अन्न सुरक्षेबाबत सध्या तयार केलेला तोडगा मान्य केला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन व्यापारमंत्री आनंद शर्मा यांनी सोमवारी व्यक्त केले.
बाली- केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणा-या अन्न सुरक्षा योजनेत कोणतीही तडजोड करणार नाही. अन्न सुरक्षेबाबत सध्या तयार केलेला तोडगा मान्य केला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन व्यापारमंत्री आनंद शर्मा यांनी सोमवारी व्यक्त केले.
जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरावरील परिषद मंगळवारपासून येथे सुरू होणार आहे. या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते.
अन्न सुरक्षा योजनेला विरोध करण्यासाठी तयार केलेली हंगामी योजना भारत स्वीकारणार नाही. आमच्या शेतक-यांचे हित जपण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. बाली येथील परिषदेत विकसनशील देशांनी एकी दाखवणे गरजेचे आहे. या बैठकीत कृषी क्षेत्रावर चर्चा करण्यासाठी भाग पाडले पाहिजे, असेही शर्मा यांनी सांगितले.
जगातील विकसीत देशातील शेतीवर मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात असताना त्यावर चर्चा केली जात नाही. या देशातील शेतक-यांचे गट विकसनशील देशातील कोट्यवधी शेतक-यांचे दबाव आणत आहेत. मात्र, जागतिक व्यापार परिषदेच्या सर्व आव्हानांचा मुकाबला करून अन्न सुरक्षा विधेयक योजनेची अंमलबजावणी केली जाईल, असे शर्मा यांनी सांगितले.