणक, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट अशी निर्जीव साधने घेऊ शकत नाहीत.
अज्ञानतिमिराधस्य ज्ञानाज्जन शलाकया
चक्षरुन्मी लितं येन तस्मै श्री गुरुवे नम:।।
प्राचीन काळी भारतात या श्लोकात सांगितलेल्या अलौकिक भावनेने, संबंधाने गुरुकुल पद्धतीने गुरू शिष्यांना शिक्षण देत असत. कृष्ण-सांदिपनी, अर्जुन- द्रोणाचार्य, कर्ण-परशुराम, राम-विश्वामित्र या शिष्य-गुरूंच्या अनेक आदर्श जोडय़ा भारताच्या पुरातन काळात अजरामर झाल्या.
हळूहळू काळ बदलला. समाज बदलला. कालांतराने आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करणा-या इंग्रजांनाही आपण मोठा स्वातंत्र्यलढा उभारून या देशातून पळवून लावलं. पण लॉर्ड मेकॉलेनी दिलेली शिक्षणपद्धती स्वीकारून आपण इंग्रजांची कायमची लाचारी मात्र पत्करली. या शिक्षणपद्धतीमुळेच कालांतराने शिक्षकाचे ‘गुरुपण’ जाऊन तो वेतन घेऊन ज्ञान देणारा एक कामगार झाला आणि विद्यार्थी पैसे देऊन, फी भरून ज्ञान विकत घेणारे ग्राहक झाले.
आज शिक्षणक्षेत्रात ‘शिक्षक’ या घटकाची परिस्थिती काय आहे? समाजातील गुणवंत विद्यार्थी करिअर म्हणून या क्षेत्राकडे का पाहत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. भारतात असणा-या शिक्षकांच्या या परिस्थितीला पहिल्यांदा कारण ठरतं ते इथलं शासन. आज जगात कोणत्याही देशात शिक्षणावर जेवढा खर्च केला जातो त्या प्रमाणात भारतात शिक्षणावर केला जाणारा खर्च अत्यंत नगण्य आहे. म्हणून सरकारी शाळांना आज वेतनेतर अनुदान मिळत नाही आणि शिक्षकांना वेळेवर पगारही मिळत नाही.
आज महाराष्ट्रात नव्याने भरती होणा-या डी.एड. शिक्षणसेवकांना सुरुवातीला तीन र्वष केवळ सहा हजार व बी.एड. शिक्षणसेवकांना नऊ हजार रुपये पगार दिला जातो. काही वर्षापूर्वी हाच पगार अनुक्रमे तीन हजार व चार हजार असा होता. अशा तुटपुंज्या वेतन मिळणा-या पैशाकडे समाजातील कोणत्या गुणवंतांना या क्षेत्राकडे वळावंसं वाटेल!
सरकारकडे पैसा नाही म्हणून सरकारने खासगी शाळांना परवानग्या दिल्या. परिणामी, खासगी शाळांची संख्या प्रचंड वाढली. याचा परिणाम अर्थातच सरकारी शाळा, तिथली विद्यार्थी संख्या यांच्यावर झाला. परिणामी, शिक्षकांची नवी भरती बंद होऊन सरप्लस शिक्षकांची मोठी समस्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली.
बरं, या खासगी शाळांमध्ये काम करणा-या शिक्षकांना वेतन किती? तर बिझनेस म्हणून शिक्षणाचा बाजार मांडणा-या खासगी संस्थाचालकांच्या मनाला वाटेल ते! अगदी दीड-दोन हजारांपर्यंत वर्षातून एकदा हजार-पाचशे रुपयांची पगारवाढ बस्स! या परिस्थितीत नवी पिढी या क्षेत्राकडे कशी वळणार?
आज अनेक ठिकाणी शिक्षक एकावेळी, एका वर्गात साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना शिकवतात. शासन म्हणतं, ‘मुलं कशीही वागली तरी शिक्षकांनी त्यांना ओरडायचं नाही, रागवायचं नाही. विद्यार्थी हुशार असो की ‘ढ’ आठवीपर्यंत काहीही करून त्याला पास करायचं. ढकलायचं. आज मुलांना, पालकांना, अभ्यासाबद्दल काही बोलावं तर मुलं, पालक थेट ऐकवतात-तुम्ही माझ्या मुलाला नापास नाही करू शकत! शिक्षकांची ही घुसमट पाहिली की आज प्रश्न पडतो, शिक्षक इतका दीन का झालाय?
