विक्रमवीर सचिनला ‘भारतरत्न’ दिल्यावर सर्वत्र आनंद व्यक्त होत असतानाच भाजपची पोटदुखी मात्र उसळली आहे.
रायपूर- ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार क्रिकेटमध्ये विक्रमांची अनेक शिखरे सर करणा-या सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरला दिल्यावर सर्वत्र आनंद आणि समाधान व्यक्त होत असतानाच भाजपची पोटदुखी मात्र उसळली आहे.
नरेंद्र मोदींसारख्या जातीयवादी आणि थापेबाज नेत्याला डोक्यावर घेऊन नाचताना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दुखावणा-या आणि त्यांना विस्मृतीत लोटणा-या भाजप नेत्यांना सचिनला भारतरत्न मिळाल्यानंतर अचानक ज्येष्ठ नेत्यांची आठवण होऊ लागली आहे. जर सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर केला जातो तर ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतरत्न सन्मानासाठी विचार का केला जात नाही, असा सवाल भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे सचिन तेंडुलकर आणि सी. एन. आर. राव यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायचे आणि दुसरीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला भारतरत्न का नाही? अशी विचारणा करून भारतरत्न विजेत्यांचा अवमान करायचे धोरण भाजपने अवलंबले आहे. विरोधासाठी विरोध या वृत्तीने हा प्रश्न उपस्थित करून भाजपने सचिनच्या आणि त्याच्या चाहत्यांच्या आनंदातही मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न केला आहे. सचिनचे अभिनंदन करण्याचा मानभावीपणा दाखवतानाच वाजपेयींबद्दल मागणी करत भाजप नेत्यांनी त्यांचा पोटशूळ उठल्याचेच दाखवून दिले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य अनन्यसाधारण होते. ते देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान होते. छत्तीसगडच्या निर्मितीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते, असे सांगत रविशंकर प्रसाद यांनी वाजपेयी यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केले.
वाजपेयींना भारतरत्न का नाही? अशी विचारणा करत असतानाच सरदार पटेलांना ४१ वर्षानी मरणोत्तर भारतरत्न दिल्याबद्दल प्रसाद यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकांनंतर जेव्हा भाजप सत्तेवर येईल, तेव्हा आम्ही वाजपेयींना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करू, असे त्यांनी सांगितले.
सरदार पटेल यांचे भारतासाठीचे योगदान खूप मोठे आहे. पटेल यांचे १९५० ला देहावसान झाले आणि १९९१मध्ये त्यांना भारतरत्न देण्यात आला. त्यांना पुरस्कार द्यायला ४० वर्षाचा अवधी का लागला? या काळात भारताच्या पंतप्रधानपदी जवाहरलाल नेहरु (१७ वर्ष), इंदिरा गांधी(१६वर्षे) आणि राजीव गांधी (५वर्षे) राहिले. भारतरत्न हा पुरस्कर ब-याच लोकांना दिला गेला. मग पटेल यांनाच भारतरत्न द्यायला ४१ वर्षे का लागली, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.