टीव्ही, कॉन्सर्टमध्ये बोलणारे मोदी संसदेत का बोलत नाहीत, असा थेट हल्लाबोल कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला.
नवी दिल्ली- नोटाबंदीवरून सरकार व विरोधकांमधील तणाव वाढला आहे. विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. टीव्ही, कॉन्सर्टमध्ये बोलणारे मोदी संसदेत का बोलत नाहीत, असा थेट हल्लाबोल गांधी यांनी मंगळवारी केला.
संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुंबईत १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने मोदींनी भाषण केले. मात्र ते संसदेत बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
नोटाबंदीच्या मुद्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून संसदेत कामकाज बंद पाडले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा मोठा फटका शेतकरी, मजूर, कामगारांना बसत आहे, अशी टीका विरोधकांनी केली.