दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो; परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला मलमास असे सुद्धा म्हणतात व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात.
हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते. परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षानी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो; परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला मलमास असे सुद्धा म्हणतात व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात.
या अधिकमासात वर्ज्य असलेली कृत्ये – देव प्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा, विशेष मंगलमय कार्ये.
या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णु, पुरुषोत्तम (या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात)
म्हणूनच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा-अर्चा करतात, तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.
अधिकमासात करावयाची व्रते व त्यासंबंधी नियम
या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्त्व आहे.
स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र
गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम ।
गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियम ॥
भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्रविवर्धिनी ।
अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम॥
- या मासात शक्यतो एक वेळेसच अन्नग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे.
- अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा.
- या महिन्यात आपल्याला आवडणा-या वस्तूचा त्याग करावा.
(उदा. एखादे फळ अथवा एखाद्या रंगाचे वस्त्र वगैरे.) - या महिन्यातील दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हिंदू धर्मात मुलगी – जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. (अनारशा ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात.) या महिन्यात नारळ, सुपा-या, फळे यांसारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.
या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्रांना, नातेवाइकांना भोजन देतात (या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात यावरून या महिन्यास धोंडे महिना सुद्धा म्हणतात.)
रोज गाईला पूरण पोळीचा घास द्यावा.
महिनाभर सतत नामस्मरण करावे – यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ.
नारायण – श्रीकृष्णाचे स्मरण करावे.
अपूपदानाचा संकल्प –
ममत्रयस्त्रिंशद्देवतात्मकविष्णुरूपी सहस्त्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिलपापप्रशमपरूव पुत्रपौत्रयुत धनधान्यक्षेमसमृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यापूपच्छिद्रसमसंख्यवर्षसहस्त्रवधी स्वर्लोकनिवासादिकल्पोक्तफलसिद्ध्र्यथ मलमासप्रयुक्तं अपूपदानं करिष्ये।
याप्रमाणे संकल्प करून दानवस्तूचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून पुढील लोकांनी त्यांची प्रार्थना करावी,
विष्णुरुपी सहस्त्रांशु: सर्वपापप्रणाशन: ।
अपूपान्न प्रदानेन मम पापं व्यपोहतु ॥
नारायण जगद्वीज भास्कर प्रतिरूपक ।
व्रतेनानेन पुत्रांश्च संपदं चापि वर्धय ॥
यस्य हस्ते गदाचक्रे गरुडो यस्य वाहनं।
शंख: करतले यस्य स मे विष्णु:
प्रसीदतु॥
कलाकाष्ठादिरूपेण निमेषघटिकादिना।
यो वंचयति भूतानि तस्मै
कालात्मने नम:॥
कुरुक्षेत्रमयं देश: काल: पर्वद्विजो हरि:।
पृथ्वीसममिमं दानं गृहाण पुरुषोत्तम॥
मलानांच विशुद्ध्द्यर्ह्त तव दास्यामि भास्कर।
इदं सोपस्करं त्रयस्त्रिंशदपूपदानं सदक्षिणाकं सतांबूलं
पोथीवाचन/सत्संग : अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्त्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो.
अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रीयांना अखंड सौभाग्याचा व पूत्रपौत्रांचा लाभ होतो,
अधिकमासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. उपोषणाचे प्रकार एकभुक्त (दिवसातून एकवेळ जेवावे व एकवेळ उपवास करावा.)
अयाचित (अकस्मात दुस-याकडे जेवायला जाणे.)
उपोषण – पूर्ण उपवास.
अशक्त मनुष्याने वरीलपैकी एखादा प्रकार तीन दिवस तरी करावा. न जमल्यास निदान एक दिवस तरी करावा.
महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते.
महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्वपापापासून मुक्ती मिळते.
महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते.
अधिकमासात नित्य कर्मे करावीत त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करून नयेत. जे केल्यावाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावीत, ही पोथी श्री संत गोपीनाथ यांनी शके सतराशे बहात्तर साधारण नाम संवत्सरे अधिकमासी वद्य एकादशी मंगळवारी मुमुक्षु नगरीत लिहून पूर्ण केली यात तीस अध्याय असून रोज एक याप्रमाणे वाचावा व शेवटी उद्यापन करून ब्राह्मणाला पोथी दान द्यावी.
अधिकमास
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी (ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास (महिने) मात्र ३५४ दिवसांतच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षात होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूयार्धारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
सूर्याधारित पंचांग पाळणा-या आसाम, ओरिसा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणा-या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.
चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतच्या कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुस-या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो, पण मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाही. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिक महिना आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की १९ वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. केव्हा केव्हा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशा वेळी क्षयमास येतो.
चांद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली. म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. एका महिन्यात सूर्य साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षानी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर त्या दुस-या अमावास्येनंतर सुरू होणा-या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव रिपीट करण्यात येते.
ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात. पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका (कृष्ण) पक्षानंतर अधिक मासाचे दोन पक्ष येतात आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष (दुसरा पंधरवडा). त्या पंचांगातला अधिक मास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात.
हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादशा असतात; त्यांतल्या २४ एकादशींपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणा-या दोनही एकादशांना कमला एकादशी हेच नाव असते.