डोके हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मानवाची विचारप्रक्रिया याच डोक्यातील मेंदूतून चालत असते. माणसाने कसे वागावे, कसे वागू नये यावर मेंदूचे नियंत्रण असते. असे वैद्यकशास्त्र सांगते. त्यामुळे माणसाच्या डोक्याला फारच महत्त्व असते. हे कोणीही नाकारण्याचे तसे कारण नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्केडेय काटजू यांनी या महत्त्वाच्या भागाबाबत नुकतेच सोशल मीडियावर विचार मांडले. हे विचार मांडणारे काटजू थोर आहेत याबद्दल वादच नाही. पण नसत्या ठिकाणी माणसाने डोके वापरले तर काय होते, याचे मूर्तिमंत उदाहरणच काटजू यांनी समोर ठेवले आहे तेही अभिनयाचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्याबाबत. ‘अमिताभ हा रिकाम्या डोक्याचा माणूस असून अनेक पत्रकार त्यांची स्तुती करत असतात, पण आता मला त्या पत्रकारांचेही डोके रिकामे आहे की काय? अशी शंका येत आहे’ असे पोस्ट करून अमिताभ बच्चनसह नारदांच्या वंशजांनाही त्यांनी आव्हान दिले आहे. बिच्चारे बच्चनसाहेब, ते थेट काटजू यांना शरण गेले. त्यांनी, ‘काटजू बरोबर आहेत, माझेच डोके मात्र रिकामे आहे’ अशी पोस्ट टाकून या टीकेला उत्तर दिले आहे. अमिताभ बच्चन फारसे वादात पडत नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वकुबाप्रमाणे काटजू यांना उत्तर दिले. हे करत असतानाच अमिताभ यांनी काटजू यांच्या मुख्य मुद्दय़ाला बगल दिली असेच म्हणावे लागेल. काटजू यांनी आपल्या पोस्टमध्ये अमिताभ यांनी अभिनयाव्यतिरिक्त काय केले, असा सवाल केला आहे. याचे उत्तर द्यायचे टाळून बच्चनसाहेबांनी काटजूंपेक्षा चांगले डोके वापरले आहे. महाराष्ट्र काही वर्ष दुष्काळाने होरपळत आहे. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षयकुमार आदी अभिनेते अशावेळी दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले. तेव्हा आपले बच्चनसाहेब खरेच कुठे होते, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. पण असे उत्तर द्यायचे म्हणजे पुन्हा डोके खाजवावे लागणार, डोके खाजवल्यावर उत्तर जर मिळाले नाही तर आपलेच हसे होणार, त्यापेक्षा सरळ काटजू यांच्यासमोर सरेंडर होऊन आपल्याभोवतीच्या प्रसिद्धीची आभा अधिक ठळक करावी, असा केविलवाणा प्रयत्न अमिताभ बच्चन यांनी केला आहे. त्यात ते नेहमीसारखे यशस्वी झाले.
जगप्रसिद्ध विचारवंत सार्त् यांनी कलावंत व सामाजिक बांधिलकी विलग करता येत नाही, असा विचार मांडला होता. सार्त् यांनी जेव्हा हा विचार मांडला तेव्हा त्यांना कदाचित माहीत नसेल की आत्मकोशात राहणे किती तरी चांगले असते. त्यातून प्रसिद्धी तर मिळतेच शिवाय कोणत्याही वादात राहिलो नाही तर आपले अढळ स्थान कायम राहते. बिच्चारे सार्त् त्यांच्या डोक्यात हा विचार आलाच नाही. त्यामुळेच गोची झाली. बाकी अमिताभ यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. मोठे होण्यासाठी डोके रिकामेच असायला हवे. विनाकारण डोक्यात काहीही देशसेवेचे विचार ठेवणे चुकीचे आहे. त्यातून कोणाचेही भले होत नसते. झाले तर ते जनतेचे होते, आपले नाही. अमिताभ उगाच शहेनशहा नाही. क्षमा हेच तर सर्वच प्रश्नांचे उत्तर असते. क्षमाशील असावे, असा संदेश आपल्याकडच्या संतांनी, महंतांनी दिलेला आहे. अमिताभ यांनीही तोच कित्ता गिरवला, त्यात त्यांचे काय चुकले? शेवटी तेही अभिनेते आहेत. अभिनय करण्यासाठीही डोकेच लागते हो! ते काही येरागबाळ्याचे काम नाही.