एखाद्या गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो त्यावर बरंच काही अवलंबून असतं. विचारी मनाने पाहिलं की ब-याच गोष्टी सहज शक्य होतात.. आपल्या मनाला ती सवय लावून घेणं आवश्यक आहे. कारण आपल्याजवळ असलेली आणि न दिसणारी मन नावाची चीज सुदृढ असली की आपल्या रागावर, संतापावर नियंत्रण येतं. उलट एखाद्या घटनेचा छान धागा आयुष्यात गुंफला जातो.
आता हेच बघा ना.. कावळा जगातल्या कुठल्याही प्रांतात आढळणारा पक्षी. माणसाच्या संगतीनं राहणारा खेडेगावातून हक्काने वाडयावस्त्यांतून वावरणारा हा पक्षी आजकाल शहरांतूनही माणसाशी सलगी करतांना आढळतो. जसा तो माणसांमधून वावरतो तसाच तो गाई, म्हशी, कुत्रे, कोंबडया अशा पाळीव प्राण्यांमधून सुद्धा बिनदिक्कत फिरत असतो. एखादा उनाड मुलगा, कशी लहर लागेल तसा वागतो तसाच कावळा सुद्धा पक्षी जगतातला उनाडपक्षी असावा असं मला नेहेमी वाटतं.
सतत शोधक नजर, मनात काहीतरी हेतू ठेवून बघण्याची त्याची धूर्त दृष्टी त्यामुळे असं साधम्र्य असलेला माणूस दिसला की, स्त्रिया सहज म्हणून जातात. डोमकावळा मेलाऽऽऽ..
पूर्वीच्या काळी घरात स्त्रियांचा अस्पर्श असला की, त्या एका बाजूला बसत अशावेळी आपल्या आईच्या किंवा काकूच्या जवळ जायला लहान मुलांने हट्ट केला की, आजी सांगायची बाळ आईजवळ जाऊ नको. तिला कावळा शिवलाय..
बिचा-या कावळयाला यातलं काहीच ठाऊक नाही. स्त्रिया मात्र त्याचं नाव घेऊन आपली वेळ मारून नेतात. पण तो कसाही असला तरी माणसाच्या जीवनात मात्र त्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. अगदी लहान बाळाच्या गोष्टीपासून माऊलींच्या अभंगापर्यंत त्याला जागा आहे. आपल्या कडेवर नुकताच मऊ भात खायला लागलेल्या बाळाला त्याची आई एक घास काऊचा आणि एक घास बाळाचा असं म्हणून भरवते आणि विशेष म्हणजे आमंत्रण दिल्यासारखा हा काऊसुध्दा तिथं हजर होतो.
भात न खाण्यासाठी हट्ट करणारं बाळ काऊच्या आगमनाबरोबर मटामटा भात खातं. बाळाची आईसुध्दा अशावेळी त्याला हाकलत नाही. उलट एखादा घास त्या काऊच्या पुढयात कृतज्ञतेने टाकते. कारण काऊच्या या आगंतुक येण्यानं तिचं बाळ पोटभर जेवणार असतं. तीच काम सोप होतं. आपल्याला सगळयांनाच लहानपणी इतर पशूपक्ष्यांच्या ओळखी आधी मऊ भाताच्या पहिल्या घासा बरोबर कावळयाची ओळख होते.
निसर्गातला आपला पहिला मित्र कावळा. त्याची ही झालेली मैत्री अगदी माणसाच्या शेवटपर्यंत टिकते. माणूस जसजसा वयाने मोठा होतो तसतसा ‘‘कावळा’’ नावाच्या हया आपल्या लहानपणीच्या मित्राला पूर्ण विसरून जातो. पण ही मैत्री कावळा नाही विसरत. अगदी पिंडाला शिवेपर्यंत त्याची साथ कायम असते. म्हणूनच मला वाटतं, आपल्या पूर्वजांनी या सगळयाचा विचार करून पिंडाला शिवायला कावळयाला हाक मारायची प्रथा सुरू केली असणार..
पण तिथं मात्र तो विनवण्या, आर्जव, माफी, दिलगिरी हे सगळे प्रकार करायला लावतो. पिंडाला स्पर्श न करून भल्याभल्यांना कोडयात टाकतो. गेलेल्या माणसाच्या नातेवाइकांना अंतर्मुख व्हायला लावतो. भावनेच्या भरात का होईना, पण लांब जाऊ पाहणा-या नातेवाइकांना एकत्र आणतो. दु:खी कुटुंबाची जबाबदारी घ्यायला लावतो. इतकं महत्त्व या कर्कश ओरडणा-या, कोणताही आकर्षक रंग अंगावर नसणा-या या कावळयाला मनुष्य जीवनात आहे.
संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगात कावळयाशी संवाद साधला आहे.
‘‘पैल तो ये काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
पैल तो ये काऊ कोकताहे..’’
घरी पाहूणा येणार आहे अशी शकुनाची बातमी खिडकीत किंवा अंगणात ओरडणारा कावळा देतो अशी आपल्याकडे समजूत आहे. पांडुरंगाची आर्ततेने वाट बघणा-या ज्ञानेश्वर माऊलींना देखील अंगणामध्ये ओरडणारा कावळा विठुमाऊली येण्याचा शुभसंकेत देतो आहे असं वाटतं.
तात्पर्य काय तर पहाताच क्षणी धूर्त, घाणेरडा वाटणारा अप्रिय आवाजाचा कावळा हा मनुष्य जीवनात इतीपासून तिथीपर्यत सहप्रवास करत असतो.
