लहान मुलांचे अपहरण करून त्यांचे खून करणे किंवा त्यांच्या बदल्यात खंडणी मागणे, असे प्रकार भारतात एकदम वाढले आहेत.
केंद्र सरकारच्या गुन्हेगारीविषयक आकडेवारी प्रसिद्ध करणा-या यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये गेल्या पाच वर्षात अपहरणाच्या गुन्ह्यात ८६ टक्के वाढ झालेली आहे. २००१ पासून या संबंधात उपलब्ध असलेल्या आकडेवारीशी तुलना केली असता २०१० पर्यंत त्यात ९८ टक्के वाढ झालेली दिसत आहे. २०११ मध्ये देशात अपहरणाच्या ४४ हजार ६६४ घटनांची नोंद झालेली आहे. यात लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यातल्या त्यात मुलींचे प्रमाण जास्त आहे. अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांना वेश्याव्यवसायास लावण्याचे प्रकार देशाच्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही तालुक्यांतून आठवडय़ाला एखादी तरी मुलगी हमखास गायब होत असते. तिचे पुढे काय होते, हे कोणालाच कळत नाही. म्हणून या भागातल्या काही तरुण कार्यकर्त्यांनी या परिसरात जनजागृती करण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे आणि त्यासाठी ‘बहीण वाचवा’ हे अभियान सुरू केले आहे. या भागातले तरुण कार्यकत्रे जागे आहेत म्हणून ठीक. परंतु देशातल्या अन्य भागांमध्ये मुलांना पळवून नेण्याचे आणि त्यांचा विविध कामांसाठी वापर करण्याचे प्रकार फारच वाढलेले आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकातून अलीकडेच एक बालक पळवण्यात आले. सोमवारी पवन एक्स्प्रेसमधून एका नऊ वर्षाच्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न झाला. एकटय़ा दिल्ली शहरामध्ये दररोज सरासरी एक मुलगा गायब होतो. विशेषत: बांगलादेशातून आलेल्या लोकांची मुले मोठय़ा प्रमाणावर गायब होतात. एक तर बेकायदेशीररीत्या त्यांनी भारतात प्रवेश केलेला असतो. त्यामुळे ते पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याच्या फंदात पडत नाहीत. असा प्रकार कोणी केलाच तर पोलिसच त्यांना उलट दमदाटी करतात. शिवाय या गायब झालेल्या मुलांची कसून तपासणी करण्याची काही गरज नाही, असे ते भासवतात. पळवलेल्या मुलांच्या बाबतीत पोलिसांकडून काहीच कारवाई होत नसल्याने मुले पळवणाऱ्यांची भीड चेपते. यातली काही मुले पळून गेलेली असतात हे खरे. परंतु काही मुलांना भीक मागण्याच्या व्यवसायात गुंतवण्यासाठी पळवलेले असते. काही राज्यांमध्ये मजुरांची फार टंचाई आहे. अशा ठिकाणी कामाला लावण्यासाठीसुद्धा मुले पळवली जातात. मुलांच्या गायब होण्याचे हे प्रकार फक्त भारतातच आहेत असे नाही. जगातले इतरही काही देश या समस्येने त्रस्त झालेले आहेत. परंतु यातल्या काही देशांनी डी. एन. ए. तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांची आणि त्यांच्या पालकांची भेट घडवून आणण्याचे तंत्र विकसित केलेले आहे. भारतात मात्र त्या तंत्राचा वापर केला जात नाही. गायब होणा-या मुलांच्या बाबतीत पोलिस यंत्रणेची उदासीनता जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत ही मुले गायब होण्याचे प्रकार कमी होण्याची शक्यता नाही.