ठाण्याच्या शिवसेनेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ‘इनकमिंग’मुळे पक्षातील निष्ठावंत नाराज झाले असून ते आता ‘आऊटगोईंग’च्या मार्गावर आहेत.
ठाणे- ठाण्याच्या शिवसेनेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ‘इनकमिंग’मुळे पक्षातील निष्ठावंत नाराज झाले असून ते आता ‘आऊटगोईंग’च्या मार्गावर आहेत.
मात्र यामुळे धास्तावलेल्या पालकमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याऐवजी थेट ‘पक्षांतर कराल, तर कामे थांबतील’, अशी अप्रत्यक्ष धमकी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ‘नव्यां’च्या आगमनाने आपला असा ‘कचरा’ झाला आहे, याचा अनुभव निष्ठावंतांना येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर शिवसेनेत मोठय़ा प्रमाणात इनकमिंग सुरू झाले असून अजूनही काही जण येण्याच्या मार्गावर आहेत, मात्र कुणी ‘साहेबांची’ वेळ मिळण्याची, तर कुणी दिवाळी होण्याची वाट पाहात असल्याचे समजते. या सगळय़ामुळे अनेक वर्षापासून शिवसेनेसाठी झटणारे कार्यकर्ते, नगरसेवक यांच्यात मात्र अस्वस्थता असून उद्या उपऱ्यामुळे आपली विकेट जाते की काय? अशी भीती प्रत्येकालाच आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील १२०० शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर पालकमंत्र्यांची चिंता आणखी वाढली आहे.
गटप्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ‘इनकमिंग’बद्दल नाराजी व्यक्त करत ‘नॉट रिचेबल’ होण्याचा इशारा दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी नुकतीच विभागप्रमुख आणि नगरसेवकांची बैठक घेतली. यात ‘दोन महिन्यांचा प्रश्न आहे, कुठे जायचे तिकडे जा, पण तुमची कामे मीच करणार आहे’, असे सूचक वक्तव्य त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याचा थेट अर्थ ‘तुम्ही जर पक्ष सोडून गेलात, तर तुमची कामे थांबवली जातील’, असा असून त्यामुळे नगरसेवक आणि विभागप्रमुखांमध्ये असलेल्या अस्वस्थतेत भर पडली आहे. ज्यांच्या जीवावर शिवसेना आज सत्तेत बसली, त्यांचाच जर ‘इनकमिंग’वाल्यांमुळे असा कचरा होणार असेल, तर ही निष्ठा काय कामाची? अशी भावना यानंतर शिवसैनिकांमध्ये आहे. येत्या काही दिवसांत काही अशाच प्रकारची आधखी एक बैठक होणार असून त्यात काय होते? याकडे सध्या निष्ठावंतांचे लक्ष लागले आहे.
सेनेला मनसेची सर्वाधिक अॅलर्जी
आत्तापर्यंतचा इतिहास पाहता भाजपाने मनसेला मोठे करण्याचा प्रयत्न करणे, शिवसेनेने मनसेला वारंवार डिवचणे अशा घटना घडल्या आहेत. त्यात ‘कुठेही जा, पण मनसेत जाऊ नका’ अशी थेट मातोश्रीचीच भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे ठाण्यातील नगरसेवक जर मनसेत गेले, तर ते पालकमंत्र्यांना ‘वरून’ महागात पडू शकते. याचमुळे ‘प्रहार’ने शिवसेनेचे काही नगरसेवक मनसेच्या मार्गावर असल्याचे वृत्त रविवारी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने दिल्यानंतर शिवसेनेतील ‘चिडचिड’ वाढल्याचे समजते.