पश्चिमेतील महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या विद्युत केबलमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.
डोंबिवली – पश्चिमेतील महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या विद्युत केबलमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. या धोकादायक विद्युत वायरमुळे पाय अडकून एखादी व्यक्ती किंवा लहान मुले पडून विजेचा झटका लागल्यास गंभीर इजा होऊ शकण्याची शक्यता आहे.
विद्युत केबल रस्त्यावर पडल्या असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, महावितरणाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन टाकी परिसर व महाराष्ट्र नगर, गरिबाचा वाडा जोडण्यात येणा-या या भागातील नियोजित रोडवर रस्त्याच्या मधोमध विद्युत डीपी बसवण्यात आला आहे. याच रस्त्यावर काही ठिकाणी विद्युत खांब आहेत. परंतु, या खांबाच्या विद्युतवाहिनी रस्त्यावर लटकलेल्या आहेत. तसेच रस्ता अरुंद असल्याकारणाने या भागातून एखादी मालवाहू गाडी गेली, तर ही वाहिनी तुटून विद्युतपुरवठा बंद पडू शकतो. तसेच रस्त्याचा कडेला वायरीचा मोठा गुंता ही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
रामनगरमधील विद्युत ट्रान्सफॉर्मर या भागात गेलेली वाहिनी रस्त्याच्या कडेला असणा-या इमारतीतून गेल्याने तेथे राहणा-या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या विद्युत वहिनीमुळे कधीही धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते रस्त्यावर पडलेल्या वायरीमुळे ही वायर तुटून शॉर्टसर्किट होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.