‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेचे नेते अरिवद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्याविरुद्ध बेफाम आरोप केल्यामुळे प्रसारमाध्यमांना काँग्रेसविरोधी डंका पिटायला कोलित मिळाले.
असे काही काँग्रेसविरोधक समोर आले की, भाजपला आनंद होतो. कारण काँग्रेसची अडचण ती भाजपसाठी संधी ठरते. तेव्हा रॉबर्ट वद्रा यांच्यावर माध्यमांनी हल्लाबोल सुरू करताच भाजपच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. भाजपच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी वद्रा यांची चौकशी केली जावी, असा सूर लावला. आजवर अरिवद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी अनेकांवर केलेले आरोप भाजपच्या पथ्यावरच पडले आहेत. किंबहुना भाजपचा फायदा करण्यासाठीच केजरीवाल आणि हजारे हे नेहमी बेफाट आरोप करत असतात. परंतु भाजपचे नेतेसुद्धा धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत. त्यामुळे आता आपण भाजपच्या फायद्याच्याच गोष्टी करायला लागलो तर लोक आपल्याबाबत संशय घेतील, अशी भीती केजरीवाल यांना वाटायला लागली आहे. म्हणूनच ते अधूनमधून भाजपलाही लक्ष्य करायला लागले आहेत. सध्या नितीन गडकरी यांच्यावर आरोप होत आहेत. ते करण्यामध्ये केजरीवाल यांच्या सहकारी अंजली दमानिया या आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपचे नेते केजरीवाल यांच्यावर नाराज आहेत. त्यामध्ये दिल्लीत सोमवारी घडलेल्या एका घटनेची भर पडली. दिल्लीतल्या एका गरीब माणसाला वीज मंडळाकडून अवाजवी आणि भरपूर बिल आले. त्याने ते बिल चुकीचे असल्याचा दावा केला. परंतु याबाबतीत वीज मंडळ एक नियम पुढे करते. त्या नियमानुसार एखाद्याला चुकीचे बिल आले तर त्याने ते आधी भरले पाहिजे आणि नंतरच तक्रार केली पाहिजे. असे न केल्यास त्याची वीज तोडली जाते. पूर्वी ती गोष्ट योग्य होती. परंतु आता संगणकावर बिले तयार व्हायला लागली आहेत आणि संगणक चालवणाऱ्या माणसाने एक शून्य जादा देण्याची चूक केली तर बिल दहा पटीने जास्त होते. कधी कधी ही शून्ये एकापेक्षा अधिक असू शकतात. तेव्हा अशा चुकीमुळे एखाद्या गरीब माणसाला दसपट किंवा शंभरपट जादा बिल आले असेल तर आधी बिल आणि नंतर तक्रार या जुन्या नियमात थोडा बदल करून त्याचे बिल दुरुस्त करून दिले पाहिजे. पण तसे न केल्यामुळे त्याची वीज तोडण्यात आली. ती अरिवद केजरीवाल यांनी स्वत: जोडून दिली. त्यामुळे दिल्लीतील अनेक सामान्य माणसे प्रभावित झाली. मात्र या निमित्ताने भाषण करताना केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्या सरकारबरोबरच भारतीय जनता पक्षालाही लक्ष्य केले. आजवर दिल्लीमध्ये अशा सामान्य लोकांवर अनेक प्रकारचे अन्याय झाले आहेत. त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने काय केले, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. एका परीने त्यांचे म्हणणे बरोबर असले तरी गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. म्हणूनच भाजप आणि केजरीवाल हे दोघेही जागे झाले आहेत. दोघेही एकच आहेत. फक्त असे लुटुपुटुचे भांडण अधूनमधून करत असतात.