महागाई कुठे कमी झाली ते दाखवून द्या, मला पटवून द्या, असे सणसणीत आव्हान गव्हर्नर रघुराम राजन यांनी सर्व टीकाकारांना दिले.
मुंबई- महागाई कुठे कमी झाली ते दाखवून द्या, मला पटवून द्या, असे सणसणीत आव्हान गव्हर्नर रघुराम राजन यांनी रविवारी सर्व टीकाकारांना दिले. गव्हर्नर राजन हे विकासाऐवजी महागाई नियंत्रणाला महत्त्व देत असल्याची टीका त्यांच्यावर होत असते. या टीकेला राजन यांनी रविवारी चोख प्रत्युत्तर दिले.
येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या गतीवरून नाराजीची भावना आहे. मात्र, सलग दोन वर्षे भीषण दुष्काळ, जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, ब्रेक्झिटचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. यंदा मान्सून चांगला झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली होईल, मात्र पायाभूत आर्थिक सुधारणा अधिक वेगाने राबवणे गरजेचे आहे. सूक्ष्म आर्थिक स्थिरतेमुळे विकासाचा वेग अधिक वाढू शकेल, असे राजन यांनी स्पष्ट केले.
व्याजदर कमी करत नसल्याचा आरोप करणा-या विरोधकांचा समाचार घेताना राजन म्हणाले की, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई सलग चौथ्या महिन्यात वाढली आहे. ती जूनमध्ये ५.७७ टक्के झाली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक गेल्या दोन वर्षात सर्वोच्च आहे. महागाईचा दर ६ वरून २ टक्के करण्याचे रिझर्व्ह बॅँकेचे लक्ष्य आहे. आर्थिक ज्ञान नसताना केवळ वायफळ चर्चा सुरू आहे. त्यामुळे महागाई कुठे कमी झाले ते मला दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी दिले.
भावी गव्हर्नरना काय संदेश द्याल, त्यावर राजन म्हणाले की, पतधोरणापर्यंत वाट पाहा. आर्थिक र्सवकषतेबाबत ते म्हणाले की, प्रत्येक गावात बॅँकेच्या शाखा उभारणे शक्य नाही. ते अत्यंत महागडे ठरेल. याला पर्याय म्हणजे मोबाईल शाखा, सूक्ष्म शाखा उभाराव्यात.
अभ्यासक्रमाचे पुस्तक लिहीन
रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नरपदाच्या कार्यकाळातील अनुभवांवर पुस्तक लिहिण्याऐवजी अभ्यासक्रमाचे पुस्तक लिहीन, असे राजन यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचे रिझर्व्ह बॅँकेतील कार्यकाळावर आधारित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यामुळे तुम्ही पुस्तक कधी लिहिणार असा प्रश्न राजन यांना विचारला.
त्यावर ते म्हणाले की, गव्हर्नर पद सोडल्यानंतर माझ्या कार्यकाळावर पुस्तक लिहिण्याचा माझा कोणताही विचार नाही, त्यापेक्षा आपण अभ्यासक्रमाचे पुस्तक लिहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीबीआय, दक्षता आयोगापासून बॅँकांची सरसकट सुटका नाही
सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोगाच्या कारवाईपासून बॅँकांना सरसकट सुटका मिळणार नाही, असे स्पष्ट मत रिझव्र्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. मात्र, सर्व कायदेशीर बाबी पाहून कर्ज देणा-या बॅँकांचे रक्षण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांना जबाबदार धरू नये असे काही बॅँकर्सना वाटते. मात्र, ज्या बॅँकांनी कर्ज मंजूर करताना सर्व कायदेशीर बाबी व वस्तुस्थिती पाहिली आहे, त्यांना काळजी करण्याचे कारण नाही, असा दिलासा त्यांनी दिला. जे कर्जाचे निर्णय सामूहिक स्तरावर घेतलेले आहेत, त्याबाबत सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोगापासून संरक्षण करण्याची मागणी बॅँकांनी केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या बॅँक बोर्ड ब्युरोच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केली होती.त्यावर राजन म्हणाले की, या तपासयंत्रणांकडून सरसकट बॅँकांना संरक्षण दिले जाणार नाही. बॅँकांना जबाबदारी झटकता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.