आमच्या घराच्या खिडकीत आजकाल रोज एक कावळा येतो. सकाळी शांतवेळी देवाची पूजाअर्चा चालू असतांना, दोन चार मिनटं शांत डोळे मिटून देवाचं नामस्मरण करावं तर नेमका त्याचक्षणी हा कावळा खिडकीत येऊन काऽवऽ काऽवऽ करून जोरजोरात ओरडतो. त्याच्या त्या कर्कश आवाजाने देवासमोर डोळे मिटून लावलेली माझी समाधी भंग पावते. आधी आमची समाधी ती कसली.. देवाचं स्मरण कमी आणि मागणंच जास्त, पण त्यात हा कावळा व्यत्यय आणतो. त्यामुळे शांत, सौम्य झालेल्या चित्तवृत्ती क्षणार्धात बदलून त्यांची जागा चिड, राग, हे रिपू घेतात.
पण माझ्या बायकोला मात्र या कावळयाचं मोठं कौतुक. त्याच्याशी सुध्दा ही बोलते. ‘‘आलास ऽ ये ऽ तरी म्हटलं अजून कशी स्वारी आली नाही ?’’ असं म्हणून रात्रीची राहिलेली पोळी, भात असं काहीतरी खिडकीत त्याच्यासाठी नेऊन ठेवते. ती त्याला पोळी वगैरे घालते त्याचा मला राग नाही. पण त्याच्याशी बोलायचं ? छे ऽ मला पटतच नाही.
तो काय पोपट आहे? गोड गोड बोलायला. त्यामुळे टाळकं इतकं सटकतं की, देवाच्या पुढची पूजा आणि नामस्मरण संतापमिश्रित होऊन कधी आणि कशी संपली तेच कळत नाही. पूजा आटोपल्यावर एवढावेळ संयमाने दाबलेला राग उफाळून वर येतो. मी बायकोबरोबर तडातडा भांडतो आणि बायको तितक्याच शांतपणे त्या कावळयाची बाजू घेते.
‘‘अहो, मुक्या प्राण्यांवर, पक्ष्यांवर दया करावी असं आपण नेहेमी म्हणतो ना मग प्रत्यक्ष तशी कृती केल्यावर इतका तुम्हाला राग का येतो ?’’..बायको ‘‘हे बघ, माझा त्याच्या कर्कश ओरडण्यावर राग आहे. तू त्याच्यावर दया करु नकोस, असं मी तुला म्हणत नाही. पण माझ्या पूजेच्या वेळी त्यानं येऊन असं काऽव. काऽव..करून ओरडायचं नाही.’’..मी. त्यावर ती म्हणते, ‘‘हे तुमचं अतिच झालं.
कावळा काऽव..काऽव.. करूनच ओरडणार.. तो विठू विठू कसा बोलेल? त्यापेक्षा तुम्ही देवाचं नामस्मरण इतकं एकरुप होऊन करा की, कावळाच काय पण इतर कोणताही पक्षी ओरडला तरी तुम्हाला ऐकू येणार नाही.’’
आमचा असा संवाद चालू असताना हा बेटा पुन्हा खिडकीत येतो आणि चक्क माझ्याकडे बघून जोरजोरात ओरडायला लागतो. म्हणतात नां.. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. शिळी असली म्हणून काय झालं पण ती त्याला नियमित मिळते.. त्यामुळे तो माझ्या बायकोची बाजू घेऊन माझ्याशी भांडतोय असंच मला वाटतं. त्यावेळी माझ्या चेह-यावरचे भाव बघून बायको खळखळून हसते. ते पाहून मलाही हसायला येतं. त्याचं काम फत्ते होतं. कावळा खिडकीतून उडून जातो.
बायको म्हणते, ‘‘पाहिलंत ज्याचा तुम्ही राग राग केलात त्यानंच तुम्हाला हसवलं. अहो ऽ तुम्ही दिवसभर कामावर गेलात की, मी एकटीच घरी असते. हा दिवसाच्या वेगळेगळया वेळी या खिडकीत येऊन बसतो. कर्कश ओरडतो. सुरुवातीला मलाही राग यायचा. नंतर त्याची सवय झाली. उलट आता तो कधी चुकून आला नाही तर मलाच चुकल्यासारखं होतं. घरात एकटं एकटं वाटताना तो सोबत करतो.
मला वाटतं पोळी हे निमित्त पण माझी दिवसभर सोबत करणं, विचारपूस करणं हाच त्याचा हेतू असणार. म्हणूनच तर वेगवेगळया प्रहरी खिडकीत बसून मी दिसेपर्यंत तो ओरडतो आणि मी दिसले की, उडून जातो. कोणत्याही खाद्याची अपेक्षा त्याला त्यावेळी नसते. सकाळी घातलेल्या एका तुकडयाचं कावळयासारखा पक्षी सुध्दा किती इमान राखतो बघा. माणसालाच फक्त शिकवावं लागतं.’’
ती असं बोलायला लागली की मी ऐकत रहातो. खरचं, आईच्या कडेवर बाळ असताना झालेली ही काऊ नावाच्या मित्राची ओळख आपण विसरतो. पण तो मात्र संधी मिळेल तेव्हा ही मैत्री निभावत असतो. लहानपणी खाल्लेल्या एका मऊ भाताच्या घासाचं इमान राखत असतो, अगदी सरणावर गेल्यानंतरही!