अध्यापनाचं काम हे प्रथम कर्तव्य असताना शिक्षकांना अनेकवेळा वर्ग रिकामे सोडून निवडणुका, जनगणना, शालाबाह्य विद्यार्थी शोध, केवळ उपचार म्हणून उरकलेली दर्जाहीन प्रशिक्षणं आणि सरल ऑनलाईन नोंदणीसारखी अध्यापनबाह्य कामं करावी लागतात. अशावेळी शिक्षकामधला ‘गुरू’ संपून उरतो तो केवळ एक मजूर, वेठबिगार आणि परिस्थितीने हतबल झालेला कामगार!
सध्याचं युग हे विज्ञानयुग आहे. तंत्रज्ञानामध्ये तर रोजच नवनवीन प्रगती होतेय. टीव्ही, सिनेमा, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअॅप या सगळय़ाच माध्यमातून नव्या पिढीचं शिक्षण सुरू आहे. मग आता कालांतराने शाळा, शिक्षण व पर्यायाने शिक्षक या घटकाची गरज तरी उरेल का? असा प्रश्न काही आधुनिक विचारवंत विचारतीलही. पण तंत्रज्ञान कितीही विकसित झालं व शिक्षण मिळवण्याची साधनं कितीही वाढली तरी शिक्षक या घटकाचं शिक्षण व्यवस्थेतलं स्थान कधीही कमी होणार नाही. कारण, एका सजीव शिक्षकाची जागा कधीही संगणक, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट अशी निर्जीव साधने घेऊ शकत नाहीत.
बौद्धिक विकास करण्यासाठी, मनोरंजनासाठी आणि सामान्यज्ञान वाढवण्यासाठी ही साधने महत्त्वाची असतीलही, पण तरीही मुलांचा भावनिक, मानसिक, सामाजिक विकास होण्यासाठी व्यक्ती-समूह सोबत मुलांच्या आंतरक्रिया होण्यासाठी शाळा, महाविद्यालये या घटकांचे व पर्यायाने ‘शिक्षका’चे स्थान, महत्त्व भविष्यातही कायम राहील एवढे निश्चित!
म्हणूनच समाजातील उत्तमोत्तम विद्यार्थी या अध्यापन क्षेत्राकडे वळावेत यासाठी शासनाने प्रयत्नशील असायला हवे. आज दहावी, बारावीला सर्वोत्तम गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी इंजिनीयर-डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात! पण ज्यांच्यामुळे आपण घडलो या शिक्षकांसारखं आपणही शिक्षक व्हावं असं स्वप्न गुणवंत विद्यार्थी पाहत नाहीत.
सरकारी नोकरीची अशाश्वती, खासगी शाळांमधले तुटपुंजे वेतन, शालाबाह्य कामामुळे होणारी शिक्षकांची अवहेलना, नवनवीन नियम यामुळे आज कोणालाच हे क्षेत्र करिअर म्हणून निवडावंसं वाटत नाही. म्हणूनच हे चित्र बदलवून शिक्षकांना सन्मानाचं स्थान द्यायचं असेल, तर शासनाने शिक्षणक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद, सरकारी शाळांना अनुदान, खासगी शाळांसाठी योग्य वेतनपद्धती.
नियमावली-नियंत्रण, असे उपाय करायला हवेत शिक्षकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने टाकणे, शिक्षकांचा अवमान होईल अशी वक्तव्ये करणे, शिक्षक पुरस्काराच्या रकमा शिक्षकांना वर्षानुवर्षे न देणे हे प्रकार थांबवून आजच्या सरकारने ‘शिक्षक’ या घटकाचे महत्त्व वाढवावे व आपले योग्य शैक्षणिक धोरण शिक्षकांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शासनाला एवढे जरी कळाले तरी हा शिक्षक दिन ‘शिक्षक दीन’ न राहता ख-या अर्थाने ‘शिक्षक दिन’ म्हणून सन्मानाने साजरा होईल.